आझमचाचा!

एप्रिल 22, 2008

दिवस हिवाळ्याचे होते; पण महिना ऑक्टोबर. माझे स्नेही पत्रकार रमेश दाणे आणि मी त्यांच्याच एम-८० वरून सहा-साडेसहा तासांचा प्रवास करून अजिंठा गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजून गेले होते. आमचा सगळा प्रवास पोळून काढणाऱ्या उन्हात झाला होता. घाट चढताना सूर्य डोंगराआड गेल्यानं मिळाली ती पाऊण एक तासाचीच काय ती सावली.
घाट संपला आणि गाडी उजवीकडं वळवण्यास रमेशभाईंनी सांगितलं. कधीकाळी डांबर लागलेला तो रस्ता होता. गाव अगदी छोटंच. काही अंतर गेल्यानंतर पुन्हा उजवीकडं एक वळण घेतलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोकळी जागाच होती. तिथं माणसाच्या उपयोगी पडणारं रोपटंही उगवत नव्हतं हे दिसतच होतं. शंभरेक मीटर अंतर कापलं आणि पुन्हा दोन्ही बाजूंना जीवन सुरू झालं.
सूर्य अस्ताला गेला होता. संधीप्रकाश घरांवर पसरला होता. रस्त्याच्या विरुद्ध बाजूलाही घरं होती. सगळी छोटेखानी. पण लक्ष वेधून घेत होत्या त्या डाव्या बाजूला असलेल्या पाण्याच्या दोन उंच टाक्या. इतक्या छोट्या गावात दोन टाक्या कशासाठी हा प्रश्न माझ्या मनात तरळून गेला. तिथंच दोन विहिरी होत्या. रमेशभाई म्हणाले, ब्रिटिशकालीन आहेत. त्यांची नावं गंगा आणि जमुना!
गंगा – जमुना यांच्या शेजारीच एक छोटं घर होतं. अगदी ब्रिटिशांच्या काळात शोभेलशीच रचना. तिथंच गाडी थांबवायला भाईंनी सांगितलं. मी त्या घराच्या दारापाशी थोडी बाजूला गाडी लावली. रमेशभाईंनी पुढं होऊन हाक मारली. दार उघडून साडेपाच फुटांवर एखादा इंच उंची असलेली एक मूर्ती बाहेर आली. रंग काळा. उतार वयाच्या खाणाखुणा जागोजागी दिसत होत्या. डोळे बारीक, आत गेलेले; मिचमिचे म्हणावेत असे. रमेशभाईंकडं पाहता क्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रीत आश्चर्याचे भाव आले. ‘अरे, आप? आईये,’ म्हणत साठी ओलांडलेला तो गृहस्थ पुढं आला. हात मिळवले. माझ्याकडं पाहिलं. भाईंनी ओळख करून दिली. ‘हे आझमचाचा.’
***
आझम अली, गंगा-जमुना, पोस्ट अजिंठा, जिल्हा औरंगाबाद. हा आझमचाचाचा पत्ता. पोस्टानं संपर्क करावयाचा असेल तर लागू पडणारा. एरवी, मी जेव्हा त्याला भेटलो त्या काळात, त्याच्याशी पोस्टानंच संपर्क व्हायचा किंवा मग त्या गावात जाऊन त्याला प्रत्यक्ष गाठावं लागायचं. तिथं भेटायचा चाचा, पण त्याची हृदयभेट व्हायची ती अजिंठा आणि इतिहास, बुद्ध आणि शिवाजी महाराज अशा विषयांमध्ये. नव्हे चाचाचं राहण्याचं घर बहुदा इतिहास हेच असायचं. क्वचितच तो तिथून वर दिलेल्या पत्त्यावर येऊन रहात असावा.
भाईंनी ओळख करून दिल्यापासून चाचा माझ्याहीसाठी चाचाच झाला (आझम अली यांच्याशी हिंदीत बोलणं व्हायचं, मधूनच ते इंग्रजीची पेरणी करायचे. तो सगळा संवाद अर्थातच अनेकवचनी असायचा. पण एरवी केव्हाही मराठीत बोलताना चाचाचा उल्लेख त्याच्या सुहृदांमध्ये एकवचनी होतो. तितक्याच, किंबहुना थोड्या अधिकच, आदरानं).
आझमचाचा! आझमचाचा हा माझ्या स्मृतींतील अजिंठा-वेरूळच्या जगद् विख्यात लेण्यांची दुसरी बाजू आहे. ही लेणी अनेकांनी अनेक वेळेस पाहिली असतील, वेगवेगळ्या दृष्टींतून ते पाहणं झालं असेल. पण अगदी खास आझमचाचाच्या नजरेतून ही लेणी पाहण्याचं भाग्य लाभलेल्या मोजक्याच लोकांमध्ये माझा समावेश झाला तो थोडा अपघातानंच.
