प्रवास

ऑगस्ट 11, 2008

तो अनादी आहे. अनंतही असेल. असावाच. कारण आपल्याला अंत आहे.
तो. काळ.


संध्याकाळ. ५. ३०.
संध्याकाळ श्रावणातली असली तरी, श्रावणाचा कुठंही मागमूस नाहीये. ना पावसाची रिपरिप आहे, ना मधूनच येणारा उन्हाचा कवडसा. फक्त आभाळ गच्च भरलेलं आहे. पण ते कोंडलेलं आहे. कोणत्याही क्षणी मुक्तपणे उधळण करू शकण्याच्या परिस्थितीत नाही हे लगेचच जाणवून जातं. आम्ही दुष्काळी भागातच आहोत, हे दाखवण्यासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नाही.
बलवडी येथे संपतराव (पवार) यांनी आयोजित केलेल्या एक सुंदर कार्यक्रमासाठी मी तेथील क्रांती स्मृतिवनात पोचलो आहे. रस्त्यावरून साधारण फर्लांगभर अंतर आत गेलं की क्रांती स्मृतिवनाची सीमा सुरू होते. घनगर्द झाडी. वेगवेगळी झाडं. पावसानं चिखलमय केलेल्या पायवाटेवर अनेक फुलांची उधळण निसर्गानंच करून ठेवलेली. पारिजातक, मोगरा हीही त्यात आहेतच. त्यांचा गंध वातावरणात भरून राहिलेला आहे, असं म्हणता येईलही आणि नाहीही. कारण मधूनच तो गंध तुमच्या नाकपुड्या उल्हासित करून जातो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा अस्सल पावसाळी वातावरणाचा गंध तुमचा ताबा घेतो. स्मृतिवनाच्या उंबऱ्यशी पोचलो आणि मोराची केका वातावरणात घुमली. येताना रस्त्यातच चांगला साडेतीन फुटांचा पिसारा मिरवत असलेल्या एका मोरानं दर्शन दिलं होतं. आता इथं पुन्हा केका. एकूण थोडासा श्रावणाचा फील त्यातून यावा.
स्मृतिवनाच्या उंबऱ्यापासून आत शिरलो ते भजनाच्या सुरांनी कब्जा केला. ‘लहानपण देगा देवा’ची आळवणी सुरू होती. इतक्या विविध प्रकारे की, सांगता सोय नाही. साथीला पेटी आणि मृदंग. त्या सुरावटींवर स्वार होतच आम्ही पुढं सरकतो. एकूण तीन नवे वृक्ष त्या ठिकाणी लावण्याचा हा कार्यक्रम आहे. मेधा पाटकर यांच्या हस्ते तिन्हीचं वृक्षारोपण होतं. शिवाय संजय संगवई मंचाचं भूमिपूजनही. वृक्षारोपणाच्या जागा आणि मंचाची जागा यामध्ये अंतर आहे. संजयच्या आईंचा, विजयाताईंचा, संतसाहित्याचा अभ्यास. त्यामुळं भजनाची योजना. त्यांच्यासमवेतच वृक्षारोपणाच्या जागी आणि मंचाच्या जागी अभंग गातच दिंडीनं जाण्याची कल्पकताही संपतरावच दाखवू जाणे. आम्ही तशा दिंडीनंच त्या वनात फिरलो.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही. जो काही झाला तो अगदी माती भिजवण्यापुरताच. त्यामुळं पलीकडं येरळा नदीच्या पात्रात वाळूचंच दर्शन होतंय. वनाच्या कडेला थांबून मी येरळेकडे पाहतो. पश्चिमेला फर्लांगभर अंतरावर बळीराजा बंधारा दिसतो. कोरडा ठाक. कधीकाळी सामुदायीक स्वरूपात पाण्याची सोय करण्याचा एक आदर्श म्हणून ज्याचा उल्लेख झाला तो ‘बळीराजा’. दुष्काळानंच माणसाच्या या शक्तीवरही मात करून ठेवल्याचा हा आणखी एक दाखला.
लक्ष पूर्वेच्या दिशेनं वळतं. समोरचं एक डबकं साचलेलं आहे. त्याच्या काठाशी बसून एक मोर पाणी पितोय. आमच्यापासून अंतर बरंच आहे, त्यामुळं निर्धोक स्थितीत त्याचा वावर सुरू आहे. पिसारा फुलावा ही माझी इच्छा. पण पावसानंच अंतर दिल्यानं तो तरी बिचारा काय करेल? मघा रस्त्यात भेटलेल्या मोराप्रमाणेच हाही त्या पिसाऱ्याला नुसतंच आपल्या पाठी मिरवत फिरतोय.

