मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायर्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र.
बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३…! काही क्षणांत ती खाली आली आणि दार उघडलं गेलं. नेहमीप्रमाणं गच्च भरलेली होती. बाहेर उभ्या असलेल्या आम्हा मंडळींच्या आपसूकच दोन रांगा झाल्या आणि बाहेर येणारा एकेक जण पुढे सरकू लागला. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर एक दिमाखदार युवक पुढे झाला आणि क्षणार्धात त्यानं समोरच्या रांगेत दादाला मिठी मारली.
“दादा, किती दिवसांनी?”
दादा थोडा चपापलेला दिसला, पण त्याला ओळख पटली. “राजे? इथं कुठं?”
आम्ही रांगांतून बाहेर आलो. तिथंच थांबलो. कारण ही ‘कृष्ण-सुदामा भेट’ दिसत होती.
“आत्ताच येतोस असं दिसतंय. चलो, चाय मारेंगे,” इति तो देखणा युवक, म्हणजे राजे. दमदार आवाज. खर्जातला वाटावा असा. जबर जरबेचा. कारण दादाही चालू लागला होता.
मी केव्हापासून या क्षणाची वाट पहात होतो. एक तर आमदार निवासापाशी आपण आहोत, बाहेर आलं टाकून होत असलेल्या चहाचा दरवळ आहे, तो दरवळ पुरे नाही म्हणून की काय, पण ती चहा ढवळण्याची डाव पातेल्यावर आपटून साद घातली जात आहे आणि इथं आधी रुम, मग फ्रेश होऊन चहा अशा “आरोग्यं धनसंपदा…” मार्गावर आम्ही होतो. सुटका झाली होती. मी लगेचच दरवाजाच्या दिशेनं पाऊल टाकलं.
ओळखी झाल्या. चहाचे दोन राऊंड झाले. सिगरेट झाली. आणि राजेंच्या पुढाकारानं आम्ही पुन्हा आमदार निवासात गेलो. आम्ही खोली गाठली, राजे त्यांच्या दिशेनं निघून गेले. पण जाण्याआधी एक सांगून,
“संध्याकाळी साडेसातला खाली भेटूया. जेवायला जाऊ.”
दादा काही तरी बोलणार होता तेवढ्यात त्यांनी, “सबबी सांगू नकोस. जाऊ जेवायला” असं आपल्या, बहुदा खास ठेवणीतल्या आवाजात सांगून टाकलं. दादा गप्प झाला.
संध्याकाळचा कार्यक्रम ठरला गेला. मुंबईच्या अशा दौर्यात बहुतेक पहिल्याच संध्याकाळी मी ‘चर्चगेट स्टोअर’मध्ये बसून बिअर पिणं पसंत करायचो. तिथं पिचरमधून बिअर मिळते. त्यामुळं ती आवड. त्या दिवशी संध्याकाळीच तिथं जायचं ठरवलं होतं, ते आता कोलमडलं होतं. स्वतःवर चरफडण्याखेरीज हाती काही नव्हतं. हे कोण राजे हे कुतूहल त्या चरफडण्यातूनच जागं झालं. कारण त्यांच्या त्या जरबयुक्त आवाजावर दादानं मान तुकवली होती हे थोडं नवलाचंच होतं. असो. आम्ही दिनक्रमाला लागलो.
—
राजे. उंची सहा फुटांवर एखाद-दोन इंच. खानदानी देशमुखीला शोभेल असा गौरवर्ण. स्वच्छ चेहरा. तुळतुळीत दाढी केलेली. अगदी रोज. झुबकेदार मिशा. डोक्यावर लष्करातल्या निवृत्त वारिकानं हात फिरवलेला असावा. अगदी बारीक कापलेले केस. प्रमाणबद्ध. तजेलदार डोळे, अर्थात राजे नॉर्मल असतील त्याच दिवशी. म्हणजे दिवसाउजेडी पाहिले तर ते नॉर्मल असतील तेव्हा त्यातील तजेला कळायचा. एरवी तो संध्याकाळी चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या प्रकाशात पाहण्याची संधी मिळाली तरच.
