पिंजारी

सप्टेंबर 4, 2010

काही वर्षांपूर्वी, उन्हाळ्यात केव्हा तरी, एक फॅक्स…
“नवी गावं आपल्या कामाला जोडून घेतेय. येशील का? पेवलीपासून सुरवात. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, राहून गेलं…”
रजनीनं पेवलीत पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा त्या गावात दुफळी पडल्याचं तिला दिसलं होतं. दुफळी म्हणजे माणसांच्या संदर्भातील नव्हे. गावातून एक ओहोळ जात होता. पुढं तो खाली एका नदीला मिळत होता. या ओहोळाच्या दोन्ही बाजूंना गाव वसलं होतं. ही ती दुफळी.
बचत गट, बालशिक्षण असं काम सुरू करून सहा वर्षे होत आली होती. या काळात काही गावं संस्था-संघटनेला जोडली गेली होती. पहिल्या वीस गावांमध्ये केवळ तेथील लोकांच्या जोरावर उभ्या केलेल्या कामांतून काही गोष्टी पदरी पडल्या होत्या. त्यातच एक म्हणजे बालहक्क समितीकडून मिळालेला अनौपचारिक बालशिक्षणाचा प्रकल्प. त्या जोरावर आणखी काही गावं जोडून घेणं शक्य झालं होतं. आता आणखी विस्तार रजनीला खुणावू लागला होता. त्यामुळं आजवर संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिघावर असलेली गावं जोडून घेण्याचा हा प्रयत्न. त्यातून पेवलीत प्रवेश.
पेवलीचे गुलाबसिंग याआधी रजनीला भेटले होते. “गुलाबकाका”. खरं तर, बऱ्याच ते काळापासून ‘गावी ये’ असं म्हणत होते, ते आजवर जमलं नव्हतं. आता जमलं. तेही पुढच्या गावाला जाण्याचा नेहमीचा वाकडा रस्ता टाळून सरळ रस्त्यानं पण थोडं चालत जाण्याचा निर्णय केल्यानं. गावात आल्यानंतर रजनीला ते चालणं सार्थकी लागल्यासारखं वाटलं. चाळीस उंबऱ्याचं गाव. म्हणजे संघटना उभी करण्यासाठी तसं कठीणच. कारण घरांची संख्या जितकी जास्त, तितका हितसंबंधांचा गोंधळ. उत्तरेला एक मोठी डोंगररांग. त्याच रांगेतून येणारा ओहोळ, आणि तो मिळायचाही त्याच रांगेतून येणाऱ्या नदीला. दक्षिणेकडून गावात शिरलं की, पहिल्या घरापासून डोंगराच्या दिशेनं असलेल्या जमिनीच्या सुमारे दीडेक मैलाच्या विस्तारात शेती. अधूनमधून बऱ्यापैकी टिकलेला झाडोरा. मोह, आंबा, साग. शेती आणि घरं हे अद्वैतच. त्यामुळं एकगठ्ठा वस्ती हा प्रकार नाहीच.
दुपारच्या सुमारास गुलाबकाकांच्या घराच्या पडवीत रजनी पोचली; त्यांनी बाज आणून बाहेर टाकली. पाणी आलं.
“रामराम ताई. आधी जेवून घे. मग लोक येतील. मग बोलू.” गुलाबकाकांनी लोकांना सांगून ठेवलेलं असावं. रजनीच्या चेहऱ्यावर समाधानाची थोडी लाट आली. पाणी घेऊन ती थेट घरात शिरली.
दारातून आत पाऊल टाकलं तसा आधी सामोरा आला अंधार. बाहेरच्या कडक उन्हातून आल्यानं डोळे सरावण्यासाठी थोडा वेळच लागला. मग तिचं लक्ष गेलं. नीट सारवलेली जमीन. मोठ्या विस्ताराची खोली. मध्यभागी दोरीच्याच पाळण्यात एखादं बछडं असावं. तिनं पुढं नजर टाकली. तिशीच्या आसपासची तरुणी समोर आली. हात जोडून नमस्कार करत आणि मनापासून हसत. रजनीनंही हात जोडले आणि पुढं होतं त्या तरुणीचे जोडलेले हात हाती घेतले आणि मग गळाभेट झाली.
“मी पिंजारी,” आवाज दमदार होता.
ही काकी नक्कीच नाही. काका पंचेचाळीशीच्या आसपास आहेत. रजनी विचारात होती तितक्यातच आतून आणखी एक बाई पुढं आल्या. पुन्हा तेच. हात जोडून दिलखुलास हसत नमस्कार वगैरे.
तितक्यात गुलाबकाका आत आले. “ताई, ही माझी बाई, वेरली. ही पिंजारी. आपल्या डोंगऱ्याची मुलगी.”
अच्छा, रजनीला काही तरी अंधुकसं आठवलं. ती विचारात पडली, पण पहिल्या क्षणात काही आठवेनासं झाल्यावर तिनं तो नाद सोडला. काही असेल तर पुढं कळेलच ही नेहमीची वृत्ती. तेवढ्यात काकींनी जेवण वाढल्याचं सांगितलं. जेवण आटोपून सारे बाहेर आले. अंगणातून लोकांचे आवाज यायला सुरवात झाली होती.
रजनी खुश होती. गावातील पहिल्याच बैठकीला पन्नासच्या आसपास उपस्थिती. त्यातही वीसेक महिला. संघटनेच्या ताकदीचं खरं मर्म त्यांच्यातच. गुलाबकाका सुरवातीला बोलले. रजनी कोण वगैरे त्यांनी सांगून घेतलं. संघटनेच्या जोडीनं संस्थेमार्फत सुरू असलेली धान्यबँक, बचतगट यासारखी कामं याविषयी रजनीची सहकारी उर्मिला बोलली. आणि मग रजनीकडं सूत्रं आली.
“मी भाषण करणार नाही. कारण मी भाषण करत नाही. मी तुमच्याशी बोलणार आहे,” अलीकडं ठेवणीत आलेली ही तीन वाक्यं. रजनीला ठाऊक होतं, एकदम तिन्ही वाक्यांचा परिणाम तसा होत नाही. तरीही ती ही वाक्यं तशीच बोलते. मग पदर खोचून घ्यायचा आणि गावातल्या म्होरक्याकडंच मोर्चा वळवायचा. इथंही तेच. गुलाबकाकांकडं पहात तिनं सांगितलं, “काका, तुम्हीच गावाची माहिती द्या. गाव किती मोठं आहे, लोकसंख्या किती आहे, शेती कशी होते, पाणी कुठून येतं, रेशन आहे का, शाळा आहे का…” हे प्रश्न हेच ठेवणीतलं अस्त्र. जरी म्होरक्याला बोलायला सांगितलं तरी, आता गावातला प्रत्येक जण बोलू लागतो आणि त्यातही महिला वर्ग भले आपल्याला उद्देशून नाही, पण ऐकू जाईल अशा आवाजात कुजबूज करू लागतोच. या गावात वेगळं काही होण्याचं कारण नव्हतं.
थोडा वेळ गेला आणि बायकांच्या घोळक्यातून अचानक गाण्याचे सूर उमटले. रजनीनं तिथं पाहिलं. एकच सूर नव्हता, इतरही काही त्यात मिसळत होते. मुख्य सूर मधून येत होता आणि तो चेहरा तर इतर चेहऱ्यांच्या आड होता.