आझमचाचाच्या नजरेतून लेणी पाहण्याचं भाग्य असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा अनेकांना ती अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे. कारण लौकिकार्थानं आझमचाचा म्हणजे अजिंठा-वेरूळचा एक गाईड. तिथं गेल्यानंतर तसे अनेक गाईड भेटतातही. पण त्या काळात केवळ संशोधकांनाच गाईड करणाऱ्या गाईडच्या नजरेतून अजिंठा पाहणं हे वेगळंच. आझमचाचाचं वैशिष्ट्य म्हणजे तो या लेण्यांचा ब्रिटिशांच्या काळापासूचा गाईड. थोडं खोदकाम केल्यानंतर असं लक्षात यावं की त्या लेण्यांमध्ये गाईडची परंपरा ब्रिटिशांनी सुरू केली ती आझमचाचापासूनच. कधी-काळी चाचा वेरूळला होता. तिथंच त्यानं त्या काळी इंग्रजी शाळेत थोडं शिक्षण घेतलं होतं, आणि इतिहासाच्या आवडीमुळं, आणि इंग्रजी येत असल्यानं, नजरेत भरला गेला आणि अजिंठ्याचा गाईड झाला, अशी काहीशी ही कहाणी. आधी एकदा रमेशभाईंनी सांगितलेली ती कहाणी चाचाच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी वाट वाकडी करून अजिंठा गाव गाठलं होतं.
***
आझमचाचा. अवघ्या दोन खोल्यांच्या त्या घरात बुढा-बुढीचं आयुष्य गेलं होतं. पाणीपुरवठा खात्याच्या वसाहतींमध्ये आझमचाचा! हे एक आश्चर्यच होतं. ब्रिटिशांच्या काळालाच शोभेल असं. चाचाचा पाणीपुरवठाच काय, कोणत्याही सरकारी खात्याशी काहीही संबंध नव्हता. तो अजिंठ्याचा गाईड असला तरी सरकारच्या सेवेत रूढ पद्धतीनं नव्हता. सरकारशी त्याचं नातं बरंचसं कंत्राटी पद्धतीचं. पण त्याच्यासारखा गाईड अजिंठ्यात असावा असं सरकारला वाटत होतं आणि म्हणून सरकारनं अपवाद करून त्याची त्या क्वॉर्टरमध्ये सोय लावून ठेवली होती. मी चाचाला भेटलो तेव्हापर्यंत त्याचं सुमारे पन्नासेक वर्षांचं वास्तव्य त्या घरात झालं होतं.
दोन खोल्यांपैकी एक स्वैपाकघर असल्यानं खरं तर ते घर एकाच खोलीचं म्हणायचं. दहा बाय दहाच्या त्या बाहेरच्या खोलीत एक बाज असावी. चाचाचे पाच-सहा फोटो असावेत. काही कागदपत्रांच्या फाईल्सही दिसत होत्या. जुनाट एक-दोन पुस्तकंही होती. जाडजूड, आजच्या भाषेत ठोकळे म्हणावीत अशी. बाकी काही नाहीच. अखेर बुढा-बुढीचा व्याप किती असावा? चाची आत स्वैपाकघरात मग्न होती. रमेशभाईंनी त्यांनाही हाक घातली तेव्हा त्या बाहेर आल्या. रमेशभाईंच्या भेटीनं त्यांनाही अतीव आनंद झालेला दिसत होता. चाची चांगलीच उजळ होती. वय चाचाच्या मागचंच.
दिवस हिवाळ्याचे असल्यानं चाचींनी आमच्यासाठी लगेचच पाणी गरम करायला ठेवलं. मला कसंसंच वाटलं, त्यांच्याकडून पाणी गरम करून घ्यावं यामुळं. पण त्यांच्या आदरातिथ्यापुढं इलाज नव्हता. दहा मिनिटांनी आम्ही गरम पाण्यानं हात-पाय धुवून घेतले. तेवढ्यात भाई आणि चाचा यांचं काही बोलणं झालं असावं. त्या वेळेपर्यंत चाचींनं रोट्या टाकण्यास सुरवात केली होती. त्याची खबर बाहेर आलेल्या दरवळानं दिली होती. आम्ही तिघंही चालतच बाहेर पडलो. पावलं गावाकडं वळली. साताठ मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही खाटकाच्या, त्या गावातील बहुदा एकमेव, दुकानापाशी आलो. मटण घेतलं आणि पावलं माघारी वळली.