जशी उंची तगडी तशीच शरीरयष्टीदेखील. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा या गृहस्थाचं वय होतं सत्तावीस-अठ्ठावीसच्या घरात. पहिल्यांदा पाहिलं की कोणालाही वाटावं हा गृहस्थ एक तर लष्करात कॅप्टन वगैरे असावा किंवा आयपीएस किंवा गेलाबाजार आयएएस. राजेंची ‘कामं’ पाहिली तर त्यांची उडी त्यापेक्षा कित्येक पट लांब होती हे नक्की. अर्थात, त्याविषयी थोडं पुढं.
एकूण राजेंचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार, पहिल्या दृष्टीभेटीतच प्रेमात पाडणारं.
—
दिवसभरात मंत्रालयातील दादाची कामं उरकता-उरकता मध्ये जो वेळ मिळाला त्यात राजे समजत गेले. कारण एकच. संध्याकाळी आपण ज्याला भेटणार आहोत, तो गृहस्थ आहे कसा हे कुतूहल. त्यामुळं मधल्या वेळेत चर्चा फक्त राजेंभोवतीच केंद्रित झालेली होती. मध्ये एकदा तिसर्या मजल्यावर त्यांचं ओझरतं दर्शनही झालं. शिक्षणमंत्र्यांसमवेत. शिक्षणमंत्री त्यांच्या दालनातून बाहेर आले, पाठोपाठ, जणू किंचीत शेजारीच असल्यासारखे राजे. मग मंत्र्यांचे स्वीय सचिव आणि इतर मंडळी. आम्ही पंधरा-एक पावलांवर होतो. बाहेर येताच दारात थांबून त्यांच्यात काही बोलणं झालं. स्वीय सचिव वाकला होता. मंत्री त्यांच्या त्या वेषात गबाळे म्हणूनच उठून दिसत होते. या सगळ्या घोळक्यात राजे ताठ उभे होते. मंत्र्यांना काही सांगत होते. आम्ही दोन-चार पावलं पुढं टाकली होती. आणि तेवढ्यात राजेंच्या तोंडून वाक्य आलं,
“सर, यू जस्ट एन्शुअर दॅट द स्कूल गेट्स रिकग्नीशन. अ क्वेश्चन ऑफ मोअर दॅन फायूहंड्रेड स्टुडंट्स फ्रॉम रुरल एरिया. ऑल आय वॉंट इज दॅट द इन्स्टिट्यूट इज नॉट आस्क्ड टू फाईल अॅन अॅफिडेव्हिट दॅट इट इज एंगेज्ड इन इल्लिगल अॅक्टिव्हिटी.”
मी उडालोच. शिक्षणमंत्री दिसायला गबाळे होते, पण इंग्रजी अस्खलीत बोलायचे, समजायचं आणि लिहायचेही, शिवाय त्यांचं वाचन दांडगं आहे हेही बर्याच जणांना ठाऊक होतं. पण राजे? एव्हाना दादाकडून ऐकलं होतं ते थोडं वेगळंच होतं. मराठवाड्यातून शाळा, औरंगाबादेत महाविद्यालयीन शिक्षण. दादाची आणि त्यांची ओळख महाविद्यालयीन काळातील. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून एका शिबिरात झालेली. राजे म्हणजे त्यावेळचे हिरो. अभिनय, एकपात्री यात हात धरणारा कोणी नाही वगैरे…! पुढे तारू भरकटलं आणि ते बेपत्ता झाले. मग कानी आलेल्या खबरा म्हणजे कुठे गर्द वगैरेचं व्यसन असल्याचं. त्यानंतर मंत्रालयातील कामांची ‘गुरूकिल्ली’ ही त्यांची ओळख. थोडक्यात या चौकटीतच (खरे तर ही आपलीच चौकट असते, तीही चुकीची) स्वच्छ इंग्रजीत संवाद कुठंही बसत नव्हता. वाया गेलेला माणूस हे तीन शब्द त्या वर्णनाला पुरेसे ठरावेत. दादाच्या म्हणण्यानुसार त्यानंतरची भेट ही सकाळचीच आणि आत्ता हे त्यांचं असं दर्शन.
राजेंचं अस्खलीत, कुठंही न अडकता असं ते इंग्रजी वाक्य ऐकून मी दादाकडं पाहिलं आणि त्यानंही भुवया उडवत माझ्याकडं पाहिलं.
