न आकळलेलं काही…

ऑक्टोबर 8, 2008

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं जाण्याचं, तिनं मनात घर करण्याचं कारण कोणतं असं विचारलं तर त्याचं गणिती उत्तर शक्य नसतं. सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! काहींचा या चारही मितींमध्ये लीलया संचार होतो, ही मंडळी स्वर्गीय काही तरी घेऊन जन्माला आलेली असतात; त्यांचं जगणं बहुतेकदा पाचव्या मितीमध्ये होत असावं. काहींना सूर नादावतो. काहींना रंग, काहींना रेषा तर काहींना आकार. पुन्हा या प्रत्येक मितीमध्ये नादावले जाण्याचेही दोन प्रकार असतात. एक ग्रहण करण्याच्या संदर्भात किंवा मग दुसरा आविष्कार करण्याच्या संदर्भात. या दोन्हींनी जे नादावले जातात ते भाग्यवानच. अशा भाग्यवानांची संख्या तशी कमीच. मग राहतो ते तुम्ही-आम्ही. त्यातही उतरंड असतेच. त्यातल्या अगदी बालवाडीच्या पायरीवरून हे आत भिडलेले, पण न आकळलेले काही…

नुकताच आंघोळ करून बाहेर आलोय. माझा भ्रमणध्वनी खणखणतो. क्रमांक पाहतो. ००१२०******८५!!! पहिल्या तीन आकड्यातून कळतं की अमेरिका. घड्याळाकडं पाहतो. अकरा. म्हणजे जिथून हा कॉल आलाय तिथं मध्यरात्रीचे किमान सव्वादोन ते अडीच झालेले आहेत. माझ्या सकाळच्या आणि त्याच्या मध्यरात्रीच्या या वेळेस ‘सोशल अँथ्रॉपॉलॉजी’ हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही. या मित्राचा अभ्यास त्या विषयातला आहे. माझ्या कपाळावरच्या रेषा किंचित ताणल्या जातात, पण इतक्या रात्री तिथून कॉल येतोय म्हणजे विषय वेगळा असणार हे नक्की. मी कॉल घेतो. एक महत्त्वाचा निरोप असतो; तो देऊन झाल्यानंतर मित्र म्हणतो, “अजून एक गोष्ट शेअर करायचीये…”
“बोल ना. काय?”
“मी शामच्या वेळेला यमन शिकायला सुरवात केली…”
(हा मुलगा कटाक्षाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आहे हिंदी भाषिक. त्यामुळे हा संवाद त्याच्याच भाषेत.)
अत्यंत आनंदाने मी “व्वा. क्या बात है!” म्हणतो.
“एक नोट लागत नव्हती नीट. बराच काल प्रयत्न केला. मग जमली. मग मी फुल्ल थ्रोटेड… इतका आनंद झालाय… (मी मनातल्या मनात म्हणतो, तू शिकू लागल्यानंच मलाच इथं इतका आनंद झालाय की तुझा आनंद काय वर्णावा?)
“…एकदम फ्रेश. कालपर्यंतचे तीन दिवस फेसबुकवर होतो नुसता. आय वॉज कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग द टाईम… बट नाऊ आय हॅव डिसायडेड, अबकी बार कसल्याही डायव्हर्शनकडे मन गेलं तर यमन…”
मी त्याला म्हटलं “अरे, हे लिही.”
“लिही? शब्दच नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी… कोणत्याही भाषेत!”
शब्दांच्या पलीकडला हा अनुभव काय असावा याची कल्पना मला क्षणार्धात येते. गेल्या वीसेक वर्षांचा प्रवास आठवताना.

आठवतं तसं, मी ऐकायला सुरवात केली त्याला आता वीसेक वर्षे झाली असतील. त्याआधी गाणं ऐकणं हा काही छंद वगैरे नव्हता, आवड तर नाहीच. ती अचानक उद्भवण्याचं कारण बहुदा हुबळीत झालेला एक कार्यक्रम असावा. गंगूबाई हनगल यांच्या अमृतमहोत्सवाचा. नवी नोकरी, त्यामुळं अंगावर आलेलं काम टाळायचं नाही हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्या कार्यक्रमाला जावं लागलं ते असं कामानिमित्त. तीन दिवसांचा महोत्सव होता तो. सगळ्या मातब्बर कलाकारांची मांदियाळी होती. शास्त्रीय संगीत, आणि त्यातही गायकी, ही थोडी लांबच ठेवण्याची गोष्ट अशी आजवरची स्थिती होती माझी. पण काम म्हणून त्या सभागृहात असणं आवश्यक होतं. कलाकार आठवत नाही, पण पहिल्याच दुपारी संतूरवादन ऐकलं आणि ध्यानी आलं की, अरे हा प्रांत आपण समजतो तसा नाही. ऐकायला काही हरकत नाही. समजत नसलं तरी. ठाऊक नव्हतं की ही धारणा त्या थोर कलाकाराच्या सांगण्यातून अधिक पक्की होणार आहे. हुबळीत नव्यानंच मित्र झालेल्या दोघा-चौघांनी संध्याकाळी मला गंगूबाईंकडं नेलं आणि ओळख करून दिली. माझं वय वीस. म्हातारी उत्सवमूर्ती होती, तशीच उत्साहमूर्तीदेखील. प्रसन्न हसत तिनं हात जोडून नमस्कार केला आणि त्याकडं पहातच मी पदस्पर्श केला. “शास्त्रीय समजतं का?” बाकी काही बोलण्याआधीच त्यांचा प्रश्न तीरासारखा आला (एखाद्या धारदार तानेसारखा होता तो, हे नंतर खूप काळानं उमजत चाललंय).
“नाही. पण ऐकतो.” माझी आठवण पक्की आहे कारण मी खोटं बोललो होतो. उत्तराचा उत्तरार्ध खोटा होता. ऐकलं होतं ते फक्त त्या दुपारी संतूर.