रात्र. ९. ००.
संपतरावांच्या घरी जेवण करून आम्ही बसलो आहोत. समोर कात्रणांच्या, निवेदनांच्या असंख्य फायली. बळीराजाचा संघर्ष जसा त्यातून समोर उभा राहतोय, तसाच उभा राहतोय तो क्रांती स्मृतिवनाचाही संघर्ष. संपतरावांच्या एका चिरंजिवांच्या अकाली जाण्याची नोंदही त्या कात्रणातून समोर येतेच.
सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी कात्रणं आहेत ती संपतरावांनी पाणीनियोजनाच्या अनुषंगानं केलेल्या लेखनाची. आपल्या या प्रदेशात पाण्याचं नियोजन स्थानिक स्रोतांच्या संवर्धनाच्या अनुषंगानंच व्हावं अशीच त्यांची सारी मांडणी आहे. दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन सरधोपट मार्गानं करून चालणार नाही. त्यासाठी पाण्याचे स्रोत, त्यातील पाण्याची उपलब्धी आणि त्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न ठेवणारी पीकव्यवस्था आणि त्या पिकांना उत्पादन खर्चानुसार भाव ही त्यांच्या या मांडणीची चतुःसूत्री.
संपतराव बोलू लागतात तेव्हा या चतुःसूत्रीचा एकेक पैलू समोर येत जातो. ऊस ही पाणी पिऊन घेणारी पीकव्यवस्था. तिचा पुरस्कार केल्यानं शेतकऱ्याच्या हाती थोडी वरकड आली असली तरी, पाण्याच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत हे ते सांगत जातात. त्यांचा एकेक लेख या मांडणीचा विस्तारच असतो. कधी या लेखातून तर कधी त्या लेखातून एखाद्या मुद्याचा विस्तार होत जातो. आमची चर्चा नंतर वळते ती दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाकडे आणि तिथून बोलता-बोलता झोप आमच्यावर स्वार होते.

सकाळ. ८. १५.
आटपाडीच्या दिशेनं आमची गाडी निघते. ‘आंदोलन’ मासिकाच्या सुनीती सु. र., संपतराव आणि संजय संगवई अभ्यासवृत्तीधारक अभ्यासक दीपक पवार यांच्यासमवेत मी आहे. गाडीचे (सं)चालक सागर साळुंखे. आमची चर्चा पाणी, कालवा, धरण अशा चौकटीतच असते. ती ऐकून त्यांना त्यात रस निर्माण होतो. त्यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. मी ऐकण्याच्या भूमिकेत आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचंच उत्तर मिळावं अशा बेतानं चर्चा सुरू ठेवण्याकडंच माझा कल. हेतू शुद्ध आहे, इथल्या लोकांनाच किती माहिती आहे त्यांच्या प्रश्नांची आणि त्यावरील उत्तरांची, हे मला पहायचं आहे. ते बोलत जातात. तालुक्यात मोठा जलाशय झाला पाहिजे, पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी रोखलं पाहिजे वगैरै मुद्दे. त्याला एक डिसक्लेमर. “मी माझ्या अकलेनुसार हे बोलतोय. तुमच्या इतका माझा अभ्यास नाही. त्यामुळं यात चुकाही असतील.”