एव्हाना मंत्र्यांनी होकार दिला होता राजेंच्या मागणीवर, आणि वरून “आमच्याकडंही लक्ष ठेवा” अशी पुस्ती जोडली होती. त्यावर चक्क हात जोडत “च्यायला राव, इथं भेटलात हेच पुरं. तिकडं नको!” हा त्याचा टोला मी पहिल्यांदा ऐकला आणि मला वाटलं आता काही तरी गडबड होणार. पण कसचं काय, शिक्षणमंत्री “असं थोडंच सोडेन तुला,” असं म्हणत पुढं निघालेदेखील.
राजे आणि मंत्र्यांच्या वयातलं अंतर किमान तीस वर्षांचं होतं. मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले तर राजे मराठवाडा. म्हटलं तर राजकीय दृष्ट्या मंत्र्यांनी त्याला पाण्यात पाहिलं असतं, तर आश्चर्य वाटलं नसतं. पण इथं ही मैत्री? मला धक्के बसत होते. मंत्री निघून गेले आणि राजे पुन्हा त्यांच्या दालनात शिरले. आम्ही आमच्या कामाला निघून गेलो.
तर मराठवाड्यातून आलेला हा उमदा – किमान दिसणारा तरी – तरूण आता मंत्रालय परिसरात अनेकांचा अनेक कामांसाठी ‘गुरूकिल्ली’ झाला होता हे अखेर एकदाचं डोक्यात शिरलं त्या प्रसंगातून आणि अंगभूत कुतुहलातून – किंवा भोचकपणातून म्हणा – मी संध्याकाळच्या भेटीकडं नजर लावून बसलो. सकाळी ही भेट ठरताना झालेली चिडचिड आता पळून गेली होती.
—
संध्याकाळी साडेसात. आमदार निवासाच्या गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळलो. राजे समोरच उभे होते. बरोबर कोणी दोघं – तिघं होते. त्यांच्याशी काही वाटाघाटी सुरू असाव्यात. अगदी हळू आवाजात कुजबुज. आम्ही दोनेक पावलं अलीकडंच होतो, त्यामुळं तिथंच थांबलो. काही क्षणांतच त्यांचं आमच्याकडं लक्ष गेलं आणि “अरे यार, या की इकडं,” अशी साद आली. खणखणीत आवाजात. मला वाटतं, रस्त्यावरच्या इकडच्या-तिकडच्या आठ-दहा जणांनी तरी वळून आपल्याला कोण बोलावत नाही ना हे पाहून घेतलं असावं नक्की.
बरोबर असलेल्या मंडळींना निरोप देऊन आम्हाला सोबत घेऊन राजे निघाले. ‘सम्राट’च्या अलीकडं आम्ही रेंगाळलो.
“क्या ख्वाईश है?” राजे.
दादाच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह.
“क्या पिना है?”
दादानं खांदे उडवले आणि मग डावा हात डावीकडे तर उजवा उजवीकडे नेला. अर्थ एकच, काहीही चालेल, फक्त देशी वगैरे नको.
“चलो, मूड है बिअर पिनेका. चर्चगेट स्टोअरमध्ये बसू,”
हा बोनस होता. एकतर हे कॅरॅक्टर समजून घ्यायचं होतं. त्यामुळे व्हिस्की वगैरे पिण्याची इच्छा नव्हती. बिअरच बरी अशा वेळेस. आणि तीच होती.
चर्चगेट स्टोअरमध्ये पोचलो. पाच जणांनी बसावं असं टेबल नव्हतंच. पण, राजे पुढं झाले आणि समोरच्या मागच्या रांगेतली दोन टेबलं जोडली गेली. एकूण त्यांचा तेथे बर्यापैकी राबता दिसत होता.
ऑर्डर गेली आणि राजेंचा पहिला प्रश्न आला, “बोल, इथं कसा काय?” दादाला उद्देशूनच.
दादानं कामाची माहिती दिली. राजेंची ‘गुरूकिल्ली’ची भूमिका ठाऊक असल्यानं ती माहिती देताना थोडं हातचं राखून ठेवलं होतं.
काम साधंच होतं. दादाच्या गटात (म्हणजे जिल्हा परिषदेचा मतदार संघ) एक नालाबंडिंगचं काम होतं. त्यावर मंत्रालयातून काही आक्षेप आला होता. त्यामागची कारणं आम्हाला पक्की ठाऊक होती. हा राजकीय ‘आडवा आणि जिरवा’ प्रयत्न होता आणि त्यावरचे तोडगेदेखील दादाला ठाऊक होते. त्यानुसार एक निवेदन त्या दिवशी त्यानं दिलं होतं.