“ऐकत जा. समजून घेण्याचाही प्रयत्न कर.” म्हातारीचा आशीर्वादवजा आदेश. मान डोलावण्यापलीकडं होतं तरी काय त्या वयात?
तासभर गेला असेल नसेल आणि आम्ही मंडळी सामोरे गेलो ते एच. वाय. शारदाप्रसाद यांना. दिल्लीतले हे बडे प्रस्थ (अतिशय चांगल्या अर्थी हा शब्द वापरतोय) आणि तरीही विलक्षण डाऊन टू अर्थ व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आधी वाचनातून झाला होता (अलीकडेच त्यांचं निधन झालं. विस्मृतीत गेलेल्या या माणसाच्या स्मृती माझ्या मनात त्यावेळी जाग्या झाल्या ते हुबळीतील त्या मैफिलीच्या चौकटीतच). ते या मैफिलीत? माझ्यासमोरचा प्रश्न. अज्ञानातून आलेला. कारण ते त्या कार्यक्रमाचे एक प्रमुख आयोजक होते. त्यांच्यात हाही एक रसिक दडला होता ते माझ्याबरोबरीच्या ज्येष्ठ व्यक्तींना ठाऊक होतं. शारदाप्रसादांबरोबर या ज्येष्ठांच्या संगीत या विषयाला धरून झालेल्या चर्चेनं पुन्हा डोक्यात सूर घुमू लागले ते दुपारी ऐकलेल्या संतूरचेच.
नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण संतूरच्या त्या सुरावटी मला कुठंतरी एखाद्या प्रसन्न अशा झऱ्याच्या काठी आपण बसलो आहोत अशा वातावरणात घेऊन गेल्या होत्या. झऱ्याचा खळखळाट आणि त्या सुरावटी यांचं काही तरी नातं असावं. किती तरी काळ त्या सुरावटी माझ्या मनात जाग्या होत्या. त्या यायच्या त्याच मुळी माझ्या शहरी गजबजाटापासून मला दूर नेत. निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देत.
मग लक्षात येत गेलं, की हे ऐकलं पाहिजे. यात काही तरी निश्चितपणे आहे. त्यामुळं ऐकणं महत्त्वाचं. निदान वाद्यसंगीत तरी. निर्णय झाला. त्या मैफिलीची ही देणगी पुढं आजवरच्या जगण्याला सावरून धरत गेली.

मिरज. खांसाहेब अब्दुल करीम खां यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारा संगीत महोत्सव. हुबळीतील निर्णयानंतर मिरज गाठणं सोपं होतं. मिरजेचा हा महोत्सव तेथील एका दर्ग्यात भरतो. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही चमकदार कामगिरी गायक-वादकानं केली तरी टाळ्या वाजवता येत नाहीत. हा संकेत तिथला. त्याचं कारण त्या काळी कळलं होतं, पण आत्ता आठवत नाही (महोत्सवाची ती परंपरा आज तेथे कायम आहे की नाही याचाही पत्ता नाही). टाळ्या नाहीत; तरीही संगीताची मैफील? पुन्हा एक प्रश्न. प्रत्यक्ष मैफिलीत गेल्यावर त्याचा सच्चेपणा पटला. सुरांच्या सच्च्या भक्तांसाठी टाळ्यांची गरज नसते. मान डोलावण्यातूनही काय घडतं त्याचा अनुभव त्या तीन रात्री तिथं घेतला.
रागदारी कळण्याचा प्रश्न त्याही वेळी नव्हता (आजही नाहीच). दुसऱ्या रात्री गणपती भट यांचं गायन होतं. त्यावेळी उदयोन्मुख आश्वासक गायकांच्या यादीत आघाडीवर नाव असायचं त्यांचं. पावणेदोन तास हा तरूण गायक गायला. या मैफिलीपर्यंत तरी मी शास्त्रीय गायन या प्रकाराकडं फारसा आकृष्ट झालेलो नव्हतोच. हुबळीतील तीन रात्रींमध्ये गायनाच्या वेळेस बऱ्याचदा मी डुलक्या काढल्या होत्या. वाद्यसंगीत आलं की मात्र झोप उडायची. गणपती भट यांच्या गायनाला डोळे उघडे ठेवण्याची एक प्रकारे कसरत करावी लागली होती. कारण मित्रांसमवेत मी बसलो होतो ते पहिल्याच रांगेत. मित्र माझ्याच वयाचे, पण शास्त्रीय संगीतात माझ्यापेक्षा कित्येक पावलं पुढं असणारे. कोणी तबल्यात तर कोणी हार्मोनियमवर. कोणी गायन करणारा. तेवढी एकच गोष्ट डोळे उघडे ठेवण्यास पुरेशी होती. आरंभीचं गायन मी ऐकलं. सूक्ष्म स्वरूपात सूर कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण मध्येच कुठं तरी आतमध्ये काही तरी व्हायचं. अंगावर रोमांच यायचे एखाद्या तानेनंतर. गायनाच्या अखेरीला वीज चमकावी तशी एक तान घेत त्यांनी तराणा सुरू केला आणि मी उडालो. मनात खोलवर काही तरी झालं. डोळे मिटले गेले आणि एखाद्या पहाडावर आपण आहोत अशी प्रतिमा डोळ्यांपुढं आली. खाली खोलवर दरी आहे, समोरचा सुळका आकाशात घुसला आहे. आपण या पहाडाच्या कडेवरच आहोत…
बाहेर तराण्याची लय वाढत गेली. डोळ्यांसमोरच्या पहाडाची जागा हळूवारपणे फुलांचा एका ताटव्याने घेतली. काही क्षणांतच तो पूर्ण फुललेला ताटवा डोळ्यांसमोर उभा राहिला. दरी बेपत्ता, समोरचा पहाड बेपत्ता आणि विशेष म्हणजे मी उभा होतो तो पहाडही नव्हताच मुळी; ती सपाटीच होती. ताटव्याला जोडणारी. तराणा थांबल्यानंतर बराच काळ कानात ते सूर घुमत होते. डोळे मिटले की, त्या सुरांना साथ देत ताटवा समोर यायचा. केवळ अद्भूत.