सकाळ. १०. ००.
आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये काही मंडळी जमली आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत, काही पत्रकार आहेत, काही राजकीय कार्यकर्ते आहेत. परिचय करून घेऊन चर्चा सुरू होते.
“मान्सून आमच्याइथं तसा येतच नाही. पहिला येतो तो आमच्यापासून पश्चिमेला थांबतो, नंतर येतो तो पूर्वेलाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबतो.” एका वाक्यात पावसाच्या स्थितीचं वर्णन होतं.
दर वर्षी जुलै ते सप्टेंबर हे महिने हे गाव पाण्याचा दुष्काळ अनुभवतं. वरच्या पट्ट्यात जोराचा पाऊस झाला की, पुराचं पाणी या गावाच्या वेशीला लागतंच; पण ते वाहून जातं. पुढं पुन्हा दुष्काळ.
“हा तालुका कायम दुष्काळी आहे कारण तो पर्जन्यछायेत येतो,” माझ्याशेजारी बसलेले पत्रकार मला सांगू लागतात.
मी त्यांना विचारतो, “त्यावर मार्ग काय?”
“बाहेरून पाणी आणून इथं ते पुरवणं.”
त्याविषयीच अधिक चर्चेची आमची अपेक्षा असते. बाहेरून म्हणजे कुठून, ते कसं आणायचं हे त्यातले कळीचे प्रश्न नाहीत. बाहेरूनच का आणायचं, स्थानिक स्रोतांतून पाण्याची उपलब्धता करता येणार नाही का, हा आमचा प्रश्न असतो. पण चर्चा आधी “बाहेरून पाणी” या मुद्याकडंच जातं. टेंभू पाणी योजना हा त्यावरचा सर्वश्रृत पर्याय. कऱ्हाड जवळ टेंभू गावापासून कृष्णेचं पाणी उचलायचं आणि ते आटपाडीमार्गे सांगोल्याला न्यायचं अशी ही योजना आहे. सुमारे शंभरावर किलोमीटर लांबीचा कालवा त्यासाठी करावा लागणार आहे. त्यापैकी काही भागांत कालवा खणून तयार आहेदेखील. एक बोगदाही आहे मध्ये. तोही तयार आहे. पाणी उचलण्याची यंत्रणा मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ती होण्याची शक्यता नजिकच्या भविष्यात तरी इथल्या मंडळींना दिसत नाही. चर्चा इथं येऊन थांबते आणि प्रश्न येतो, स्थानिक स्रोतांचं काय?
तालुक्यात असलेल्या प्रत्येक नदी-ओढ्यामध्ये गाळ भरला आहे. तो काढून टाकला पाहिजे. एक सूचना येते. एव्हाना या चर्चेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ पाटील सहभागी झालेले असतात. हातात सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, बोटांमध्ये अंगठ्या, खिशात मोबाईल. शुभ्र पांढरा वेष. शर्ट आणि पँट.
“गाळ काढण्याचं नियोजन सरकारी पातळीवर झालं आहे,” ते सांगू लागतात. त्यांच्या या मताशी समोर असलेल्यांपैकी काही जण सहमत नाहीत. त्या नियोजनाचे वाभाडे काढण्यास सुरवात होते तेव्हा रामभाऊ सूर बदलतात, “गाळ काढण्याची दुसरी बाजूही ध्यानी घेतली पाहिजे. तो गाळ टाकायचा कुठं?” माझ्याकडं पाहून त्यांचा हा प्रश्न असतो. माझ्या चेहऱ्यावर बहुदा छद्मी हास्य येतं. सरकारी नियोजनाचा पुरस्कार करणारा माणूस क्षणात त्यातील अडचणी सांगू लागलेला पाहूनच ते हास्य आलं असावं. रामभाऊ विषय पुन्हा टेंभूवर नेतात.
“टेंभूतून तरी तुमच्या तोंडी पाणी येणार आहे का?” माझ्या मनातील प्रश्न मनातच राहतो, कारण संपतराव बोलू लागतात. टेंभूला जलआयोगाची मान्यताच नाही हा त्यांचा बिनतोड मुद्दा असतो. रामभाऊ म्हणतात, “म्हणूनच एक पर्याची योजनाही सादर करण्यात आली आहे शासनाला. वरच्या भागातून पावसाच्या काळात वाहून जाणारं पाणी इथं आणून देण्याची.” त्याची टिप्पणी संपतरावांकडं असतेच. त्यामुळं त्या योजनेवर पुढं चर्चा होत नाही.
“आटपाडीत स्थानिक स्तरावरच पाण्याचं नियोजन होऊ शकतं की, नाही?” सुनीती यांचा प्रश्न.
उत्तर होकारार्थीच असतं. इतकंच नाही तर पाण्याच्या या प्रश्नावर आम्ही सारे एक आहोत, असंही सांगितलं जातं. पाणी मिळावं यासाठीची ही एकी आहे, ते कसं मिळावं याविषयी नाही हा या चर्चेचा निष्कर्ष मी मनातच नोंदवून ठेवतो.
निघतानाच मी आणखीही एक नोंद करतो. तिथल्या फलकावर सरपंच म्हणून एका महिलेचं नाव आहे. आमच्या या चर्चेवेळी एकही महिला तिथं उपस्थित नसते. अपवाद मी ज्यांच्यासमवेत आहे त्या सुनीती यांचा.