“काय म्हणाला रोकडे?” राजेंचा पुढचा प्रश्न. दादा अवाक्. चेहरा प्रश्नार्थक. रोकडे पाटबंधारे खात्याचा उपसचिव. त्याच्याकडेच दादाचं काम होतं आणि हा तपशील राजेंना ठाऊक असावा हे आश्चर्य होतं.
“वो बात छोड. लिसन, आय नो एव्हरीथिंग अबाऊट यू. आय कॅन टेल यू द नेम ऑफ युवर गट, द व्होटिंग पॅटर्न, अँड इफ यू बी ट्रुथफुल, द अमाऊंट यू स्पेंट इन द लास्ट इलेक्शन, इन्क्लुड़िंग द ‘अदर’ एक्स्पेन्सेस.” अदर शब्दावर जोर.
दादाला पुन्हा एक धक्का. म्हणजे हा माणूस कुंडली ठेवून असतो तर, माझा मनातल्या मनात निष्कर्ष. तो ‘गुरूकिल्ली’ का असतो हे समजून येणं आता मुश्कील नव्हतं.
एकाचवेळी हिंदी, मराठी, इंग्रजी… हे प्रकरण थोडं और होतं. तिन्ही भाषांवर आपली मांड आहे हे दाखवण्याचा त्याचा हेतू नाही हे बोलण्याच्या सहजतेतून दिसून यायचं. अनेकदा तर तो एक वाक्य एका भाषेत आणि एका भावातदेखील पूर्ण करायचा नाही.
एव्हाना दादानं शरणागती पत्करत सारं काही सांगून टाकलं, त्या एकाच कामापुरतं अर्थातच.
“उद्या तुझं काम होऊन जाईल. निवांत जा परत.”
दादा सावध होता, “काय करणार आहेस?”
“काही नाही. रोकडे दोस्त आहे आपला. त्याला विनंती करतो. तो माझी विनंती अव्हेरणार नाही याची खात्री आहे मला.” विनंती, अव्हेरणे वगैरे शब्द अगदी शुद्ध तुपातले.
“रोकडेच्या हाती काही नाही. घोडं अडलंय वर. मोहित्यांकडं. त्यामुळं…” इति दादा. मोहिते म्हणजे पाटबंघारे मंत्री.
“डोण्च्यू वरी. काम होईल. मोहिते असो वा सीएम. तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, पॉलिटिकली. मग तर झालं?”
“तुझा इतका काय रस रे साल्या?” दादाचा सवाल.
“बिकॉज आय नो यू सिन्स नाशीक कॅम्प. पीपल लाईक यू शुड बी हिअर. दॅट्स ऑल.”
“विथ पिपल लाईक यू?” दादाच्या तोंडून प्रश्न निघून गेला आणि क्षणात राजेंचा चेहरा दुखावल्यासारखा झाला.
“अ फिक्सर, यू वॉण्ट टू से…” सूरही दुखावलेलाच.
“अं…अं…” दादा.
“छोड दे वो बात. तुझं काम होईल. तुझ्या कोणत्याही तत्वांना मुरड घालावी न लागता.”
बिअरसोबत मागवलेली चिकन चिली आली होती. पहिला संपून दुसरा पिचर आला होता. राजेंनी मोर्चा माझ्याकडं वळवला.
“बोला सरकार. तुम्ही बोला. याच्याकडं फारसं लक्ष देऊ नका. तेव्हापासून पाहतो मी याला, माणसं ओळखण्यात थोडा कमी पडतोच.”
ओह. ठाम शब्दांत राजेंनी निष्कर्ष मांडला. या निष्कर्षाप्रत येण्यास मला स्वतःला दादाच्या सहवासात तीनेक वर्षं काढावी लागली होती. या दोघांची भेट अवघी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच, त्यातही मध्ये मोठा खंड आणि तरीही हा पक्का निष्कर्ष, तोही अचूक!
मी संभावित पवित्रा घेतला, “मी फारसं बोलत नाही. ऐकणं हा माझा छंद आहे.”