आजही सकाळच्या संवादातून हे आठवलं तसं अंगावर रोमांच उठताहेत सारखे.
इथं मनःपटलावर काही प्रतिमा उभ्या राहिल्या म्हणून वर्णन करण्यासाठी शब्द सापडताहेत. एरवी सूरही कळत नसताना, ते कळू शकणाऱ्याचीही ‘शब्दच नाहीत’ अशी स्थिती होत असेल तर, आपलं काय? पुन्हा एक प्रश्नच.

ऐकण्याचा (फक्त ऐकण्याचा, समजून घेऊन ऐकण्याचा नव्हे) प्रवास सुरू झाला तेव्हा सुरवात झाली ती काही अल्बम्सनी. एखादी थीम घेऊन केलेल्या अल्बम्सचा काळ तो. कोल्हापुरात शाहुपुरीत रहायचो. जायऱ्यायचा रस्ता एस. टी. स्टँडसमोरून. तिथं आतल्या बाजूला एका दुकानात कॅसेट लावून ठेवलेल्या असायच्या शेल्फवर. आधीच्या दीडेक वर्षांत केव्हाही तिकडं पावलं वळली नव्हती. वळायची ती त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलकडं. कारण मिसळ हा त्यावेळचा आम्हा मित्रांचा पूर्ण आहार असायचा. रात्रीदेखील त्यासाठी आम्ही राजवाडा चौक गाठायचो. किंवा मग स्टँडवर बिर्याणी. त्या कॅसेटच्या दुकानाकडं पावलं वळली पहिल्यांदा तेव्हा खिशात एकूण होते शंभर रुपये. पुढच्या पंधरवड्याचा बसप्रवास आणि इतर खर्चासाठीचे. खाटकन त्या दिवशी तीस रुपये गेले. ‘कॉल ऑफ व्हॅली’वर. चहा-बिस्कीटांवर दिवस कसे असतात त्याचा एक अनुभव नंतरच्या पंधरवड्यात त्या तीस रुपड्यांनी दिला. पण त्याच तीस रुपड्यांनी दिलेला दुसरा अनुभव अनमोल होता. तो अनुभव खर्चात पाडत गेला, कमावण्याची अक्कलही देत गेला.
‘कॉल ऑफ व्हॅली’. अल्बम जुनाच; पण माझ्यासाठी नवा. हाती कॅसेट आल्यानंतर मी तडक खोली गाठली आणि वॉकमन सुरू केला. पूर्ण कॅसेट ऐकून काढली. आधी काहीही प्रतिक्रियाच उमटली नाही मनातून. कॅसेटचं कव्हर काढलं आणि पाहिलं तर सारी भाषा सांगीतिक. रागांची नावं. एक क्षण वाटलं तीस रुपये वाया गेले की काय? पुन्हा कॅसेट टाकली. ऐकू लागलो. बासरी आहे आणि संतूर आहे हे कलाकारांच्या नावावरून समजत होतं. पण ब्रिजभुषण काब्रा? यांचं वाद्य कुठलं? पुन्हा प्रश्नांची मालिका. पण त्याकडं दुर्लक्ष करून ऐकत गेलो. पहाडीमधल्या संतूरनं कब्जा केला आणि पाठोपाठ पिलू. दोन्हींमधून उमटणारी प्रतिबिंबं पुन्हा पहाडाचीच. हा पहाड सारखा का येतोय? धून पहाडीतील आहे म्हणून? केवळ तेवढंच असणार नाही. कारण पहाडी राग नसतानाही पहाड उभा राहतोच डोळ्यांसमोर. गणपतीच्या तराण्यानं उभा केला होता आणि तो तराणा पहाडीतला नव्हता एवढं निश्चित.
ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, स्वतःला बजावत गेलो. मग आणखी एक गोष्ट लक्षात येत गेली. हा वॉकमन कानाला असेल आणि त्यातून अशा काही सुरावटी असतील तर हातातलं काम सोपं ठरतंय. लेखन असो वा वाचन. दोन्ही. सुरावटींकडं ध्यान असतं का? खचितच नाही. पण त्यातलं काही समजत नव्हतंच. त्यामुळं ध्यान देण्याची गरज वाटत नव्हती. कारण प्राधान्याचं काम होतं हातातलं. लेखन किंवा वाचन (या प्रवासात आजही बालवाडीतच राहण्याचं कारण त्यावेळच्या त्या प्राधान्यक्रमात असावं कदाचित). मग ती एक गुरूकिल्ली ठरली. लेखन-वाचन करताना संगत हवी ती सुरावटींचीच. आणि सुरू झाला एक सिलसिला सुरावटींशी. त्यानिमित्तानं केलेल्या खरेदीशी.
‘पंचमहाभूत’ या संकल्पनेवर आधारलेले वेगवेगळे अल्बम कॅसेटच्या रुपानं आले. हे काही अस्सल शास्त्रीय स्वरूपातले आहेत का, तर काहींच्या मते नाहीतही. पण ते खोलीवर आले. संतूर आवडू लागलं म्हणून शिवकुमारांच्या काही कॅसेट्स आल्या. मध्ये धाडस करून एकदा सरोद आणि सतारही आणली. ही दोन्ही वाद्यं मला तरी संतूरपेक्षा ऐकण्यास जड वाटत आली होती. पण तीही ऐकली. एकदा-दोनदा नाही. वेगवेगळ्या वेळी बऱ्याच वेळेस ऐकली. पण मनात मात्र घर केलं होतं संतूरनंच. सनई हे वाद्य तसं या ऐकण्याच्या संदर्भात अतिपरिचयात-अवज्ञा अशा स्वरूपाचं ठरलं होतं. पण इतर काही कॅसेट आल्या. त्यात शोभा गुर्टूंचा समावेश होता. ठुमरी.