“पुढं ये. सगळ्याच या. आपण सगळे गाणं म्हणूया,” रजनीचं हे आवाहन पुरेसं नव्हतं. काहीच हालचाल नव्हती, पण बोल सुरू होते. पुरूष मंडळींना तोंड त्या दिशेला करण्यास सांगत ती स्वतः घोळक्याकडं गेली आणि चमकली. मघा दमदार वाटलेला आवाज आता गाण्याचा आवाज झाला होता. तिला पुढं आलेलं पाहून पिंजारी लाजली आणि थांबली. रजनीनं पुढं होऊन तिच्या शेजारीच जागा करून घेत बसकण मारली आणि सांगितलं, “म्हण गाणं.”
पिंजारीनं पुन्हा आरंभापासून सुरू केलं. आणि पंधरा मिनिटांत रजनीला गावाची एक वेगळीच सैर घडवून आणली. गाणं उत्स्फूर्तच होतं. या भागातील महिलांच्या अंगी असलेला एक वेगळाच गुण हा. बोलता-बोलता रचना करतच गाणं गात जायचं. त्यातून आपली जीवनकहाणी मांडायची. पिंजारीनं तेच त्या दिवशी त्या गाण्यात केलं होतं. तिनं पेवलीपासून – पेवली म्हणजे या गावाला जिचं नाव मिळालं ती नायिका, या गावाची संस्थापक; तिची कहाणीही विलक्षणच! – तर पेवलीपासून सुरवात करून आजच्या घडीपर्यंतचा गावाचा प्रवास पिंजारीनं मांडला त्या गाण्यातून; मग पेवलीच्या मुलानं लावलेलं एक झाड, त्यातून उभं राहिलेलं आणि पुढं कापलं गेलेलं जंगल, गावाचं जगणं आणि तिचं जगणं, त्यातल्या हाल-अपेष्टा, त्यातली सुखं-दुःखं असं सारं काही त्या गाण्यामध्ये आलं आणि पुढं रजनीला आणखी काही समजून घेण्याची गरज राहिली नाही. पुढच्या प्रक्रिया होण्यास केवळ गावकऱ्यांच्याच होकाराची आवश्यकता होती.
मानव मुक्ती वाहिनीची आणखी एक शाखा त्यादिवशी स्थापन झाली. पेवलीत.
***
पावसाळा, दूरध्वनीवरून…
“तू पेवलीत कधी येणारेस? स्वातंत्र्यदिनी जमव. पिंजारीला भेटलं पाहिजेस. हिरा सापडला आहे आपल्याला…”
स्वातंत्र्याचा वर्धापनदिन शक्य असेल तर नव्यानं जोडलेल्या एखाद्या गावातच करण्याचा एक शिरस्ता रजनीनं पाडून ठेवला होता. स्वाभाविकच त्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनासाठी पेवली. त्यासाठीचं मला निमंत्रण. त्या भागाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमातून मला खूप काही मिळू शकतं असं रजनी नेहमी म्हणायची. त्यानुसारच आलेलं हे निमंत्रण.
स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी रजनी जाणीवपूर्वक गावात गेली. तयारी अशी मोठी नसते. तिरंगा खादी भांडारातून मिळतो, ध्वजस्तंभ उभा करण्याचं काम अर्ध्या तासाचं. मुलांसाठी जाता-जाता तालुक्याच्या गावातून खाऊ घेता येतो. तरीही बैठक. बैठक घेण्याचं कारण, गावकऱ्यांचा सहभाग. हा कार्यक्रम गावकऱ्यांनीच करावयाचा हा कटाक्ष. त्याच्या तयारीसाठी बैठक. अशी बैठक लावली की माणसांचं मोराल टिकून राहतं, ते वाढवता येतं हे रजनीला ठाऊक होतं.
गुलाबकाकांचं घर हेच आता गावातलं कार्यालय झाल्यासारखं होतं. या गावातली पहिली धान्यबँक स्थापन करून स्वातंत्र्याचा पुकारा करावयाचा असं कार्यक्रमाचं स्वरूप ठरलं. धान्यबँकेसाठी नावं नोंदवणं वगैरे प्रक्रिया सुरू झाली आणि काकांच्या पडवीत पिंजारीसह इतर काही बायकांसमवेत रजनी बसली. सुरू झाल्या एकमेकींना समजून घेणाऱ्या गप्पा. त्यातून पुढं आली पिंजारीची कहाणी.
***
पिंजारी. नावात काय आहे, असं कोणीही म्हणेल. विशेषतः पिंजारी या नावात तर हटकूनच. नुसत्या नावावरून काहीही बोध होणार नाही हे स्पष्ट आहे. वय वर्षं तीस-एकतीस. त्या गावात तिच्या पिढीतील कोणालाही आपलं वय नेमकं सांगता येत नाहीच. कधी-काळी सरकारच्या कृपेनं त्या गावात गेलेल्या डॉक्टरनं शरीरशास्त्राच्या त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तिच्या पिढीतील प्रत्येकाचं वय अंदाजे काढलेलं असावं. त्या आधारे गावाचा कारभारी प्रत्येकाचं वय सांगतो, तसंच पिंजारीचंही वय रजनीला सांगितलं गेलं आणि म्हणूनच ते समजलं होतं. अन्यथा त्याची नोंद तशी वेगळी करण्यातही फारसं हशील नाही हेही खरंच.
आई पिंजारीच्या लहानपणीच गेली होती. ही एकटी. बाप मजुरीसाठी शहराकडं गेला. येताना आधी दमा घेऊन आला. मग पुढं त्याला झाला क्षय. अर्थात, त्यातही फारसं नवल नव्हतं. त्या परिसरातील अनेकांचा तो जिवाभावाचा साथीदारच होता. त्यामुळं पिंजारीच्या बापावर, म्हणजेच डोंगऱ्यावर, क्षयानं ‘कृपाछत्र’ धरलं तेव्हा त्याची त्या वंचित जगण्यातून सुटका होण्याचीच सुरवात झाली होती – अखेरीचा आरंभच म्हणायचा तो. अर्थात, ही सुटका काही सोपी नसते. जगण्यापासून सुटका करून घेण्याची माणसाची इच्छाशक्ती किती जबरदस्त आहे याचीही तिथं कसोटी पाहिली जाते. तशीच कसोटी डोंगऱ्याचीही पाहिली गेली. एक-दोन नाही; सहा वर्षं! त्याचीच एकट्याची नाही. त्या क्षयानं पिंजारीच्या जगण्याच्या इच्छाशक्तीचीही पुरेपूर कसोटी पाहिली. बापाची शुश्रुषा, आपलं वंचित जगणं सावरण्याचा प्रयत्न अशा दोन आघाड्यांवरच्या लढाईतून तरून राहण्याची तिची इच्छाशक्ती. त्या इच्छाशक्तीची कसोटी.