चाचा आणि भाई यांचा ऋणानुबंध खूप जुना. त्यामुळं दोघंही रमले होते जुन्या आठवणीत. विषय घुटमळत होता तो गाणं, नृत्य, शिल्पकला, चित्रकला अशा सांस्कृतिक क्षेत्रांमध्येच. मधूनच काही नावं झळकायची. ती सारी मी आधी ऐकली होती. त्यापैकी एकाशी माझा वैयक्तिक ऋणानुबंधही जुळला होता. पण माझ्या आणि भाईंच्या चर्चेत त्या नावांना जितके आयाम मिळत असत, त्यापेक्षा अधिकच आयाम आत्ता या चर्चेत मिळत होते.
घरापाशी आलो. चाचींनी मटण करायला घेतलं तेव्हा अंधार पडला होता. गाव उंचावर होतं. स्वच्छ चांदणं पसरू लागलं होतं. चाचानं एक मोठी सतरंजी काढली आणि दारासमोर टाकली. बाहेरच गारव्यात बसूया असं म्हणत. चाचा जुन्या फौजी परंपरेचा. त्यामुळं खास त्याच्यासाठी भाईंनी ‘ओल्ड मंक’ घेऊन ठेवली होती. मटण शिजू लागलं आणि इकडं मैफल रंगली.
***
सत्तरी ओलांडलेल्या चाचाच्या आयुष्यात वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न मला त्या रात्री आम्ही दीड वाजता मैफिलीतून उठलो तेव्हा पडला. मी खरं तर तिथं गेलो होतो ते चाचाशी बोलायला. म्हणजे प्रश्न विचारण्याची भूमिका माझ्यासाठी असावी हे माझ्यादृष्टीनं गृहित होतं. प्रत्यक्षात मला प्रश्न विचारावेच लागले नाहीत. मी अनुभवलेली ती अशी पहिली मुलाखत होती, जिथं मुलाखत देणारा मुलाखत घेणाऱ्यासच प्रश्न विचारायचा आणि त्याचं अज्ञान दूर करण्याचं काम करत स्वतःचं जीवन मांडून ठेवायचा. सुरवात झाली तीच मुळी गंमतीदार. विषय भाईंच्या मूळ गावाचा निघाला. तिथली राष्ट्रीय शाळा वगैरे. गुरूजींच्याही नावाचा उल्लेख झाला. यातलं थोडं फार कानावर पडलं होतं ते मी आठवू लागलो आणि अचानक चाचानं तीरासारखा मला प्रश्न विचारला तो त्या शाळेच्या इतिहासाविषयी. माझं अज्ञान उघडं पडण्यास वेळ लागला नसताच. त्यामुळं मी ते कबूल करून टाकलं आणि सुटका करून घेतली. पण तेवढ्यात माझ्या लक्षात येऊन गेलं की भाईंनी चाचांविषयी जे सांगितलं होतं, ते पुरेसं नव्हतं. म्हणजे भाईंनी सांगितलं होतं त्यापेक्षा चाचाचा व्यासंग मोठा आहे, या अर्थानं.
चाचाची रसवंती सुरू झाली ती त्या शाळेच्या स्थापनेच्या इतिहासातून. भारतीय स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांचा काळ, महायुद्ध, गांधीजी, राष्ट्रीय शिक्षणाचा विचार, त्यातून काही शाळांची स्थापना, त्या शाळेचा प्रवास, स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्या शाळांची झालेली स्थिती हे सगळं सांगत चाचानं भारतीय माणूस इतिहासाची हेळसांडच करतो, असं सांगून टाकलं. मी ऐकत गेलो. त्या पलीकडं काही करण्यासारखं नव्हतं. मध्ये फक्त भाईंची एखाद-दोन वाक्यं असायची. सांधेजोड म्हणावीत अशी. भाईंच्या त्या शाळेत कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या अनुषंगानं बोलताना चाचाला कलांची माहिती किती आहे हे समजलं तेव्हा मी थोडा चकीत झालो. संगीताची बऱ्यापैकी जाणकारी असणारी माणसं भेटणं तसं दुर्मिळ नसतं. चित्रकलाही कळणारी भेटतात. तसं एकेका कलेतील माहिती असणारी माणसं भेटतातच. पण एकाच वेळी अशा प्रत्येक कलेविषयीची माहिती जाणकारीनं मांडणारी माणसं विरळाच.