ऐकत होतो. रात्रपाळी झाली की, तेव्हा रेडिओवर उशीरा शास्त्रीय संगीत राष्ट्रीय केंद्रावर चालायचं. तेही ऐकायचो आवडीनं. सोबत काम करणाऱ्यांपैकी एक-दोघे ज्येष्ठ कर्मचारी थोडं फार कळणाऱ्यापैकी होते. त्यांच्या चर्चा सीमेवरून ऐकायच्या.
पण जाण? नाहीच.

रागसंगीत आणि त्याचं काळाशी नातं हा विषय आता समोर आला. रागाचं, त्यातल्या सुरांच्या क्रमाचं नातं प्रत्येक प्रहराशी असतं असं कोणी तरी सांगितल्याचं ऐकलं. या विषयावरच्या चर्चांच्या सीमेवर राहण्याचा तो काळ. त्यामुळं ती ऐकून आपण काय ऐकतोय त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न एवढंच त्याचं महत्त्व. म्हणजे असं की, मी शास्त्रीय संगीत ऐकतो म्हणजे काय करतो, असं एकदा या विषयाशी दुरान्वयानंही संबंध नसणाऱ्या मित्रानं विचारलं. त्याच्यासमोर फेकण्यासाठी आपण एक वाक्य तयार करू शकतो असा हा प्रयत्न. पंडित जसराजांच्या ‘अष्ट प्रहर’ या चार कॅसेट दाखल झाल्या संग्रहामध्ये, त्यामागचं कारण तेच. समजून घेण्याचा प्रयत्न करू, ही भावना. हे अशा स्वरूपाचं ऐकण्याचा तो पहिलाच प्रयत्न. आधी प्रहर वगैरेंकडे लक्ष देण्याचा उगाचच प्रयत्न केला, पण एकूण कानाची बैठकच अशी की, त्यांची गायन सुरू करण्याआधी श्लोक सादर करण्याची पद्धतीच भाव खाऊन गेली (पुढे हा श्लोक आणि त्यांचं ते आधीचं “जय हो” यांचा पगडा अधिक… मग त्यावरची टीकाही कानी आली… असो). प्रहर आणि त्यानुसार राग ऐकणं नंतर बाजूला पडलं. पुढं माझ्या ध्यानी आलं की, आपलं चुकतंय. हा प्रांत आपल्यासाठी तरी स्वयंसाधनेचा नाही. कारण सूरच कळत नाहीत. तेव्हा इथं आपल्याला गुरूच करावा लागेल. हा ‘साक्षात्कार’ झाला तेव्हा मात्र त्या कॅसेट सरळ उचलून शास्त्रीय संगीत कळतं अशा एका ज्येष्ठ स्नेह्याला देऊन टाकल्या आणि शास्त्रीय संगीत समजून घेण्याचा तो एक प्रयत्न सुरू होण्याआधीच विझून गेला.
पण ऐकणं थांबलं नाहीच. त्यातून मनात प्रतिमा, प्रतिबिंबं निर्माण होणं तर थांबलं नाहीच.
त्याचाच हा पुढचा अनुभव. पुन्हा इथं संतूरच आहे. पण अनुभव वेगळा. माझी ती मर्यादा असावी कदाचित. ‘म्युझिक ऑफ माऊंटन्स’ नावाचा एक अल्बम आहे शिवकुमारांचा. त्यातल्या रचना आजही मी असंख्यवेळेस आवडीने ऐकतो. अनेक जण ऐकत असतील. या रचना मी आधी त्यांची नावं न पाहताच ऐकायचो. ज्या क्रमानं अल्बममधून येतील त्याच क्रमानं. एके दिवशी रात्री काम करीत बसलो होतो. झोपण्याची चिन्हं नव्हती. बराच काळ गेला आणि तो अल्बम सुरू झाला. काही वेळानं अचानक कान टवकारले. नवी सुरावट कानी घुमू लागली. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला. सकाळ झाली की काय म्हणून चमकून मी पाहिलं, बाहेर अंधार दिसत होता. घड्याळाकडं पाहिलं, काटे पाचच्या आसपास होते. लक्ष सुरावटीकडं वळवलं. तिचं नाव होतं ‘हिमालयन डॉन’. पहाटेची ही अनुभूती वेगळीच होती. मग बारकाईनं पुन्हा सारी नावं पाहिली तर त्यात चक्क अष्टप्रहर गुंतलेले होते. सनराईज ऑन द पीक्स, ट्वायलाईट झोन, इव्हनिंग प्रेयर (आता ट्वायलाईट आधी की इव्हनिंग प्रेयर? माझ्या मते, माझा क्रम बरोबर आहे), शिकारा बाय मूनलाईट… मध्ये इतर. अर्रे!!! हे तर अशा क्रमानं ऐकलं पाहिजे एकदा. एकदा कशाला? त्याच क्षणी पुन्हा रचना फेरमांडणी करून घेतल्या आणि हातचं काम बाजूला ठेवून ऐकत बसलो. साधारण तासाभराचा काळ होता तो आणि पहाटेच्या त्या प्रहरी प्रसन्न अनुभव घेत मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा इतर रचनांची नावं पाहिली. त्या रचनांची नावं बॅलड, एकोज फ्रॉम द व्हॅली, स्प्रिंगटाईम, माऊंटन लव्ह सॉंग, स्पिरिट ऑफ कश्मीर अशी आहेत. त्यावरून ना त्यांचा प्रहर कळतो, ना राग. पण अनेकदा ऐकल्यानंतर काही ठोकताळे बसले आणि या साऱ्या रचना काळानं वर्णन होणाऱ्या रचनांच्या मध्येच कुठंतरी बसतात असं वाटू लागलं. आजही ऐकतो ते त्याच क्रमानं. हे बरोबर आहे की चूक? ठाऊक नाही. राग कळणारा एखादा त्यातलं बरोबर काय आणि चूक काय हे सांगून त्याचा नवा क्रम समजावून देऊही शकेल. पण… पण हिमालयन डॉन ऐकताना झालेली पहाटेची अनुभूती? तिचं काय? तो माझ्यासाठी नुसताच अज्ञानातील आनंद नाही तर अज्ञातातील आनंदही आहे. तो आता बुद्धीच्या कसोटीवर कसा तपासून पहायचा?