या सहा वर्षात डोंगऱ्या आणि पिंजारी हीच काय ती त्यांच्या उंबऱ्यात असणारी माणसं होती. बाकी गुलाबकाका, काकी येऊन-जाऊन असायचे. इतर मंडळी आपापल्या व्यापात. बापाचं दुखणं पिंजारीनं एकटीनं काढलं. शेत सांभाळून. त्याचं औषधपाणी करण्यासाठी दर महिन्याला ती पंधरा मैल चालत जायची तालुक्याच्या गावाला – रामपूरला. सकाळी निघायची आणि संध्याकाळी औषध घेऊन परतायची. शेतीचं काम करण्यासाठी गुलाबकाका आणि एक-दोन घरांची मदत. बाकी मात्र एकटीच्या बळावर. डोंगऱ्या अखेर त्या कसोटीला उतरला आणि क्षयानं त्याची सुटका केली. पिंजारीही सुटली एक प्रकारे. डोंगऱ्या गेला आणि पिंजारीला गुलाबसिंग हा एकमेव आधार राहिला.
***
पिंजारीसंबंधी आधीच्या काळात झालेल्या चर्चेत ती मध्यंतरी एक वर्ष गावात नव्हती याचा उल्लेख वारंवार होत असे. त्या काळात पिंजारी गावात नव्हती असंच गावकरी सांगायचे. पिंजारीही तसंच सांगायची. ती गेली होती मजुरीसाठी शहरात. पेवली किंवा त्या परिसरातील, खरं तर त्याच परिसरातील कशाला, देशातील कोणत्याही खेड्याच्या नशिबी असणारे भोग ज्यांना ठाऊक आहेत ते म्हणतील की, पिंजारी वर्षभर मजुरीसाठी शहरात गेली यात नवल काय? रजनीला त्यात नवल वाटलं होतं. त्याचं कारण होतं. पिंजारीची चौकशी तिनं सुरू केली तेव्हा प्रत्येकाकडून तिला, ती एक वर्ष गावात नव्हती, हे आवर्जून सांगितलं जात होतं. त्यामुळंच तिचं ते निसर्गदत्त, आणि स्वतःच्या स्वभावातून निर्माण झालेलं, कुतूहल अधिकच चाळवलं गेलं होतं.
ते एक वर्ष पिंजारीसाठी आणि पेवलीसाठीही खास होतं. पिंजारीसाठी त्या वर्षाचं खासपण अगदी वैयक्तिक स्वरूपाचं होतं. गावासाठी मात्र ती मिरवण्याची बाब होती.
पिंजारी गावातील एक प्रमुख कार्यकर्ती होती हे त्यामागचं कारण होतंच. शिवाय अलीकडं संस्थेच्या या कामाच्या निमित्तानं, तसंच इतरही कारणांमुळं वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गावात अनेकांची ये-जा होऊ लागल्यानंतर संस्कृतीची जी काही चर्चा चालायची, त्यात पिंजारीच्या त्या एका वर्षाला एक वेगळं महत्त्व आहे, हेही गावकऱ्यांच्या ध्यानी येऊन चुकलं होतं.
आजच्या कहाणीत तो मुद्दा अनायासे आला तर… रजनी विचारात होतीच.
***
“मला जुवान्या आवडू लागला. जंगलात गेलो फुलं गोळा करायला की आम्ही भेटायचो. आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्नासाठी गावजेवण द्यायचं होतं. तेच अवघड होतं. जुवान्याकडं होते. पण माझ्या वाट्याचे नव्हते. त्यामुळं लग्न होईना…” स्वतः पिंजारीच सांगू लागली. अर्थातच, इतर बायकांनी केलेल्या आग्रहामुळंच तिची भीड चेपली होती, हेही खरं. प्रथेनुसार दोन्ही बाजूंनी सारख्याच प्रमाणात जे काय करायचं ते करायचं होतं आणि ते कमीतकमी करायचं असं ठरलं होतं.
दोघं एकमेकाच्या प्रेमात पडून एक वर्ष झालं तरी लग्नासाठीचे पैसे जमण्याचं चिन्ह नव्हतं.
जुवान्याला त्याच्या बापानं अद्याप शेत वेगळं काढून दिलं नव्हतं. मुळात त्याच्याकडंही पोराला वेगळं शेत काढून देण्याइतकी फार मोठी शेती होती असंही नव्हतं. त्यामुळं तोही प्रश्नच होता. त्याच्या बापाच्या पिढीसारखी स्थिती आता नव्हती. तेव्हा शेत काढून देणं आजच्या तुलनेत सोपं होतं. आपल्याकडं पुरेसं शेत नसेल तर गावाच्या संमतीनं जंगल काढून नवं शेत करता यायचं. ते आता शक्य नव्हतं.
डोंगऱ्या असता तर त्यानं जुवान्याकडं पिंजारी त्याला दिल्याबद्दल पैसे मागितले असतेच. ती प्रथाच होती. पण आता डोंगऱ्या नव्हता. पिंजारी तर एकटीच होती.
“माझं शेत होतं, पण तेही तोकडंच. त्यामुळं वरकड काहीच नाही. उन्हाळ्यात तर जंगलच कामाला येतं. त्यामुळं पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न होता. शेवटी आम्ही तसंच एकत्र रहायचं ठरवलं आणि माझ्याच घरी संसार सुरू केला. लग्न झालेलं नव्हतंच. आणि ते करावं तर लागणार होतंच…”
दोन वर्षं अशी गेली. जुवान्या आणि पिंजारीला या काळात एक मूलदेखील झालं. पण लग्न झालेलं नव्हतं आणि लग्न झालं नाही म्हणजे गावात प्रतिष्ठा नाही.
“गावजेवणाला लागणार होते दोन हजार रुपये. इतके पैसे कसे आणायचे? मुलगा दीड वर्षाचा झाला तेव्हा मात्र मी ठरवून टाकलं, काहीही करून येत्या वर्षात पैसे उभे करायचे आणि गावजेवण घालून लग्न करायचं…”
पिंजारीनं एक धाडसी निर्णय केला. तिनं गाव सोडलं. वर्षभरासाठी. ती गेली मांडणगावाला. तिथं एक वर्ष एका शेतावर मजुरी करून तिनं दोन हजार रुपये कमावले आणि गावी परतल्यावर या दोघांनी गावजेवण दिलं.
साडेतीन वर्षांची प्रतीक्षा, वर्षभराचे उरस्फोड कष्ट आणि त्यानंतर लग्न. हा सारा मान्यतेसाठीचा संघर्ष. त्यात आणखी एक दडलेला पदर होताच. पिंजारीची जमीन. बाप गेल्यानंतर जमीन तीच करीत होती, पण ती किती काळ टिकेल याची खात्री नव्हती. तिच्यावरची मालकी स्थापित करावयाची झाली तर हे लग्नही आवश्यक होतं. म्हणजे मग ती जमीन पिंजारी-जुवान्या यांची झाली असती.
पोट भरलेल्या गावाची मान्यता मिळाली पिंजारी आणि जुवान्याच्या लग्नाला. आणि त्याच लग्नात हजर असलेल्या त्यांच्या मुलालाही.
पिंजारीच्या या निर्णयाचं धाडस बाहेरून येणाऱ्या मंडळींना भारावून टाकायचं. तिचा परिचय या कहाणीशिवाय होतच नसे. आणि मग ही कहाणी सांगितली जाऊ लागली.