चाचानं तो विषय संपवताना पुन्हा मलाच प्रश्न केला. ब्रिटिशांच्या काळच्या कोणा कलेक्टरचा उल्लेख त्यानं केला. ‘माहिती आहे का?’ त्यानं विचारलं होतं. मी अज्ञानीच. ‘तुम जहां काम करते हो उस जिलेका कलेक्टर था ये.’ मग सुरू झाली त्या कलेक्टरनं केलेल्या कामाची माहिती. आणि त्यानिमित्तानं चाचानं मला फिरवून आणलं त्या काळाच्या, म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या पहाट-सकाळीच्या, प्रहरांमध्ये. अगदी लीलया चाचा जुन्या पिढीतल्या आणि समकालीन इतिहासलेखकांची नावं घ्यायचा. तो जे सांगत होता, त्यात ब्रिटिशांचं गुणगान नव्हतं. किंबहुना कोणताही आविर्भाव किंवा पवित्रा त्यात नव्हता. चाचा सांगत होता ते फक्त त्या-त्या काळात काय घडलं आणि कसं घडलं हेच. त्यात रंगभरणी नव्हती. इतिहास, इतिहास म्हणतात तो हाच हाही आविर्भाव नव्हता हे आणखी एक विशेष.
हे एक बरं झालं होतं. चाचाकडं इतिहासाचा आरंभ एकदम काही शतकं मागं झाला नव्हता. अगदी आपल्यापासूनच सुरवात करत चाचा हळुवार मागं गेला होता. मग मागं जाता-जाता त्यानं त्याचीही कहाणी मध्येच पेरून सांगून टाकली होती. बहुदा त्यानं सांगितली नसावी, ती त्याच ओघात आली असावी. कारण त्याच्या काळात चाचा स्वतःला वेगळं ठेवून विचारच करू शकत नसावा. पण तो स्वतःचाच विचार करतोय, असंही नव्हतं. ‘उस वक्त हम फलाणा-फलाणा काम करते थे… फलाणे जगह थे… फलाणा स्थिती थी…’ असलाच काय तो त्याचा स्वतःचा तपशील असायचा. (फलाणा हा त्याचा आवडीचा शब्द असावा, असं वाटावं इतक्या वेळा तो संवादात यायचा.) मग त्याही पलीकडं त्यानं जावं यासाठी आपल्यालाच एखादा प्रश्न विचारावा लागायचा. त्यातून तो बोलला तर बोलला.
मध्ये केव्हा तरी रोट्या झाकून ठेवल्या आहेत, असं सांगून चाची झोपी गेली होती. आम्ही उठलो तेव्हा चंद्र माथ्याकडं सरकू लागला होता. चांदण्यांचा प्रकाश आणखी स्वच्छ झाला होता. माझ्याही डोक्यात पुढच्या सकाळपासून आपल्या पदरी काय पडणार आहे याचा प्रकाश पडू लागला होता.
***
चाचा बिडी प्यायचा. ती पिण्याचीही एक पद्धत होती. चाचा अनामिका आणि अंगठ्यानं बिडी ओठात धरायचा. झुरका घेऊन झाला की, मग बिडी एरवी सिगरेट पकडली जाते तशी त्या दोन्ही बोटांच्या बेचक्यात यायची. त्याच्यासमोर मी माझं सिगरेटचं पाकीट केलं तेव्हा त्यानं ते हलकेच बाजूला सारलं. उलट आपलं बिडीचं बंडल आमच्यासमोर केलं. मग पाचेक मिनिटं त्यानं बिडी आणि सिगरेट यांचे (नसलेलेच) फायदे आणि खूप तोटे याविषयीही बोलून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सिगरेट बॅगेत ठेवल्या आणि बिडीलाच जवळ केलं.
***
आझमचाचा. गावातील त्याच्या घरी पहिली सकाळ उजाडली तेव्हा आमचा कार्यक्रम ठरला होता. आदले दिवशी चाचा म्हणाला होता की जीप किंवा बसनं जाऊ. एम-८० वर त्रास होण्याची भीती त्याला वाटत होती. पण सकाळी त्यानंच कार्यक्रमात बदल करून एम-८० वर येण्यास मान्यता दिली होती. कार्यक्रम किमान तीन दिवसांचा होता. तो ठरण्याचं कारणही तसंच होतं.