कुमार गंधर्व गेले त्या दिवशीची गोष्ट. दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवर असताना ती बातमी आली. काही क्षण सुन्न मनस्थितीत गेले. ऑफिस आणि माझी खोली यातलं अंतर वीस पावलांचं. त्यामुळं तडक खोली गाठली. ती कॅसेट काढली आणि ऑफिसात काम करताना शेजारी टेप ठेवून ती लावली. त्या मनस्थितीत कसलंही काम करणं शक्य झालं नाही. सारं काही सहकाऱ्यावर सोपवून मी शांतपणे ती भजनं ऐकून काढण्यात वेळ घालवला. ही भजनं मनात घर करून गेली होती ती त्यांच्या वेगळ्या जातकुळीतल्या गायनानं. जातकुळी वेगळी आहे हे समजलं होतं तेही त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वाचल्यानंच. आधी ते वाचनातून समजलं आणि मग तौलनीक स्वरूपात काही ऐकत गेलो त्यातून आकळत गेलं. पण तेवढंच आकळणं. त्यापलीकडं त्याचं वेगळेपण सांग असं कुणी म्हटलं तर हात टेकलेलेच असायचे. मनात म्हणायचो, माझ्यासारखे कान करा, कदाचित वेगळेपण कळेल. पण हे उघड बोलणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा आपण अज्ञानी आहोत हे कबूल करून टाकणं सोपं…
त्याच रात्री वीणा सहस्रबुद्धे यांची मैफल होती. ती होईल की नाही अशी धाकधूक होतीच. तरीही सभागृह गाठलं. अपेक्षेप्रमाणे शंभर-सव्वाशेच मंडळी होती. वीणाताई आल्या आणि आम्ही हुश्श केलं.
मैफल सुरू झाली. एक राग झाला. मध्ये एक नाट्यगीत घेतलं त्यांनी. मध्यंतर आणि पुन्हा एक राग. एव्हाना गायन ऐकताना झोप वगैरे प्रश्न राहिले नव्हते. ऐकायचं, नीट ऐकायचं. मध्ये एखादा सूर, तान आत जाते. भिडते. छातीत कळसुद्धा आल्यासारखं वाटतं असं चक्र आता सुरू होतं. त्याच अवस्थेत त्या रात्रीही वीणाताईंचं गायन ऐकत गेलो.
पावणेबाराच्या सुमारास वीणाताई बोलल्या. कुमारांचं निधन झाल्याचं सांगून म्हणाल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मैफल थांबवते. आणि सुरू झालं “उड जायेगा… हंस अकेला….” अनेक श्रोत्यांचे हात डोळ्यांकडे गेले. माझेही. हंस उडताना पाहिलाय का, या एरवीही अनेकदा ते भजन ऐकताना गंमत्या स्वभावातून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री मिळालं. उडणाऱ्या हंसासोबत कुमारांचे प्रत्यक्ष सूरही त्याच भजनाचा हात धरून त्या दिवशी अनंतात विलीन झाले असावेत. डोळ्यांसमोर तीच प्रतिमा. हंस उडतोय… मध्येच कुमारांचा चेहरा. त्यांची ती ‘सह्याद्री’वरची मुलाखत. बोलताना अनेकदा दिसणारं त्यांच्यातलं लहान मूल. आणि कानात बाहेरून वीणाताईंचा तर आत पार्श्वभूमीवर त्या दुपारी आणि आधी अनेकदा ऐकलेल्या कुमारांच्या भजनाचा सूर. अस्वस्थ… केवळ अस्वस्थ.
पु्न्हा मनात प्रश्न… काय नातं आहे कुमारांच्या त्या सुरांशी? इतकं गहिरं काही, की ते गेल्याचं जाणवून असं अस्वस्थ वाटावं… हे काय आहे नेमकं? उत्तर नाहीच. पुन्हा कान फक्त काही ऐकण्याकडंच वळतात.

नोकरी नसलेल्या मधल्या काळात स्वयंरोजगाराचा प्रयत्न सुरू होता. प्रशासकीय स्वरूपाच्या एका पुस्तकासंबंधीचं काम करीत होतो. अजब होतं ते सारं. आम्ही एका लॉजमध्ये खोली घेऊन तिथंच या कामाचा संसार थाटला होता. सकाळी अकराच्या सुमारास काम सुरू करायचो ते रात्री बारापर्यंत चालायचं. तेव्हा संगणकावर गाणी हा प्रकार ठाऊकही नव्हता. त्यामुळे सोबत असायचा टेप आणि भारंभार कॅसेट्स. त्या ऐकत काम चालायचं. लक्ष कामाकडं होतं तसं गाण्याकडंही होतं. मंतरलेल्या त्या काळात त्या पुस्तकाच्या लेखकासमवेत खरी साथ दिली ती सुरांनी. इतकी की प्रशासकीय नियम, सेवाशर्ती, न्यायालयीन निकाल असे रुक्ष विषय असूनही त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत उल्लेख झाला तो गायक-वादकांचा. त्यांनी, म्हणजेच त्यांच्या सुरावटींनी दिलेल्या साथीचा. त्यात जसराज होते, परवीन सुलताना होत्या, आणखीही काही मंडळी होती.