***
गावात संघटना-संस्थेची शाखा स्थापन झाल्यापासून पिंजारीनं त्यासाठी वाहून घेतलं. धान्य बँकेसाठी नावनोंदणी करणं, त्यासाठी शेजारच्या गावात जाऊन तिथलं काम पाहून त्यातून शिकणं हे सारं तिनं एकहाती केलं होतं. आता आपल्या मोठ्या अक्षरात ती काळ्या फलकांवर बैठकीचा वगैरे मजकूर लिहूही लागली होती. बैठकीत बोलू लागली होती. झिंदाबादचा नारा देण्यासाठी, संघटनेचं गाणं गाण्यासाठी पुढं येऊ लागली होती. डोक्यावरून घट्ट घेतलेला पदर – गर्द रंगाचा, त्याविरुद्ध गर्द रंगाचं लुगडं, तजेलदार गोरापान चेहरा, मूठ करून उंचावलेला हात ही तिची मूर्ती आता डोळ्यांपुढं आणणं सोपं जात होतं. संस्थेच्या कार्यालयात वृत्तपत्रीय कात्रणातून तशी छायाचित्रं झळकत. त्यातून ती दिसायची.
स्वातंत्र्यदिनी गावात स्थापन झालेल्या धान्यबँकेची प्रमुख म्हणून पिंजारीची निवड झाली. कारण तिला लिहिता-वाचता येत होतं. दोनचार यत्ता शाळेत गेली होती ती. त्यापलीकडं तसा शिक्षणाशी संबंध नाही, पण अक्षरांशी झालेला परिचय कायम राहिला होता. रजनीच्या संपर्कात आल्यानंतर तो घट्ट होत चालला होता आणि तेवढं या कामासाठी पुरेसं होतं.
***
होळीचे दिवस, फॅक्स…
“पेवलीत बंधारा होतोय. विस्थापन शून्य…”
पेवलीची शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून होती. गेल्या काही वर्षातील पावसाची स्थिती पाहता पाण्याची काही कायमस्वरूपी सोय आवश्यक होती आणि जलसंधारणाचं काम संस्थेच्या मार्फत, गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच करण्यापर्यंतचा विचार होत आला होता. होळीच्या आधी धान्य बँकेद्वारे धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पत्रकारांसमवेत गावकऱ्यांचा संवाद सुरू होता. गावाचा महत्त्वाचा प्रश्न कोणता, या पत्रकारांच्या प्रश्नावर ‘पाणी’ हे उत्तर प्रश्न म्हणून पुढं येणार होतं आणि तेच आलं.
“गावच्या बंधाऱ्याचं काय झालं?” ‘लोकमानस’च्या गोपीचंदचा प्रश्न.
बंधारा? रजनीला काहीही कळेना. पण गोपीचंद उगाच काही विचारणार नाही. तिला वाटून गेलं क्षणभर की, हाही बंधारा कागदोपत्री पूर्ण झालाय की काय? पण नाही. खुलासेवार बोलणं झालं तेव्हा गोपीचंदच म्हणाला, “प्रशासकीय मंजुरी मिळाली होती, पुढचं पाहून घे तू एकदा. बहुदा अर्थसंकल्पीय मंजुरी झालेली नसावी आत्तापर्यंत. कारण कोणी फॉलोअप केला नसणार.”
“पुनर्वसन…” रजनी बोलू लागली, पण तिला अर्ध्यावर तोडत गोपीचंदच म्हणाला, “नाही. पुनर्वसन नाही. साधा बंधारा आहे. या गावापुरता विचार केलेला. दरबारसिंग आमदार होते तेव्हाचा.”
रजनीनं मान डोलावतानाच ठरवून टाकलं, हा बंधारा प्रत्यक्ष आणायचा.
जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते, जलसंधारण महामंडळ असं करत रजनी मंत्रालय स्तरापर्यंत जाऊन पोचली तेव्हा काही गोष्टी स्पष्ट झाल्या. गोपीचंद म्हणाला होता त्याप्रमाणे या बंधाऱ्याला अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाली नव्हतीच. पण बंधाऱ्याची बाकी रूपरेषा पक्की झालेली होती. पेवलीच्या गरजेपुरतं पाणी त्यातून येणार होतं. त्या भागांतील वेगवेगळ्या गावांसाठी असे बंधारे घेण्याची कल्पना दरबारसिंग नाईक यांनी मांडली होती. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात बुडित होणार नाही आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी ती योजना. ती प्रत्यक्षात आलीच नव्हती, यात काहीही नवल नव्हतं. त्याच योजनेत पेवलीला हा बंधारा मिळाला होता. रजनीला हे काहीच ठाऊक नव्हतं. इतक्या वर्षांतील कामादरम्यानही कुणी बोललं नव्हतं. पण ती योजना उचलून धरायची आणि आरंभ पेवलीतून करायचा हे तिनं मनाशी पक्कं केलं.
पण… पेवली या गावाला हा शब्द एरवीही नवा नव्हता.
“मी तपास सुरू केला आणि चाकं फिरली. दरबारसिंग यांच्या या योजनेत एकाही गावात विस्थापन न होता सिंचनाची सोय होणार होती. म्हणून आम्ही त्या योजनेच्या प्रेमात पडलो होतो. दरबारसिंग यांचा काळ वेगळा, आजचा वेगळा…” रजनी सांगायची.
बंधाऱ्याविषयीच्या हालचालींना वेग आला तशा गावकऱ्यांच्या आशा पालवू लागल्या. गेल्या काही वर्षांपासून तहानलेली शेतं पाणी पिण्याची शक्यता त्यांना दिसू लागली. काही गावकरी तर असे वेडे की, त्यांनी स्वप्नंही पाहणं सुरू केलं होतं. पिंजारीही त्यापैकीच. आपल्या शेतात पाणी आलंय, शेत पिकलंय हे तिचं नेहमीचं स्वप्न.
एक पेवलीच नव्हे तर परिसरातील काही गावंही या हालचालींसाठी एकत्र आली. धरणे, मोर्चा, सभा, पदयात्रा यांच्या जोडीनंच पिकलेल्या शेताची स्वप्नं पाहण्यात दंग होऊन गेली.
***
वर्षानंतरचा उन्हाळा, दूरध्वनीवरून…
“पेवलीचा बंधारा रद्द, पुढं मोठं धरण. पुन्हा मरण. कारण पुनर्वसनाचा प्लॅनच नाही…”
दरबारसिंग नाईक यांनी मांडलेल्या योजनेची चर्चा जोरात सुरू झाली आणि रजनीच्या संघटनेमागं लोकांची ताकद उभी राहू लागली.
“योजनेसाठी आम्ही पेवलीतून सुरवात केली. नेहमीप्रमाणे आधी निवेदन, आपल्या समर्थक आमदारांकडून विधिमंडळात प्रश्न हे उपाय झाले आणि शेवटी संघर्षाचा पवित्रा घेतला. पण तो पेवलीपुरताच मर्यादित न ठेवता असे बंधारे होणाऱ्या इतर गावांनाही जोडून घेतलं…”
मांडणगावात रजनीच्या पुढाकारानं निघालेल्या मोर्चात सुमारे पाच हजार गावकरी होते. मोर्चातून रजनीच्या संघटनेची ताकद दिसून आली आणि हालचालींना वेग आला.