अजिंठ्यात गाईड करण्याचं काम चाचानं थांबवलं त्याला काही वर्षं झाली होती. ‘अब लोगोंको एक दिनमें सब चाहीये. अजिंठाका इतिहास एक दिनमे कैसे पुरा होगा?’ चाचाचा बिनतोड सवाल होता. एका दिवसात अजिंठ्याचा इतिहास सांगणं हा त्याच्यावरच अन्याय असायचा. त्यानं ते बोलूनही दाखवलं. चाचा गाईड झाला होता तो परिस्थितीमुळं. पण त्याला मुखोद्गत असणारा इतिहास त्या विषयाच्या काही प्राध्यापकांना (मी जबाबदारीनं हा शब्द वापरतोय. खऱ्या अर्थानं प्राध्यापक. अधिव्याख्याता पदावर राहून प्राध्यापक हे बिरुद मिरवणाऱ्यांचा तर चाचाच्या संदर्भात विचारही होऊ शकत नाही) चाचानं लाजवलं असतं. इतिहासाचा असा चालता – बोलता कोश तो. एकेका दिवसात काही रुपये कमावण्यासाठी गाईडगिरी करणं शक्यच नव्हतं त्याला. पोपटपंची करीत इतिहास सांगणाऱ्यांचा त्याला संताप होता. त्यामुळं त्यानं ते काम थांबवून दिलं. आता तो गाईड म्हणून काम करायचा ते फक्त मोजक्या लोकांसाठीच. हे मोजके लोक म्हणजे कोणा-ना-कोणा तज्ज्ञाच्या शिफारशीसह आलेले चोख संशोधक. शिफारस हा शब्द चुकला. चाचानं अशा लोकांसाठी लावलेली ती चाळणी असायची. त्याचे हे सुहृदच एखाद्या संशोधकाला चाचा गाईड करेल की नाही याचा अंदाज घेऊन त्या व्यक्तीला पुढं पाठवायचे. मग त्यांच्यासाठी चाचा आठ दिवसांचा अजिंठा अभ्यासवर्ग चालवायचा. एकावेळी बहुदा एकच संशोधक. कोणी गट करून आलंच आणि तितका वेळ देणार असेल तर त्यांच्यासाठी. रोज गुंफा गाठायच्या. दिवसभर त्याचं बोलणं चालू असायचं. एकेका गुंफेत किमान अर्धा ते पाऊण तास. काही खास ठिकाणी चाचा तास ते सव्वातास घ्यायचा. संध्याकाळी घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा लेण्यांची वाट. आठ दिवसांपेक्षा कमी काळासाठी संशोधकांना गाईड करणार नाही, हा नियम त्या काळात चाचानं जीवापाड जपला होता. चाचाचं हे अजिंठाप्रेम लेण्यांपाशी आमची एम-८० आली तेव्हाच मला दिसून आलं. गाडी पार्क केली आणि मी लेण्यांच्या दिशेनं वळलो. चाचानं रोखलं. ‘ऐसे नही,’ त्यानं मला बाजूला नेलं. लेण्यांकडं जाणारी वाट उजव्या हाताला ठेवून तो थोडं मागं गेला. आणि म्हणाला, ‘इथून उंची पाहून ठेव. बाकी रात्री सांगेन.’ मग तिथंच उभं राहून त्यानं लेण्यांविषयी प्राथमिक माहिती सुरू केली.
अजिंठा म्हटलं की, चित्रं, रंग, बुद्धाची कथा आणि शिल्पकला… पण नाही. चाचानं सुरवात केली तीच माझी विकेट घेत. चाचा शिरला तो थेट वास्तूरचनाशास्त्रामध्ये. “गुंफांचं वास्तूरचनाशास्त्र आणि माणूस एरवी करतो त्या बांधकामाचं वास्तूरचनाशास्त्र नेमकं उलटं असतं. एरवी तुम्ही पायापासून कळसाला जाता. इथं आधी छत आणि मग पाया असं काम होतं…” चाचा बोलू लागला. मग त्या काळच्या या शिल्पींना दगडाचं ज्ञान कसं असेल, त्यातील त्यांची प्रगती अगदी आजच्या माणसांपेक्षाही पुढची कशी आहे हे सांगून झालं. कारण स्पष्ट होतं. दगडात कोरलेली ही शिल्पं आहेत आणि गुंफांचं हे काम उलटं करावं लागतं. म्हणजे वरून खाली, पुढून मागे या क्रमानं. अर्धं काम केल्यानंतर पुढचा दगड खराब, कमी मगदुराचा निघाला तर आधीचं कामही वाया जायचं. ते जाऊ न देता ही लेणी झाली आहेत म्हणजेच ते शिल्पी ‘आज हम जिसे ज्यॉलॉजी कहते है, वो ये लोग जानते थे. ऐसा लगता है की, वो हमसे भी एडव्हान्स्ड थे.’ मग चाचानं सुरू केली सह्याद्रीची ‘ज्यॉलॉजी’. बेसॉल्ट, लाव्हा फॉर्मेशन वगैरे सांगता सांगता देशातील सर्व प्रसिद्ध गुंफा महाराष्ट्रातच आहेत आणि त्यांची संख्या जवळपास १५०० आहे, अशी सामान्य ज्ञानात भरही टाकून तो गेला. “बिल्डींग आर्किटेक्चरमें अगर कुछ बिगड गया तो यू कॅन रिजेक्ट द ब्लॉक अँड रिप्लेस बाय अनादर वन. मगर यहां केव्ह आर्किटेक्चरमें वो सहुलियत नही है. तो इससे मालूम होता है की, ये काम डेडिकेशनका है.” हे चाचाचे शब्द त्या शिल्पींविषयीच्या घनगर्द आदरातून निथळत येत.