का असं वाटलं असावं आम्हाला की त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावेत? त्यांच्या सुरांनी दिलेली साथ हे एक कारण होतंच. पण त्याहून महत्त्वाचं ठरलं होतं म्हणजे त्या सुरांच्या साथीत झालेल्या कामाचा तो एकूण अनुभव. हा निष्कर्ष केवळ दोनेक वाक्यातून निघाला होता आणि प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदात आधी नावं आली या कलाकारांची.
ऐकण्याचा हा असा फायदा? एक सुंदर अनुभव घेण्याचा? तेही जे ऐकतोय त्यातलं काहीही कळत नसताना?

माझ्या कादंबरीच्या लेखनाचा काळ. पहिला मसुदा मी अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केला होता. पण एका मित्रानं जमिनीवर आणलं. म्हणाला, “सिद्धहस्त नाहीस. थोडा वेळ घे.” दीडेक महिन्याचा खंड टाकला आणि पुन्हा त्यावर काम करणं सुरू केलं. आता सारं काही संगणकावरच होतं. सोबतीला सुरावटी असतात. एमपीथ्रीचं वेड लागून त्यातूनही बाहेर आलेला हा काळ होता. हे लेखन करताना सुरावटींचीच साथ होती. कारण हे असलं लेखन म्हणजे जीवघेणं असतं. जीव जाऊ द्यायचा नसेल तर साथ हवीच. ती सुरावटींची.
‘सेलेब्रेशन’ हा हरिप्रसाद चौरसियांचा अल्बम तेव्हा असाच हाती लागला होता. त्यातलं ‘शेफर्ड सॉंग’ आणि त्याला जोडून असलेल्या ‘क्रेसेंडो’ आणि ‘फ्री स्पिरीट’ या नावाच्या दोन धून. बास्स. आधीच बासरी आणि त्यात हे असं धनगरी/गुराख्याची धून वगैरे. मन राहतंय कशाला थाऱ्यावर. कादंबरीची पार्श्वभूमी आदिवासी जनसमुहांची. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या चिरंतनपणे चालत आलेल्या संगीताचा आस्वाद घेण्याची अनेकदा संधी मिळाली होतीच. त्यातल्या पाव्याच्या सुरांचं नातं इथं या ‘शेफर्ड सॉंग’शी जमायचं. सूर ऐकण्याचे दोन्ही स्तर वेगळेच. एक त्या तिथं, कुठंतरी कित्येक मैलांचं अंतर चालत कापून ऐकलेला, दुसरा इथं सगळ्या सोयी-सुविधांच्या जगात आधुनिक साधनांच्या साह्यानं ऐकलेला. पहिल्या स्तरावर डोळ्यांपुढं केव्हा तरी येऊन गेलेला तो आदिवासी गुराखी; गुरांचा कळप, त्यापाठोपाठ काखेत काठी धरून मनमुराद, निश्चिंतपणे पावा वाजवत निघालेला. त्याच्या त्या सुरावटीमध्ये काही क्रम वगैरे नसावा, चाल वगैरेही नसावी. किंवा माझ्या कंडीशनींग झालेल्या मनात ते उमटत नसावं. तो सूर बेगुमानपणे उधळून देत चालला होता. त्याच्या मागं एक दरी आणि तिच्यापलीकडं संध्याकाळच्या प्रवासाला लागलेला सूर्य. तांबडाबुंद. मी असतो इथं घरी. वेळ आहे रात्री केव्हा तरी किंवा सकाळ-दुपारची. ‘शेफर्ड सॉंग’ ऐकू लागलो की हमखास ते दृष्य डोळ्यांसमोर येतं. मग त्यापुढच्या ‘क्रेसेंडो’ या काहीशा फ्यूजनकडं झुकणाऱ्या सुरावटीनं मन आक्रंदून निघतं. पुढच्या “फ्री स्पिरीट” सुरावटीच्या वेळी म्हणतं, चल तिकडं जाऊ, त्या भागात. नागरी जीवनातील गजबजाटापासून मुक्ती, स्वातंत्र्य देणारं जगणं माझ्यादृष्टीनं तिथं होतं. तीच भावना नेमकी त्या ‘फ्री स्पिरीट’मधून कशी येते बाहेर मनाच्या उंबरठ्यापर्यंत?
असं का, पुन्हा प्रश्न. सूर हे त्यावरचं उत्तर हे मान्य. पण म्हणजे काय?

प्रश्नांच्या या भेंडोळ्यात सापडलो असतानाच मध्यंतरी एकदा शौनक अभिषेकी यांच्याशी बोलण्याचा योग आला. बोलता-बोलता शास्त्रीय संगीताविषयी जितेंद्र अभिषेकी यांचे विचार त्यांनी सांगितले. “थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो.” बुवांचं हे विधान. खरंच असावं, हे मनात पक्कं झालं. एव्हाना त्यांनी ‘कट्यार’मध्ये केलेले प्रयोग वगैरे ऐकलं होतं. भैरवीनंच ‘कट्यार’चा आरंभ हा तो एक प्रयोग. इतरही आहेत. भैरवीनंच आरंभ करण्याच्या प्रयोगाचा अर्थ कळत नव्हता. भैरवी सकाळच्या आरंभीच्या प्रहरी किंवा पहाट ते सकाळ या सीमेवर गायची किंवा मैफिलीचा समारोप करण्याची रागिणी इतकंच काहीसं ठाऊक होतं. (प्रश्न असायचेच, बौद्धीक कसरतीतून आलेले. रागिणी सकाळची असेल आणि मैफल संध्याकाळी संपणारी असेल तर काय?) पण त्यामुळं ‘कट्यार’च्या अनुभूतीत कसा फरक पडतो? पडत असावा. पुढं हे नाटक दोनदा पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवली. या नाटकाचा आरंभच मुळात एक मैफल संपतानाचा आहे. तेव्हा सुरवात भैरवीनं करण्यामागचं प्रयोजन बरोबर असणार इतकंच लक्षात आलं. आता हे असं इतरही अनेकांच्या ध्यानी आलं असेलच. पण…
हा पण काही पिच्छा सोडत नाही.