“पालकमंत्र्यांनी या योजनेचा विचार करू असं आश्वासन दिलं आणि पाटबंधारे खात्यालाच योजनेवर टिपण देण्यास सांगितलं. तिथंच सारं फसलं. या छोट्या बावीस बंधाऱ्यांची योजना दरबारसिंगांनी मांडली होती. त्या बंधाऱ्यांना येणाऱ्या खर्चाचा अंदाज खात्यानं काढला. मग सुरू झाली लाभ-हानीची आकडेमोड.
“पालकमंत्र्यांचा या योजनेला विरोध होताच. कारण त्याचं श्रेय नायकांना गेलं असतं आणि त्यांच्या आता मृतवत झालेल्या पक्षानं कदाचित उचल खाल्ली असती ही भीती त्यांना होती. त्याहीपलीकडं एक मोठी भीती होती. असे बंधारे झाले तर त्या भागातील वंचित जगण्यातून लोक बाहेर पडतील आणि तसं झालं तर आपली राजकीय पकड ढिली होईल ही खरी भीती. पेवली आणि परिसरातून आम्हाला मिळणारा पाठिंबा त्यांच्या डोळ्यांत भरला होताच…”
पुढं काय घडलं हे खरं तर रजनीनं सांगण्याचीही आवश्यकता नव्हती. तो अंदाज कुणीही बांधू शकतो. दरबारसिंग नाईकांची योजना रेंगाळत गेली. रजनीच्या संघटनेची संघर्षाची ताकद शासनापुढं मर्यादितच होती.
“लाभ-हानीच्या आकडेमोडीतून मग ही कल्पना पुढं आली. पेवली आणि इतर गावांच्या बंधाऱ्यांऐवजी पेवलीच्या खाली धरणच बांधायचं. कारण ते दरबारसिंगांच्या योजनेवर येणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्चात पुनर्वसनासह बसत होतं, असं पाटबंधारे खात्यानं लिहून टाकलं…”
विषय धरणाचा आणि इतक्या झटपट, हा कोणाच्याही मनात उमटणारा साधा प्रश्न.
“इथंच तर मेख आहे. दरबारसिंगांनी ती योजना सांगण्याच्या आधी या धरणाचा विचार सुरू झाला होता. ती कागदपत्रं मस्तपैकी उकरून काढण्यात आली. त्या आधारावर आराखडा आणि बाकी गोष्टी कागदावर मांडायला किती वेळ लागतो? अर्थातच सगळ्या हालचाली झटपट झाल्या…”
आणि ओहोळावरचा बंधारा रद्द झाला. तो ओहोळ पुढं ज्या नदीला मिळतो त्या नदीवर थोडं खाली मोठं धरण बांधण्याचं ठरलं. पण इथून प्रश्न नव्यानं सुरू झाला. धरणात काही गावं बुडत होती आणि त्यात पेवली होतं. ‘इथून उठून दुसरीकडं जावं लागेल तुम्हाला,’ सरकारचा कागद आला एक दिवस आणि गावात लगबग उठली.
गाव उठायचं म्हणजे, जायचं कुठं, तिथं काय असणार वगैरे प्रश्नांचा भुंगा सुरू झाला आणि तो गावासाठी स्वाभाविकच जीवनमरणाचा ठरला. पण तसं फारसं काही वावगं वाटलं नाही. कोणालाही. कारण आधीही एवीतेवी मरणाशीच लढाई सुरू होती दोनेक पिढ्या. त्यात ही भर. त्यामुळं गाव उठायला तयारच होतं. जिथं जायचं आहे तिथं काही तरी इथल्यापेक्षा बरं मिळेल ही आशा होती. आणि तसं काही मिळणार असेल तर ते हवंही होतं.
“आधी आमच्याकडं पाणी नव्हतं, पाणी येणार म्हणून भांडलो तर गावातून उठवायचं ठरवलं. गावातून उठायला तयार आहो, पण जायचं कुठं?” पिंजारीचा रोखठोक सवाल.
पाचेकशे बायकांच्या एका सभेपुढं पिंजारी बोलते आहे असं छायाचित्र आणि त्याखाली तिच्याच या सवालाचं शीर्षक केलेली बातमी वाचकाशी बोलत असायची.
“मी पेवलीत भाषण केलं, मांडणगावात केलं. पेवलीच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांत जाऊन मी बायकांशी बोलले. प्रत्येक गावात सभा झाली. सगळ्या बायका गोळा झाल्या. आम्ही मांडणगावला जाऊन घेराव घातला इंजिनियरला… रामपूरच्या मोर्चावेळी लाठ्या खाल्ल्या आम्ही बायकांनीपण..” भेटली की मग पिंजारी जोशात सांगू लागायची. नेतृत्त्वाच्या नवेपणापेक्षा आपला संघर्ष सांगण्याची ओढच त्यात अधिक.
वैयक्तिक संघर्षही सुरूच असायचा. त्याविषयीही ती बोलायची. तो संघर्ष नवा नव्हे, जुनाच. संदर्भाची चौकट आता नवीन असायची. संघर्ष जुना म्हणजे वंचित जगण्याचा. तोकडी शेती, त्यावर आधारलेलं जगणं. आता नवी संदर्भचौकट म्हणजे या आंदोलनामुळं पायाला लागलेली भिंगरी. त्या जगण्यात या भिंगरीतून कशा एकेक गोष्टी अधिक पेचदार होत गेल्या त्याची ही कहाणी. हे सारं का? तर पुढं मागं तरी चांगलं आयुष्य मिळेल, आपल्याला नाही तर पुढच्या पिढ्यांना तरी.
“तुझ्यासारखं व्हावं असं इथल्या मुलीला वाटत नसेल का? वाटतंच की. मांडणगावात शाळेसमोरून मोर्चा जात होता तर आपल्या मुली कितीतरी वेळ तिथं मैदानात खेळणाऱ्या मुलींकडंच पहात उभ्या राहिल्या होत्या. एकेकीला ओढून पुढं न्यावं लागलं…” मोहाची फुलं निवडता-निवडता पिंजारी सहज बोलून जायची.
“कुठं वेळ असतो त्यांच्याकडं. इथं शेत म्हणून नाही, जंगल म्हणून नाही. कामंच कामं. पोटाला मिळायचं कसं त्याशिवाय? रजनीताई सांगते ते बरोबरच असतं. म्हणून हा झगडा.”
एक-दोन तुटक वाक्यातून आपल्या जगण्याचं सार मांडून पिंजारी पुढं सरकायची.
***
वर्षानंतरचे होळीचेच दिवस, फॅक्स…
“मांडणगावात मोर्चावर लाठीहल्ला, ५५ जखमी”
बातमी ठळक होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मोर्चाला झोडपून काढलं होतं पोलिसांनी. दहा जणांचं शिष्टमंडळ आत न्यायचं की पंचवीस जणांचं यावरून वाद आणि मग रेटारेटी होऊन पोलिसांचं कडं मोडलं गेलं. लाठीहल्ला. लाठीहल्लाच तो. वर्णनावरून तरी नक्कीच. फॅक्सच्या तळाशी निरोप – प्लीज, सर्क्युलेट कर.
गंभीर जखमींच्या यादीत पिंजारी. जिल्हा रुग्णालयात दाखल होती. हाताच्या कोपरावर टाके घालावे लागले होते. पळापळीत पडून झालेली जखम. कदाचित फरफटही झाली असावी. गुलाबकाका, काकी यांचीही नावं जखमींमध्ये होती. रजनीही जखमी होती.