सकाळ. ११. ३०.
आटपाडीहून करगणीकडे आम्ही निघतो. मुख्य रस्त्यावरचंच हे गाव. पण आम्हाला मुख्य रस्त्यावरून जवळच्या एका वाडीवर जायचं असतं. तिथं डाळिंब उत्पादकांची एक कार्यशाळा सुरू आहे. त्याच ठिकाणी लोकांशी अधिक उपयुक्त चर्चा होऊ शकते यासाठी.
करगणीच्या बाजारपेठेतच अण्णा पत्की आम्हाला येऊन मिळतात. तेच पुढचा रस्ता दाखवणार आहेत. बहात्तर वर्षांचा हा वृद्ध गृहस्थ पूर्वी जिल्हा परिषदेचा सदस्य होता. स्वच्छ पांढरं धोतर, पांढचा अंगरखा. डोक्यावर विरळ झालेल्या श्वेत छटा, गांधी टोपीतून डोकावणाऱ्या.
अण्णा येण्याआधी गाडीत आमची चर्चा सुरू असतेच. या भागाच्या दुष्काळाचा इतिहास किती जुना आहे या अनुषंगानं. या चर्चेत अर्थातच पूर्वीची पाण्याची परिस्थिती, त्या अनुषंगानं असणारी पीकव्यवस्था असे मुद्दे असतात. संपतराव सांगत असतात त्यानुसार पूर्वी स्थिती वेगळी होतीच. पण ते हा विषयच अण्णांच्या दरबारात नेण्याचं सुचवतात.
अण्णांचा आणि माझा पूर्वपरिचय काहीही नाही. त्यामुळं मी अगदी बाळबोध पद्धतीनं प्रश्न विचारू लागतो.
“अण्णा, तुमचं वय किती?”
“बहात्तर वर्षं.” हे उत्तर सुखावणारं असतं. कारण किमान अडीच पिढ्यांची माहिती हा गृहस्थ देऊ शकेल हे निश्चित असतं.
“पूर्वी, म्हणजे तुमच्या लहानपणी, काय स्थिती होती इथं पाण्याची आणि पिकांची.”
इथं लहानपणी हा शब्दप्रयोग मी उगाचच केला आहे हे पुढं अण्णांच्या उत्तरातून सिद्ध होतं.
“विहिरी होत्या इथं. या गावात चाळीस-एक तरी नक्कीच. त्यावर बागायती व्हायची. देशी ऊस…” अण्णा पिकांची नावं सांगू लागतात, पण त्याची गरज नसते. देशी ऊस होईल इतकं विहिरींना पाणी असेल तर प्रश्नच निकालात निघत होता.
“पुढं काय झालं?”
मग सुरू होते ती दुष्काळ कसा-कसा येत गेला त्याची कहाणी. सुरवातीला दहा-पंधरा फुटांवर असणारं विहिरीचं पाणी आधी ऑईल इंजीन आणि मग वीजेचे पंप आल्यावर कसं खोल गेलं, पाहता-पाहता विहिरी कशा खोलवर न्याव्या लागल्या, त्याच काळात झाडोऱ्याची तोडणी कशी वाढत गेली आणि पुढे पाऊसमान कसं कमी होत गेलं याची ही कहाणी असते. अण्णा त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार सांगतील अशी माझी अपेक्षा असते. पण ते थेट सालांनुसार सारं सांगत जातात आणि माझा त्यांच्याविषयीचा भ्रम दूर होतो. या माणसाचा अभ्यास आहे, हे पटतं आणि मी मनोमनच खजील होतो.