शास्त्रीय नाही, पण तोच पक्का आधार असलेली दोन गाणी आहेत. “हे सुरांनो चंद्र व्हा…” आणि “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” दोन्हींना माझ्या माहितीप्रमाणे संगीत आहे ते अभिषेकींचंच. एक ‘ययाती’मधलं आणि दुसरं… ठाऊक नाही. इतकंच कळतं की ही गझलेच्या अंगानं जाणारी रचना असावी. शंकर रामाणी यांची कविता. माझ्याकडं “हे सुरांनो…” बहुदा अर्चना कान्हेरे यांच्या आवाजातलं आहे. राग बहुदा चारुकेशी. जीवघेणी पेशकारी. कमालीची आर्तता आणि विनवणी. सूर साक्षात उभे राहिले आणि ती आर्तता त्यांनी ऐकली तर कदाचित त्या आर्ततेपोटीच प्रियकराकडं धावत जाऊन चांदण्यांचे ते कोष पोचवतील. “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” आवाज बुवांचाच. हे गीत सरळसरळ विरहानं व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आक्रोशाचं आहे, हे माझं आकलन. अर्थ वेगळाही असू शकेल. पण माझं या गीताशी जुळलेलं नातं “हे सुरांनो” सोबतच येत गेलं. कारण संगणकावर ऐकताना एका फोल्डरमध्ये ते त्याच क्रमानं येत गेलं. त्यामुळं तो अर्थ. आता या गाण्यातले शब्द समजतात आणि अर्थ लागतो असं म्हणणं इतक्या काळानंतर सोपंच आहे. पण सुरवातीला माझं ध्यान त्या शब्दांकडं फारसं नसायचंच. अनेकदा तर ‘हे सुरांनो’मधील “वाट एकाकी तमाची…” याऐवजी मी “वाट एकाकीच माझी…” असं घेऊन बसायचो. कारण मनात घर केलं होतं ते त्यातल्या सुरांच्या आर्ततेनं. मग शब्दांकडे ध्यान जायचंच नाही. तीच गोष्ट ‘रंध्रात’ची. त्यातली आर्तता अनुभवायची असेल, आक्रोश समजून घ्यायचा असेल तर प्रेमविरह हवाच का? नाहीच. ती पोचतेच त्याविनाही. त्या, आपण स्वतः नसलेल्या, प्रेयसी आणि प्रियकराच्या भूमिकेत हे सूर नेतातच.
आणखी एक. राग भूप. किशोरीताई. “सहेला रे”. केवळ अनुभवण्याची चीज (हा शब्द त्या अर्थानं नाही. एक गोष्ट या अर्थानं). ‘सहेला’सोबत सप्तसूर, त्यांचं ज्ञान करून घेणं. मुळात कल्पनाच जीवघेणी. त्यातल्या “आ मिल गाये” मधल्या “आ” मधला पुकार… वेगवेगळ्या धर्तीचा. मघाचे ते “चांदण्यांचे कोष” पोचवणारे सूर आता इथं प्रियकरालाच समोर आणून उभे करतात. शब्दच नाहीत, असा हा अनुभव येतोच.
कशामुळं घडतं हे? काय करतात हे सूर नेमकं आपल्याला?
दाखले असे द्यावेत तरी किती? एकेक रचना, मनात जाऊन बसलेल्या, बाहेर काढायच्या ठरवल्या तरी प्रश्नांचं स्वरूप तेच राहतं. मग ते रागदारी गायन असो, शुद्ध रागदारी किंवा फ्यूजन प्रकारातलं वाद्यसंगीत असो, ठुमऱ्या असो, दादरा तालातल्या रचना किंवा अनंत गझला. भावगीतेही आहेत. त्यातलीही एखादी जागा अशी मनात जाऊन बसलेली असते. सोबत तिच्या अशा खास आठवणी असतात.

ही एक अशीच गोष्ट. मध्यंतरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला काही अनुवाद करण्याची एक संधी मिळाली होती. त्यातून माणसासमोर चिरंतन काळापासून असलेले काही मूलभूत प्रश्न समजत गेले. हे सारं गद्यातून लिहिलं गेलेलं. कधी कल्पनाही केली नव्हती की त्यातील काही पायाभूत प्रश्न संगीताच्या रूपानं आपल्या डोक्यात थोडा प्रकाश टाकून जातील. संतांच्या रचना आहेतच. त्या ऐकल्याही होत्या. पण तशा अर्थानं ते प्रश्न आत जाऊन पूर्ण भिडलेले नव्हते. उदाहरणार्थ, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे…” यात किंवा “पसायदान”मध्ये वैश्विक मुद्यांचीच हाताळणी झाली आहे. त्या अर्थानं ते तत्वज्ञानच. आणि त्या संताच्या संपूर्ण कृतींचा विचार करून त्या रचना पाहिल्या तर पूर्ण तत्त्वज्ञान असंही म्हणता येतं. पण माणसापुढं वैयक्तिक स्वरूपातला प्रश्न असतो त्याची मांडणी माझ्या ध्यानी आली ती जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेल्या एका भैरवीतून. रचना कबीरांची आहे. “मेरा तेरा मनवा कैसा एक होय रे…” बास्स. या एका प्रश्नात खरं तर कबीरांनी सारं काही सांगून टाकलंय, पण ते ज्यानं थोडं तत्त्वज्ञान वाचलंय त्याच्यासाठी. इतरांचं काय? पुढचा दोहा आहे, “मैं कहता अखियन देखी, तू कहता कागजकी लिखी…” हेही उत्तर पुरत नसेल तर पुढच्या एका दोह्यात कबीर अगदी अंतिम स्वरूपाचा पर्याय सांगून जातात. म्हणतात, “मै कहता तू जागत रहीयो, तू रहता है सोयी रे…!” अभिषेकी आणि बहुदा शौनक या दोघांनी त्यात ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर जो काही स्वरांचा – सुरांचा खेळ केला आहे काही क्षणांसाठी, तो तिथंच मनाचा प्रवास थांबवतो त्या काळासाठी. पुढं सरकावंसं वाटू नये असं काय आहे त्या शब्दांमध्ये? आहे ते, त्या शब्दांच्या अली-पलीकडील शब्दांतून येतंच. पण तरी मन तिथंच थांबू पाहतं. थांबत असलं तरी, त्या दोह्याचा अर्थ पक्का सांगून जातं. मग विपश्यना म्हणजे काय हे समजू लागतं, ध्यान म्हणजे काय हे समजू लागतं. ध्यान किंवा विपश्यना भले जमणार नाही, पण त्याचं तंत्र समजल्यानं एकदम बुद्धाला क्वांटम फिजिक्स कळलं असेल का, असा भलताच प्रश्न डोक्यात जागा होऊन जातो. ही केवळ त्या ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर झालेल्या सूर-तालाच्या करामतीची किमया आहे का? पुन्हा इथं तेच. इतर काही रचनांतून न भावलेलं वैश्विक सत्य इथं या रचनेतच का भावावं? रचना भैरवीत आहे. पण भैरवी तर मला ओळखताही येत नाही. पण मग शब्दांचा अर्थ एरवी जितक्या ताकदीनं संप्रेषित होत नाही तितका इथंच का होतोय? सुरांची ताकद हे उत्तर ठीक. पण म्हणजे काय?