राज्यभरात या लाठीहल्ल्याची बातमी झाली आणि व्हायचा तो परिणाम झाला.
“लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी आज सीएमनी मान्य केली. शिष्टमंडळ भेटलं तेव्हा ते चांगलेच वरमले होते…” चार दिवसांनी मंत्रालयात झालेल्या या घडामोडी. रजनी सांगत होती.
“पिंजारीनं भलतीच कल्पना लढवली. नेहमी शिष्टमंडळात आपण बोलू शकणाऱ्या व्यक्तींना ठेवतो. यावेळी पिंजारीनं सुचवलं की, त्याऐवजी जखमी झालेल्या माणसाना शिष्टमंडळात घ्यायचं. जखमाच बोलल्या पाहिजेत…”
“हो ताई. एरवी बोलणारी असतातच कारण तिथं बोलण्याचं कामच असतंय. पण आत्ता इथं जखमाच दाखवल्या पाहिजेत त्यांना. म्हणून…” पिंजारीची पुस्ती. हे कुठून तुझ्या डोक्यात आलं असं विचारल्यावरची.
“कलेक्टरसायेबच चौकशी करतील. त्यांच्यापुढं आपण साक्ष द्यायची आहे. संघटनेचं निवेदनपण जाईल.” आता तिला ही प्रक्रियाही ठाऊक झालेली असते.
“सीएमनी एकूण लाठीहल्ल्याचं चित्रच पाहिलं माणसा-माणसांच्या अंगावर. त्यामुळं त्यांना या प्रश्नाचंही गांभीर्य समजलं. त्यांनी लगोलग पुनर्वसनाचा आराखडाही तयार करायला सांगितलाय…” ही खरी आश्वासक घडामोड होती. त्यातही संघटनेला काही स्पेसिफिक मागण्या असतील तर त्या द्यायला सांगितलं गेलं होतं. त्याच्याही तयारीत आता ताकद लावावी लागणार होती.
“जमिनीच्या बदली जमीन हे तर आहेच. पण गावठाण एकत्र करून घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलंय. मूळ गावात जशी घरं आणि शेती एकच होती, तसंच इथंही हवंय. म्हणूनच आपण झऱ्याच्या कडेनं लांबसडक जागा मागितली आहे. प्रत्येकाला पाण्याचा स्रोत मिळावा म्हणून…” पिंजारीच्या डोक्यात हेही असायचं.
शाळा, दवाखाना हेच फक्त सामायीक जागेत असावं अशी काहीशी ही सूचना होती.
पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्हं आहेत हे पिंजारी किंवा रजनीनं स्पष्ट बोलून दाखवण्याची गरज नव्हती. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ब्रीफिंगच्या बातम्यातून ते स्पष्ट झालं होतं.
“पुनर्वसनाचा आराखडा तयार करणार, उपमुख्यमंत्र्यांकडं समन्वयाची जबाबदारी” हे बातमीचं शीर्षक.
इथंही त्यांनी चलाख राजकारण खेळून घेतलं होतं. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष एकच. म्हणजेच तुमचं तुम्ही सांभाळा.
पंधरवड्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल आलादेखील. पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याचा ठपका, उपअधीक्षकांच्या बदलीची शिफारस वगैरे.
“हा आमचा विजय म्हणण्यापेक्षा पालकमंत्र्यांचा मोठा पराभव आहे. पण आता आम्हाला आणखी तयारी करावी लागणार. कारण तो पेटून उठणार.” हे मात्र रजनीचं बरोबर होतं. पालकमंत्र्यांचा एकूण स्वभाव पाहता ते पेटून उठणार हे नक्की.
“…त्यात त्यांनी आवर्जून आणलेल्या उपअधीक्षकाची बदली हा किती नाही म्हटलं तरी वर्मी लागलेला घाव असणार.”
एकूण पुढचा मार्ग खडतर होता.
***
दिवाळी, प्रत्यक्ष भेट…
“पिंजारीनं आज कमाल केली. पुनर्वसनात झाडांची मागणी डेप्युटी सीएमला मान्य करावी लागली तिच्यामुळं…”
मांडणगावचा जिल्हाधिकारी तरूण होता. आयएएसबरोबरच त्यानं एमबीएही केलं होतं. पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचं काम त्याच्यावरच सोपवण्यात आलं होतं. सलग बैठका, स्पष्ट कार्यक्रम हे त्याचं वैशिष्ट्य.
“त्याचं एक बरं असतं. आठवड्याचे पहिले दोन दिवस तो बैठका लावतो. त्यातला पहिला दिवस असतो तो आधीच्या आठवड्यात केलेल्या कामाचा आढावा घेत त्यातल्या दुरूस्त्या करण्यासाठी. दुसरा दिवस पुढच्या चार दिवसांचं काम ठरवण्यासाठी,” रजनी किती नाही म्हटलं तरी प्रभावित झालेली होतीच. पण इतकं सलग काम काय असणार?
“तेच त्याचं वैशिष्ट्य. छोट्या तुकड्यात काम. त्याच्या म्हणण्यानुसार आराखडा बनवण्यासाठी एकूण सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. तेवढा पुरेसा आहे. पेवली हे गावच डोळ्यासमोर ठेवून सारं करूया, कारण तेच पहिलं बुडणारं गाव आहे. त्यानंतर बाकीच्या गावांसाठी तेच मॉ़डेल पुढं नेता येतं.”
पर्ट मॉडेलचा वापर करून तो हा आराखडा बनवत होता. कारण स्वाभाविक होतं त्याच्या लेखी. पुनर्वसन बुडिताच्या आधी पूर्ण करावयाचं असल्याने एकेक प्रक्रिया नीट आखून वेळापत्रकात बसवून करणं भाग आहे, असं तो म्हणायचा. त्याच्या तोंडून वारंवार हे पर्ट मॉडेल शब्द यायचे आणि पिंजारी, गुलाबकाका वगैरेंची पंचाईत व्हायची.
“सायब, ते आम्हाला समजत नाही. कळतं ते इतकंच की पाणी येण्याच्या आधी आम्ही तिथून उठून नवीन जागी बसलो पाहिजे आणि पाणी येण्याचे तुमचे अंदाज चुकतात. कागद घ्या, तक्ते आखा किंवा आणखी काय करा,” पिंजारी आता ठणकावून बोलायला शिकलेली होती.
“पाण्याचा अंदाज चुकू नये यासाठी आपण पावसाचाही अंदाज घेऊया…” कलेक्टरची सारवासारव, पण काही सावरलं जाण्याऐवजी तेथे लोक हसलेच.
“गेल्या वर्षी सीईओनं पावसाचा अंदाज घेतला होता सर. नेहमीपेक्षा कमी पाऊस म्हणून. प्रत्यक्षात काय झालं? तुमच्या त्या अंदाजांपेक्षा आमच्या डुव्या कारभाऱ्याचा अंदाज बरोबर निघाला. तो म्हणाला होता, पाऊस जादा आहे यंदाचा असं…” गुलाबकाका.