दुपार. १२. ००.
करगणीच्या पुढं ज्या वस्तीवर आम्ही गेलो तिला वस्ती का म्हणायचं? साधारण फर्लांगभराची त्रिज्या घेतली तर एकही घर नाहीये. या एकाकी घराच्या पटांगणात पंचवीसेक मंडळी बसली आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाच्या वतीने मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा आहे. सरकारचे दोनेक कर्मचारीही आहेत. या दुष्काळी भागात डाळिंबाच्या बागा आता मोठ्या प्रमाणात फुलताहेत. गेल्या चार वर्षांतील ही घडामोड. पहिल्या दोन वर्षांत डाळिंबाचा भाव पडला आणि इथल्या डाळिंब उत्पादकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं (किती सहजगत्या हे मी लिहून जातोय. या भागात तोंडचं पळण्यासाठीही पाणी नसतं हे माझ्या गावीही नाही). पण गेल्या आणि यंदाच्या वर्षी त्यांना थोडा दिलासा मिळालेला दिसतोय असा आमचा पहिला पाठ.
आधी होतो तो स्वागताचा कार्यक्रम. मला फेटा बांधला जातो. माझी ओळख करून देताना संपतराव म्हणतात, “तो श्रावण तसा येत नाही, हा आलाय.” आधीच फेट्यामुळं मी नतमस्तक झालेला असतो. त्यात ही तुलना. कसंबसं हसून प्रतिसाद देतानाही मला माझ्या खुजेपणाची परत जाणीव होते. निसर्गतःच असलेला ‘श्रावण’ इथं काही करू शकत नाही यातून आलेली जाणीव.
डाळिंबाचं पीक इथं कसं घेतलं जात असावं?
“लहानपणी सांगलीला गेलो होतो. तिथं सापांच्या सान्निध्यात… तास असे बोर्ड पाहिले. ते पाहण्यास गेलो. सापांच्या सान्निध्यात खरंच एक माणूस बसला होता. सगळीकडं साप. कोणत्या सापाचं तोंड कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं हेच कळत नव्हतं. इथं तेच आहे. पाण्यासाठीच्या पाईपलाईन. कुठून कुठं गेल्या असतील सांगता येत नाही. आपण समोर पाहतोय ती डाळिंबाची बाग साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईननं पाणी आणून उभी केली आहे.” वकील खिलारे सांगतात.
अगदी चपखल वर्णन असावं हे. कारण पाईपलाईन हा विषय आमच्यासमोर एका सरकारी अहवालातून आलेला असतोच.
“इथला दुष्काळ…” फारसं बोलावं लागतच नाही.
खिलारेच पावसाचं वर्णन करतात जे याआधी आटपाडीत आम्ही ऐकलेलं होतंच. फरक इतकाच की खिलारे नेमकेपणाने मॉन्सून आणि रिटर्न मॉन्सून या शब्दांचा प्रयोग करतात. किंवा नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून अशा शब्दांमध्ये.
“काय केलं जातंय नेमकं?”
“शेततळी हा एक पर्याय आहे. पण सरकारची त्याला पुरेशी साथ नाही. नद्या आणि ओढ्यांवर बंधारे झाले आहेत, पण ते गाळानं भरले आहेत. गाळ असल्यानं पुढं पाणीच नाही. त्या प्रवाहात पाणी नाही म्हणून मग विहिरी, इतर पाणवठेही कोरडे पडले आहेत…” अण्णा सांगत असतात.
कोणीतरी त्यांना रोखतो, “टेंभूचं बोला.”
त्याचा तो आक्रमक सूर पाहून पाणी कसं पेटू शकतं याची कल्पना यावी. अण्णा थोडे डिफेन्सीव्ह होतात. “तेही आहेच. ”
“तुम्हाला टेंभू योजनेचं कसं समजलं? योजनेची आखणी होत असताना तुमच्याशी तज्ज्ञांनी चर्चा वगैरे केली होती का?” मी विचारतो.
“नाही. इथं एक मेळावा झाला, त्यात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. स्थानिक आमदारांनी आयोजित केलेला मेळावा होता तो.”
मग स्थानिक राजकारणाचा एक पाठ होतो. या दुष्काळी भागांतील काही तालुक्यांचे अपक्ष आमदार. त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची अट टाकलेली असते. त्यातून या टेंभूची योजना तयार झाली. एक तप झालं त्याला. रयतेचा ताप मात्र तसाच आहे.
“काय करावं लागेल?”
“तुम्हीच सांगा काही तरी. आम्ही एक आहोत.” अण्णा बोलतात. पुन्हा एकवार आमची चर्चा थांबते.