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणे, खरं तर कोणत्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठं थांबवायचा याचं प्रत्येकाचं आकलन त्यातून तयार होतं. हे असंच संगीताचं असावं बहुदा…

संगीत समजून ऐकणं आणि न आकळताही संगीत ऐकणं हे द्वंद्व माझ्या मनात कायमचं घर करून बसलंय. मन आणि मेंदू यातलं हे द्वंद्व आहे का? असावं बहुदा. ऐकताना कुठंही काहीही कमी वाटत नाही. तरी जे ऐकतोय त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभूतीचा अर्थ लावण्यासाठी मनाला पुरेशी ताकद लागते ती मिळत नाही. ती बुद्धीची ताकद असं तर नाही? तिथं मेंदू कामाला येतो का? म्हणजे तो सूर, ताल, लय, स्वर वगैरेंचं विश्लेषण करून मनापर्यंत पोचवत असावा का? गुरू केल्याशिवाय हे झेपणे नाही हे उत्तर देऊन तात्पुरतं मनाचं समाधान होतं, पण तो प्रयत्न होत नाही आणि मग पुन्हा असं काही ऐकलं की जिवाची घालमेल होतेच. अशी अनुभूती चित्रगीत, भावगीत यासंबंधात होते का? माझा अनुभव असा आहे की, होतो; पण तेथे त्याचा गहिरेपणा अपवादात्मकच असतो. अपवादाचीच गोष्ट सुरू आहे म्हणून त्यापैकी दोन गीतांचा उल्लेख करावा लागेल. एक आहे चित्रगीत “कभी तनहाईमें यूँ”, संगीत स्नेहल भाटकरांचं; आणि दुसरी आहे गुलाम अलींच्या (थोरल्या नव्हे; छोट्या) आवाजातली एक ठुमरी, “गोरी तोरे नैना…” पारंपरिक पद्धतीनं पेश केलेली आणि सोबत तिचा दादरा. या दोन्ही रचनांमध्ये काय भिडतं आत जाऊन? सांगणं शक्य नाही. पण वेडावतात या दोन्ही रचना. यातली पहिली अनेकांना आवडत असेल. “गोरी तोरे नैना” ही ठुमरी सगळ्यांनाच भावते की नाही ठाऊक नाही.
अशाच एका चर्चेत माझ्या मित्रानं सांगितलं होतं, या अपवादाचा नियम करावयाचा असेल तर थोडं शास्त्रीय संगीत शिकून घ्यावंच लागेल तुला. त्यासाठीचा दाखला साधा सरळ होता. आमच्याच संवादातला. मी म्हणालो होतो, अनेकदा सुरेश वाडकरांच्या ‘ओंकार स्वरूपा’मधल्या काही रचना सकाळी ऐकल्या की खूप प्रसन्न वाटतं. त्यानं ताडकन सांगितलं होतं, “कारण त्या सकाळच्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत.”
पुन्हा संगीत, सूर, लय, ताल आणि काळाचं नातं…
म्हणजे काय, तर प्रश्नच.
त्या मित्रानंच पुलंच्या एका दाखल्याचा आधार घेत सांगितलं, “न समजताही संगीत ऐकणं आणि त्यातला आनंद मिळवणं, शोधणं हे ठीक. पण ते कसं आहे की आंधळ्या शिल्पप्रेमीसारखं. तो आपला शिल्प चाचपडत राहतो, त्यातलं शिल्प त्याच्या हाती लागतंही. पण ते त्याला दिसत नसतं. शिल्पाचा आनंद त्याच्यालेखी स्पर्शाचाच असतो. तो असेलही त्याच्यापुरता पूर्ण; पण नेत्राच्या पातळीवर तो येत नाही. तसा आला नाही की हे असे प्रश्न येतात. तसंच हे तुझं.” पुलंच्या बंगचित्रंमध्ये या चित्रकाराचा दाखला असावा. अंध असूनही तो हातानं दाखवत चित्र करून घेतो असा काहीसा. तसं हे माझं. तो चित्रकार तिथं चित्र काढतानाचा आनंद जरूर मिळवतो. पण तयार चित्रकृतीचा दृष्टीसुखाला मात्र तो तसा पारखाच असतो.
हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.
प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?
हाही एक प्रश्नच…