एकेका मुद्याची अशी चिरफाड करीत आराखडा बनवण्याचं काम सहा महिने सुरू राहिलं. जिल्हाधिकाऱ्यानं ही प्रक्रिया पारदर्शक ठेवली होती, कारण त्यालाही पालकमंत्र्याचा दबाव नकोच होता. त्यामुळं प्रत्येक बैठकीनंतर काय ठरलं याची टिप्पणी संघटनेला द्यायची, त्यांच्याकडून घ्यायची आणि तिसऱ्याच दिवशी ठरलेल्या गोष्टींचं उभयपक्षी मंजूर टिपण तयार करायचं असं तो करायचा. ते टिपण प्रेसकडंही जायचं. बातम्या काही नेहमीच यायच्या असं नव्हतं, पण आपण पारदर्शक आहोत, हा त्याचा संदेश जाऊन पोचायचाच. बहुदा संघटनेच्या मागण्यांमध्ये सातत्य रहावं हाही त्यामागं त्याचा हेतू असावाच.
गावठाणासाठी सरकारच्याच ताब्यात असलेली जमीन द्यायचं नक्की झालं होतं. शेतीही सलग होती. सगळं जमून आराखडा आता अंतिम स्वरूपात तयार होणार असं चित्र असतानाच एके दिवशी पिंजारीनं नवा मुद्दा काढला.
“गावठाणाभोवती दहा हजार झाडं सरकारनं लावून द्यावी. आंबा, मोह, चारोळी वगैरे…”
जिल्हाधिकारी चमकला. हे नवं होतं.
“त्याची तरतूद नाही. आणि आपण जमीन घेतली आहे त्याभोवती जंगल आहेच.” त्याचा युक्तिवाद.
“जंगल तुमचंच आहे. आम्हाला गावासाठी झाडं लावून पाहिजेत. आमच्या मूळ गावात आमची गावाची म्हणून झाडं आहेत.” मुद्दा बिनतोड होता. गावाची म्हणून असणाऱ्या झाडांचा हिशेब भरपाईत कुठंच नव्हता.
जिल्हाधिकारी मात्र त्याला तयार होतच नव्हता. “दहा हजार झाडं काही सरकारला जड नाहीत…” रजनीनं सांगून पाहिलं, पण तो ऐकत नव्हता आणि आराखड्यातील बाकी मुद्यावर सहमती आणि हा मु्दा मतभेदाचा ठेवायचा यावरच शेवटी एकमत करावं लागलं. चेंडू उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला.
मंत्रालयातल्या बैठकीवेळी रजनीसह दहा जण होते. उपमुख्यमंत्री, पुनर्वसन आणि वन खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, सीईओ अशी मंडळी सरकारी बाजूनं.
आराखड्यावर प्राथमिक चर्चा झाली. किती गावठाणांना मिळून एक शाळा, एक दवाखाना वगैरे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी विचारले. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसंख्येचे गुणोत्तर सांगून त्यांचं समाधान केलं. आश्रमशाळा स्वतंत्रपणे रजनीच्या संस्थेलाच देऊया असंही उपमुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं. त्यानिमित्तानं झाला थोडा संघटनेचा सूर मवाळ तर हवाच ही भूमिका.
“त्यावर नंतर बोलू, आधी झाडांचा मुद्दा.” रजनी सावध असावी.
“झाडांचं काय?” उपमुख्यमंत्र्यांचं बेरकी अज्ञान. कारण प्रश्न विचारतानाच हळूच त्यांनी अधिकाऱ्यांना गप्प राहण्याचीही खूण केली होती हे रजनीच्या नजरेनं टिपलं होतंच. पण ती सरळ बोलण्याच्याच पक्षाची.
“गावठाणाभोवती दहा हजार झाडं सरकारनं लावून द्यावीत. त्यांची निगराणी करावी. ती झाडं गावाच्या मालकीची असतील.”
झाडं लावणं इतकाच हा मुद्दा नव्हता. झाडं लावायची म्हणजे त्यासाठी जमीन आली आणि तीच देण्याची सरकारची तयारी नव्हती हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. कारण एकट्या पेवलीचा हा प्रश्न नव्हता.
“गावठाणाची जागा जंगलाला लागूनच आहे.” उपमुख्यमंत्री. ठरलेला सरकारी पवित्रा.
“जंगलात आम्हाला थोडंच जाऊ दिलं जातं. पडलेलं फळ उचललं तरी फॉरीष्ट पकडतो. पन्नास रुपये मोजावे लागतात…” पिंजारी.
वन खात्याचे सचिव काही बोलू पहात होते, पण त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी रोखलं.
या चर्चची हकीकत रजनीच सांगत होती. “झाडांचा इतका का आग्रह, असं उपमुख्यमंत्र्यांनी विचारलं. एकाचवेळी गुलाबकाका, जात्र्या वगैरे बोलू लागले. आपल्या तिघीजणी होत्या. त्या किंचित गप्पच होत्या. ते पाहून उपमुख्यमंत्रीच म्हणाले की, त्यांनाही बोलू द्या. पिंजारीच बोलू लागली. उन्हाळा, शेतीचा प्रश्न, अशावेळी जंगलातील कंदमुळांवरच कसं जगावं लागतं आणि म्हणून झाडं कशी आवश्यक वगैरे ती सांगू लागली. उपमुख्यमंत्री ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही रोजगाराची कामं काढू वगैरे ते सांगू लागले…”
हा नेहमीचाच सरकारी युक्तिवाद असतो. रोजगारासाठी मागणी करायची, रेशनसाठीही मागणी करायची, त्यासाठीही आंदोलनं करायची हे रजनीला नवं नव्हतंच.
“टेबलाच्या त्या बाजूला उपमुख्यमंत्री. इकडे आम्ही. त्यांच्या उजव्या हाताला सगळे अधिकारी. डावीकडे स्टेनो. अचानक पिंजारी उठली आणि वाकून तिनं उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ते नोट्स घेत असलेले कागदच हिसकावून घेतलं. ती आक्रमक झाली असं वाटून, स्टेनो, इतर अधिकारी पुढं सरसावले. उपमुख्यमंत्र्यांनीच त्यांना रोखलं. मीही पुढं झाले, पण तेवढ्यात पिंजारीचे शब्द आले…
“पिंजारी म्हणाली, ‘सायब, या कागदांवर एक सही करून तुम्ही गाव उठवलं. आता मी कागद काढून घेतले, आता दाखवा तुमचं काम होतं का ते? तुमचा रोजगार तसा असतो. तो कामाचा नाही…’ उपमुख्यमंत्र्यांनी हात पुढे करून पिंजारीकडं कागद मागितले. पण ती ऐकायला तयार नव्हती. ‘जंगलात राहणाऱ्या माणसांना झाडंच वाचवतात. जंगल नसेल तर आम्ही उन्हाळ्यात जावं कुठं. रेशनच्या मागं लागून लाठ्या खाल्ल्या तरी पोटात अन्न पडत नाही.’ पिंजारी कुणालाही बोलू देत नव्हती. एव्हाना तिच्या सुरात इतरांनीही सूर मिसळायला सुरवात केली. त्यांच्या बोलण्यातली खोच उपमुख्यमंत्र्यांच्या बहुदा ध्यानी आली.”
काही काळाच्या चर्चेनंतर गावाभोवती दहा हजार झाडं लावण्याचा निर्णय झाला. गावठाणांच्या जागेचा विस्तार झाला. तोच फॉर्म्यूला इतर गावांसाठी लागू करायचं ठरलं आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार झाला.