केव्हा तरी चाचा इतिहासात शिरला त्यावेळी आमची पावलं पहिल्या गुंफेकडं निघाली होती. “बुद्धीझ्म जो है वो सनातन धरमकी शाख नही हो सकती. क्यूंकी सनातन ‘रिलिजन’ है. बुद्धिझ्म फिलॉसफी है. क्यूंकी इसमें गॉडका इमॅजिनेशन नही है…” बौद्ध विचारधारेची मांडणी करता करता चाचानं सांगून टाकलं, “रिलिजन इज अ वे ऑफ लाईफ विथ ब्लाईंड फेथ इन गॉड.” बुद्धिझ्ममध्ये अहिंसा आहे, पण बौद्ध भिख्खू मांसाहार करायचे आणि ही विसंगती त्यामध्ये होतीच, हे सांगण्यास तो कचरायचा नाही. बुद्धानंतर या विचारधारेमध्ये फूट कशी पडत गेली आणि मग तिच्या चार वेगवेगळ्या धारा कशा झाल्या, हा इतिहास त्याला मुखोद्गत असायचा. बिडीच्या परिणामी या बोलण्यात मधूनच त खोकायचा. पंचवीस-तीस वाक्यं झाली की, हमखास एकदा तरी. संध्याकाळी लेणीदर्शन बंद होण्याच्या वेळेस आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्या दहा गुंफादेखील ‘पाहून’ झाल्या नसाव्यात!
त्या रात्री चाचानं माझ्यासमोर अजिंठ्याच्या निमित्तानं भारतीय शिल्पकला, बुद्धाचं युग, प्राचीन भारतीय समाजजीवन यांचं चित्र उभं केलं. चित्र म्हणजे चित्रच. कोणतीही एक बाजू नाही की दुसरी नाही. भारतीय इतिहासाच्या संदर्भात ‘पूना स्कूल’ आणि ‘अलीगढ स्कूल’ या दोन धारा कशा आहेत, त्यांच्यात नेमका भेद कोणता वगैरे गोष्टी माझ्या कानी पहिल्यांदा पडल्या आझमचाचाकडून त्या रात्रीच. अजिंठ्याची लेणी बौद्ध परंपरेची आहेत असं मानणारा एक वर्ग आणि त्याला विरोध करणारा दुसरा वर्ग या दोन्ही बाजूही चाचाकडूनच समजल्या. इतिहासाकडं पाहण्याची चाचाची स्वतःची एक दृष्टी होतीच. ती यापैकी एका ना एका धारेचीच होती. पण चाचानं ते जाणवणारही नाही अशा पद्धतीनं दोन्ही धारांची मांडणी केली होती. अर्थात, एकदा मांडणी करून झाली की मग त्यानं आपण कोणती धारा मानतो आणि ती अधिक सयुक्तिक का, हेही सविस्तर सांगितलं होतं. अनाग्रही भूमिकेतून.
बोलता-बोलता केव्हा तरी चाचाचा प्रवेश माणसाच्या जन्माचं प्रयोजन काय हा प्रश्न घेऊन तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात झाला. या क्षेत्रात माझा त्यावेळी बालवाडीतही प्रवेश झालेला नव्हता. पण चाचाचं एक बरं होतं. तो नुसता पुस्तकी पंडित नव्हता. त्यामुळं तो जे बोलायचा ते तुमच्या-माझ्या भाषेत असायचं. त्यामुळं माझा तो बालवाडीप्रवेश कदाचित त्याचवेळी झाला असावा (मी तिथून आजही फारशा यत्ता पुढं आलेलो नाही हा भाग अलाहिदा).
चाचा अस्सल फौजी परंपरेचाच. त्यामुळं त्या रात्रीही गप्पांसोबत ओल्ड मंक होतीच. अंगावर काटे आणणारा गारठा, स्वच्छ चांदणं, वर डोळे करून पहावं तर चांदण्याच चांदण्या. डोक्यावर येणाऱ्या त्या पाण्याच्या टाक्यांच्या सावल्या. टेकायला छोटे तक्के. केव्हा तरी ओल्ड मंक संपली आणि मैफल अर्धीच असल्याची जाणीव तिघांनाही होऊन गेली. रस्ता ओलांडून मी थेट समोर गेलो. संध्याकाळी त्या दुकानाची पाटी दिसली होती. ‘देशी रम’ हा प्रकार त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चाखला. चाचाला आता थांबवणं शक्य नव्हतं इतका तो बौद्ध भिख्खुंनी आठेक शतकं खपून ही लेणी कशी कोरली असावीत हे सांगू लागला होता. दुपारी पाहिलेल्या एकेका लेण्याचं वैशिष्ट्य परत त्याच्या या कथनातून समोर उभं रहात होतं. दुपारी चाचानं लेण्यांतील रंग त्या काळात कसे बनवण्यात आले असावेत हे सांगितलेलं होतं. नैसर्गिक अशा त्या रंगांचं जतन आजच्या अतिशय प्रगत काळातही कसं अशक्य ठरत होतं हे आत्ता रात्री सांगताना त्याच्या डोळ्यांत पाणी यायचंच काय ते बाकी होतं. बहुदा त्याचवेळी त्यानं आम्हाला निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याविषयीही जाता-जाता बरंच काही सांगितलं होतं. त्या काळात ग्लोबल वॉर्मिंग हा शब्दही तिथं त्याच्या कानी पडला नसावा, पण पर्यावरणाची समस्या कशी माणसाला खाऊन टाकते आहे हे सांगताना तो त्यातही कुठंही कमी नव्हता हे जाणवायचं. चाचा काही तज्ज्ञ नव्हता. केवळ कान, नाक, डोळे उघडे ठेवून वावरणारा. अभ्यासाचं महत्त्व जाणणारा. इंग्रजी वाचून समजून घेण्यासाठी कष्ट उपसलेला होता. त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी.