संध्याकाळ. ५. ००.
परतीच्या प्रवासात काही गावांमध्ये नवेकोरे, पक्क्या बांधकामाचे, सुंदर रंगसंगती असणारे बंगले आमचे लक्ष वेधून घेतात. स्वाभाविक प्रश्न येतोच. दुष्काळी भागात हे कसं?
त्या बंगल्यांची कहाणी वेगळीच आहे. या भागातील किमान पन्नास हजार मंडळी अशी आहेत की ज्यांनी देशाटन केलं आहे. म्हणजेच ती मंडळी इतर राज्यांत गेली आहेत. तिथं ती सोनं गाळण्याचं अगदी खास काम करतात. त्यातून आलेल्या ‘समृद्धी’ची ही फळं आहेत. संपतराव त्या मंडळींचं वर्णन करतात, “ही मंडळी सोन्याची माती करतात आणि मातीचं सोनं.” मला आधी हे अलंकारीक बोलणं वाटलं होतं. पण वास्तवात तसं नाहीये. हे कारागीर सोन्याची खरंच राख करतात आणि त्यातून पुन्हा सोनं मिळवतात. रासायनिक प्रक्रियेच्या आधारे.
असाच आणखी एक वर्ग इथं आहे. हे आहेत मुंबईच्या गोदीतील कामगार. या भागातील प्रत्येक खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास भले एस. टी. नसेल, पण मुंबईसाठी हमखास आहे. तेच पुण्याबाबत. तिथले अनेक बांधकाम मजूर या भागातलेच.
दुष्काळ आणि सुकाळ यांच्यातील सीमेवरचे हे दोन वर्ग. पहिल्या वर्गाचं वास्तव्य सीमेच्या त्या बाजूलाच अधिक. दुसऱ्या वर्गाचं वास्तव्य या बाजूलाच अधिक. हाच वर्ग संख्येनं मोठा.

संध्याकाळ. ६. ००.
परतीच्या प्रवासात आम्हाला किमान सहा ठिकाणी टेंभू योजनेचा कालवा आडवा आला. खोलवर गेलेला. काही ठिकाणी पंधरा मीटरपर्यंतची खोली. काही ठिकाणी त्यापेक्षा कमी. काही भागांत पाणी साचलेलं आहे तर काही ठिकाणी तळाचा खडक दिसतोय. या तालुक्याच्या जमिनीवर ही कालव्याची रांग तर जमिनीखाली पाईपलाईनची. दोन्ही कोरडेच. वरून दुष्काळ.
या योजनेच्या विहिरीपाशी आम्ही पोचलो. तिथं थोडं पाणी दिसत होतं. बांधकामदेखील वरपर्यंत चढलेलं पण अपुरंच. त्यामुळं कोरडा कालवा आणि कोरड्या पाईपलाईन पाहत आशेची किरणं धुंडाळत बसणारे गावकरी.
काळाच्या अव्याहत प्रवासातला हा दुष्काळाचा एक टप्पा. त्याच्यासाठी छोटासा. तुम्हा-आम्हासाठी पिढ्या-न-पिढ्यांचा.

दुपारची एक आठवण. वैयक्तिक.
करगणीच्या त्या वस्तीवर माझा परिचय नावासह करून दिलेला असतो. जेवण संपल्यावर अण्णा मला त्या घराच्या मागील बाजूला बोलावतात. पूर्वेला दूरवर डोंगरांची रांग असते. त्या दिशेनं बोट करतात.
“हा आडवा डोंगर म्हणजे कावडीची दांडी. त्या दोन टेकड्या म्हणजे कावडीची पात्रं. ही श्रावणाची कावड.”
त्या डोंगराच्या अलीकडं. कावडतळं आहे. तिथंच आपल्या आईवडिलांसाठी पाणी भरण्यासाठी श्रावण गेला होता. तिथंच दशरथाचा बाण लागून त्यानं प्राण सोडला, अण्णा सांगतात.
आता माझ्याकडं शब्द नसतात.
त्या काळी घागर बुडताना “बुडबुड” आवाज येण्याइतकं तरी पाणी इथं असावं…