बुडित न आणणारा बांध व्हावा येथून सुरू झालेलं एक आंदोलन आता बुडिताचा आणि म्हणून पुर्वसनाचाही स्वीकार करून थांबण्याची चिन्हे दिसू लागली होती.
सरकार खुश होतं, काही चांगल्या गोष्टी पदरी पडतील म्हणून ही मंडळीही खुश झाली होती. बऱ्याच काळापासून पाहिलेल्या स्वप्नांना एक उभारी मिळू लागली होती.
***
वर्षानंतरची देवदिवाळी, एसएमएस…
“हे तुला पेवलीचं आमंत्रण. नव्या गावठाणात कुदळ मारली जातेय. येत्या पावसाळ्यानंतर हे गाव असणार नाही…”
पेवली. डाकीण म्हणवल्या गेलेल्या बाईनं एकाकी पडल्यानंतर गावातून दोन बछड्यांसह पळून जाऊन उभं केलेलं गाव. हे गाव तर पहायचं होतंच शिवाय, पिंजारी या मर्दानीलाही तिच्या गावातच एकदा भेटायचं होतं. याआधी तिची भेट झाली होती ती मांडणगाव किंवा माझ्याकडंच. तिच्याच गावात तिला भेटून समजून घेणं वेगळंच.
पेवली काही दिवसांत उठणार होतं. त्यामुळं तिथं जाऊन मी गाव डोळे भरून पाहून घेतलं. गावकऱ्यांना भेटले, बोलले. पेवलीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. सारं काही भरभरून घेतलं, गावातील त्या झऱ्याच्या काठी बसून. संध्याकाळच्या सुमारास ढोल घुमत होते त्या सुरांच्या पार्श्वभूमीवर. पाव्याच्या सुरावटींवर मनाला स्वार होऊ देत.
पाऊस बरा झाला होता. त्यामुळं झऱ्यात पाणी टिकून होतं. गुलाबकाकांच्या घराच्या पाठच्या अंगाला झऱ्याच्या पात्रात आणि काठावरही कातळ होते. पाण्यात पाय सोडून त्यावर आम्ही बसलो होतो.
“चार वर्षं कशी गेली काही समजलंच नाही…” पिंजारीच्या बोलण्यात सफाई येऊ लागली होती थोडीथोडी.
चार वर्षं म्हणजे पेवलीत रजनीच्या संघटनेची शाखा सुरू होणं, धान्यबँक वगैरेचं काम उभं राहणं. त्यातून सावकारीच्या पाशातून काही कुटुंबांची झालेली मुक्ती, मग बंधाऱ्यासाठी संघर्ष, त्यातून पुढं धरण, पुनर्वसन वगैरे. पिंजारी भरभरून सांगायची. सगळ्या सांगण्यात असायचा तो मात्र भविष्याचा वेध. आपल्या पोरांकडं बोट करून म्हणायची, “त्यांच्यासाठी.”
“खायची आजही मारामार आहे ताई. पण आता एक समाधान आहे. काही मिळण्याची शक्यता नक्की आहे. लोकांनी एकी टिकवून धरली तर खूप काही मिळेल…
“तिथं सोपं नाही, पण इथंही सोपं नव्हतंच… कारण आता इथंही जंगल राहिलं नव्हतंच. कष्ट तिथले वेगळे,” हा सगळा संदर्भ पुनर्वसनाच्या गावठाणापाशी अद्याप आपलं जंगल नसण्याच्या मुद्याचा. आता सारं काही शेतात राबूनच करावं लागणार होतं. झालंच तर पुढच्या पिढीला शाळा वगैरे करावीच लागणार होती.
पिंजारी म्हणाली, “शाळा, दवाखाना आणि पाणी या तीन गोष्टी तिथं मिळाल्या की बास्स.”
पुनर्वसनाचा आराखडा होता तसा. दवाखाना आणि शाळा यांच्या जोडीनं वनीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निघालेल्या मोर्चावेळी लाठीमार झाला होता मांडणगावात. तेव्हा झालेल्या धडपडीत पडून हाताच्या कोपराला झालेल्या जखमेचे व्रण दाखवत गप्पांच्या शेवटी पिंजारी म्हणाली, “लाठ्या खाल्ल्या, पण हक्क मिळवला आम्ही.”
***
गाव उठलं. पुनर्वसनासाठी ते जिथं गेलं होतं, तिथून ते पुन्हा विखरून गेलं.
पुनर्वसन झालं त्यावेळी आश्वासन मिळालं होतं, शेतापर्यंत पाणी आणण्याचं. ते काही आलं नाही. झाडांचंही असंच काहीतरी झालं. कारण काही खास नाहीच. सरकारी अनास्था म्हणता येईल, लालफित म्हणता येईल किंवा एकूणच बेपर्वाईही म्हणता येईल. गावकऱ्यांच्या संघर्षाच्या ताकदीची मर्यादा हेही एक कारणच. मग गावाला रोजगारासाठी बाहेर पडावंच लागलं. असं म्हणतात की, त्यावेळी पिंजारी आणि जुवान्यानंही आपल्या दोन पोरांसह गाव सोडला. पुढं केव्हा तरी एकदा ते जवळच्या शहरात बांधकामांवर मजुरी करत असल्याची खबर आली. पण त्या खबरीला तसा अर्थ नव्हता. कारण ती ज्यांच्यापर्यंत पोचल्यानं काही झालं असतं, ती या गावाचा लढा चालवणारी संघटनाही तोवर अस्ताला गेली होती. गाव उठल्याचा तो परिणाम होता असंही म्हणता येतं किंवा रजनीला नव्या भागातील नव्या प्रकल्पांच्या वाटा खुणावू लागल्याचा परिणाम होता असंही म्हणता येतं. एकूण तिथून पुढं पिंजारीचा माग तसा राहिलाच नाही.
***
एका वर्षापूर्वी, एसएमएस…
“पिंजारी गेली. कॅन्सर. शेवटच्या स्टेजलाच समजलं. काही करता आलं नाही…”
पुनर्वसन वसाहतीतून बांधकामाच्या मजुरीवर गेली आणि तिथंच कर्करोगाची शिकार झाली पिंजारी. काही करणं ना जुवान्याला शक्य झालं, ना इतर कोणाला. पोट दुखतंय हे आणि इतकंच कारण, त्यावरचे जुजबी उपचार. गेल्यानंतरच तिच्या कर्करोगाचं निदान झालं.
पिंजारी. बापाचा आजार एकटीच्या जोरावर काढणारी. लग्न न करता जीवनसाथीसमवेत एकत्र राहण्याचं धाडस दाखवणारी. मग तेच लग्न करण्यासाठी तितकाच धाडसी निर्णय घेत एकटीनं शहर गाठून वर्षभर मजुरी करणारी. सार्वजनिक कामात पडल्यानंतर आपल्यातील उपजत गुणांच्या जोरावर पुढं येणारी. पुढच्या पिढीसाठी असं म्हणत त्या कामात झोकून देणारी. संघर्षासाठी गावकऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. उपमुख्यमंत्र्याच्या हातातले कागद काढून घेऊन आपल्या मुद्याचं महत्त्व त्यांच्यावर ठसवू पाहणारी.
पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.