भाजलेल्या आणि उकडलेल्या शेंगा खात-खात ती देशी रमही कधी संपली हे कळालंही नाही. सोबत होते चाचीनं बनवलेल्या चिकनचे तुकडे. काहीसं पठाणी पद्धतीनं बनवलेलं चिकन. आमच्या त्या मैफिलीमुळं तिचा खोळंबा होऊ नये, म्हणून चाचानं तिला आधीच झोपायची परवानगी दिलेली असायची. नान म्हणता यावेत अशा खुसखुशीत रोट्या आणि चिकन संपवून आम्ही उठलो तेव्हा पहाट वेशीवरच आलेली होती.
***
अजिंठ्याचं ते अभ्याससत्र तिसऱ्या दिवशी संपलं. या तीन दिवसात बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची कथा सांगताना चाचाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नंतर रमेशभाईंनी सांगितलं, त्या गुंफेपाशी चाचा आला की नेहमीच हळवा होतो. तसा तो त्या दिवशीही झाला होता. “ज्ञानेश्वरीका पाठ अगर सिखना है तो आलंदीमे भीक मांगकेही वो हो सकता है, घरका खाना खाकर नही,” असं सांगताना चाचानं त्या जुन्या काळात अजिंठ्याच्या शिल्पींनी काय कष्ट उपसले असावेत याविषयीचा त्याचा एक अंदाजही मांडून ठेवला होता.
त्या रात्रीही आम्ही चाचाकडंच मुक्काम केला होता. त्या दिवशी दुपारनंतर गुंफांचं दर्शन झाल्यानंतर अजिंठा गावाच्याही पल्याड असलेल्या व्ह्यू पॉईंटवर गेलो होतो. गेले तीन दिवस चाचाकडून त्याचं कौतूक ऐकत आलो होतो. तिथं गेल्यावर सगळ्या लेणी घोड्याच्या नालेसारख्या तुमच्यासभोवती कशा येतात त्याचं. व्ह्यू पॉईंटवरून लेणी पाहिल्या तेव्हा तिथं बसून आम्ही काही काळ गप्पा केल्या होत्या. अजिंठ्याला धरून असलेल्या कविकल्पनांवर चाचा त्या दिवशी कडाडून कोसळला होता. असल्या कविकल्पनांच्या प्रमाणाबाहेरील उदात्तीकरणामुळं खऱ्याखुऱ्या इतिहासाकडं कसं दुर्लक्ष होतं ते सांगताना त्याच्यातील सच्चा इतिहासप्रेमी शब्दाशब्दांतून डोकावायचा. चाचा सांगायचा तो इतिहास सगळ्यांनाच पटेल असं नाही. पण त्याच्या इतिहासप्रेमाविषयी शंका घ्यायला तसूभरही जागा नसायची. त्याचा एकच दाखला देतो.
शिवाजी महाराज हा चाचाचा एक वीक पॉईंट. छत्रपतींचा इतिहास मिलिटरी दृष्टिकोणातून अभ्यासला जाणं कसं आवश्यक आहे हे सांगताना तो राजांच्या सुरत स्वारीची मांडणी करायचा. त्याच जोडीनं त्यानं सांगितलं होतं अफझल खानाच्या शिरकाणाचं लष्करी महत्त्व. छत्रपतींचा इतिहास सांगताना चाचा अर्थातच रूढ हिंदुत्त्ववादी धारा नाकारायचाच. पण ती नाकारतानाही तो उगाचच मोगलांचं उदात्तीकरणही करीत बसायचा नाही. त्यांचं माप त्यांच्या पदरात टाकूनच स्वारी पुढं जायची. मी चाचाला सहज विचारलं होतं देखील, ‘हे सारं तुम्ही इतक्या समतानतेनं कसं करू शकता?’ त्या प्रश्नावरच्या उत्तरातून चाचाची खरी मूस कळून चुकली होती. चाचा म्हणाला होता, ‘इतिहास म्हणजे काय? येऊन जाऊन जे झालेलं असतं त्यालाच इतिहास म्हणायचं ना? प्रश्न येतो तो इतिहास कसा झाला याच्या आकलनात. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. बस्स. तुम्हे कहना हो तो इसेही कहीये… क्या कहा तुमने… हां. समतानता.’ मी तो शब्द तसाच हिंदीत वापरला होता. त्याचा अर्थ हिंदीत काय असेल हे न उमजून.
***
आझमचाचा.
आझमचाचा आज नाहीये. पण त्यानं सांगितलेली एक कहाणी इथं नोंदवून ठेवावीच लागेल. ती आहे अजिंठ्याच्या चित्रांकनाच्या प्रयत्नांची. इतिहासावर पक्की मांड असणाऱ्या आझमचाचाची एरवीची दृष्टी श्रद्धेकडं झुकणारीही नव्हती. अंधश्रद्धेचा तर प्रश्नच नाही, असा माझा त्या चार दिवसातील आणि त्यानंतर एकदा झालेल्या पाच-साडेपाच तासांच्या भेटीतील अनुभव आहे. तरीही ही आठवण माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. त्यातील कहाणी महत्त्वाची नाही. मला ती आझमचाचाकडून समजली हे महत्त्वाचं आहे.
अजिंठ्याची चित्रं जशी दिसतात तशी ती पुन्हा कागदावर उतरवण्याचे आजवर ज्ञात असे तीन प्रयत्न झाले आहेत. तिन्ही प्रयत्नांमागे एक प्रतिअजिंठा उभारण्याचा आधुनिक माणसाचा हेतू होता. एक प्रकारे ते एक आव्हानच. काही शतके टिकणारी चित्रं जतन करण्यासाठी असं काही करणं हे आव्हानच. आज पर्यटकांना म्हणून जी माहितीपुस्तकं दिली जातात, त्यासोबत येणारी छायाचित्रं अशाच शेवटच्या प्रयत्नांतील आहेत. या तीनापैकी एक प्रयत्न ब्रिटिशांच्या काळात झाला. काढलेली चित्रं बोटीनं नेली जात होती, ब्रिटनला. प्रवासात बोटीला आग लागली आणि चित्रं जळाली. दुसरा प्रयत्न ज्या चित्रकाराकडून होणार होता, त्यांचं निधन झालं ते हा प्रकल्प हाती घेताच आणि प्रकल्पही कोलमडला. तिसरा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर झाला. त्यावेळी काढलेल्या चित्रांचेच फोटो बनून आजही लोकांसमोर आहेत. पण त्याही कापडावर उतरलेल्या चित्रांचं दुदैर्व असं की तीही अडगळीत पडली आहेत. चाचा म्हणायचा की, अजिंठ्याच्या या चित्रांचं दुर्दैव असं की ती तिथल्याच एका गुहेत स्टीलच्या नरसाळ्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. जेव्हा झाली तेव्हापासून. आज ती कशी असतील हा आपला प्रश्न चाचाच्या पुढच्याच वाक्यात विरून गेलेला असतो. ‘अजिंठ्याच्या चित्रांकनाचं – आणि चित्रांचंही – दुर्दैव म्हणजे त्यांची तशीच आवृत्ती चित्रांच्या स्वरूपात टिकूच शकलेली नाही. तुम्ही पाहता ते फक्त फोटो. कितीही केलं तरी कृत्रिमच.’
***
चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता. तीन दिवसांनंतर ते मला समजलं. राजकारण हा तो विषय असावा. त्या तीन दिवसांत त्या विषयाचा चाचाच्या बोलण्यातून एकदाही उल्लेख झाला नव्हता. किंबहुना आपल्या इतर विषयांत चाचानं इतकं गुंगवलं होतं की एरवी सकाळी पेपर नसेल तर अस्वस्थ होणारा मी, ते तीन दिवस पेपर न वाचताही निवांत काढले होते. काहीही चुकल्यासारखं झालं नव्हतं मला.
***
आजही केव्हाही कुठंही अजिंठा हा विषय निघाला की मी हळवा होतो, चाचाच्या आठवणीनं. चाचाइतकंच आठवतं ते त्याचं समरसून होऊन अजिंठ्याचा इतिहास मांडणं. त्याहून आठवतात ते त्याचे पाणावलेले डोळे… बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची कथा सांगतानाचे… अजिंठ्याच्या चित्रांकनाचा इतिहास सांगतानाचे… या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे… मिचमिचे… खोलवर आत गेलेले…