“मला राजेच म्हणा. आवडतं ते. असो. तुम्ही ऐकतदेखील नाही. कुंडल्या मांडत बसता. तुमचा धंदा तोच नाही तरी…”
पहिलीच भेट होती, बीअर असली तरी इतक्यात इतकी मोकळीक यावी असं नव्हतं, पण हा गृहस्थ ऐकायला तयारच नसतो, हे माझ्या ध्यानी आलं.
“समजतंय ना ते तुम्हाला. मग बोला तुम्ही. मी ऐकतो.”
बहुदा माझा सूर थोडा चढा लागला असावा. दादा मध्ये आला,
“तुला मघाचं माझं बोलणं लागलेलं दिसतंय. पण त्यात शंकास्पद सूर असण्याचं कारण आहे…”
“मी अमूक ऐकलं आहे वगैरे?” राजे तयारीतच असायचे. दादानं मान डोलावली.
“मग ठीक आहे ना, स्टिक टू व्हॉट यू हॅव हर्ड…”
“दॅट आयम डुईंग. आय वॉण्ट टू नो व्हॉट आय शुड नॉट डू. फ्रॉम द हॉर्सेस माऊथ.” किती नाही म्हटलं तरी दादा त्याच्यापेक्षा वयानं मोठा होताच.
“हाऊ डझ दॅट मॅटर? त्याची काहीही गरज नाही,” इति राजे.
“तुम्ही याच्यावर अन्याय करताय. ऐकीव माहितीवरून तुमच्याविषयी काही बोललं तर तुम्ही दुखावले जाणार आणि समजून घेण्यासाठी विचारलं काही, तर गरज नाही असं म्हणणार,” मी तोंड उघडलं.
“सरकार, बास्स! हे असं काही तरी का होईना बोला की. एरवी तुम्हाला सांगतो, दादानं हे ताणलं नसतं. मी गरज नाही म्हटल्यावर तो गप्प झाला असता. बिअर संपली असती, आम्ही उठलो असतो. पुन्हा भेट झाली तर झाली…”
पुन्हा एकदा अचूक विश्लेषण. दादा राजकारणात पडलाच कशाला असला स्वभाव घेऊन हे माझ्यापुढचं कायमचंच कोडं होतं. तेच कोडं इथं राजेंना सुटल्यासारखं दिसत होतं. जाताजाता त्यांनी मला ‘सरकार’ करून टाकलेलं दिसत होतं. मी पत्रकार असल्यामुळं असावं. मला ते सूक्ष्मपणे खटकलं. पण मी लगेच काही बोललो नाही. माणूस खुला झाला तर ते आधी हवं होतं मला. त्यात पुन्हा “तुम्ही केलेलं लेखनही मी वाचलं आहे,” अशी पुस्ती त्यांनी जोडली होती हे उगाच सुखावून जाणारंही होतं.
राजेंचा ग्लास संपला होता. मी तो भरून दिला. उरलेली थोडी बिअर माझ्या ग्लासात ओतून घेतली आणि वेटरला खूण केली.
काही क्षण तशाच शांततेत गेले. राजेंनी सिगरेट मागवल्या. त्या येताच एक शिलगावली आणि समोर पहात सुरवात केली.
—
राजेंची कहाणी सुरू झाली.
“शिबिरानंतरचं वर्ष व्यवस्थित, काही कारणानं स्टेज सुटलं, गर्द, नंतर इंजेक्शन्स, मुंबई, अंडरवर्ल्ड, कट्टा किंवा घोडा, रावसाहेबांशी संबंध, व्यसनांतून बाहेर, रावसाहेबांमुळंच मंत्रालय हे ‘करियर’…” राजे.
फक्त स्वल्पविराम असलेलं हे तुटक शब्दांचं वाक्य. आधीच्या प्रत्येक स्वल्पविरामामध्ये खंत, खिन्नता, अपराधीपणा आणि शेवटच्या करियरवर एक छद्मी हास्य. वाक्य बोलून झाल्यानंतर एक दमदार झुरका.
“एव्हरिथिंग इज कव्हर्ड इन धिस सेण्टेन्स. नथिंग मोअर, नो लेस. वोण्ट जस्टिफाय एनिथिंग, वोण्ट फिलोसोफाईज एनीथिंग. आय यूज्ड द वर्ड करियर व्हेरी केअरफुली. मला ठाऊक आहे तुझं आयुष्य कसं घडत गेलं आहे ते. समोर सरकार आहेत. त्यामुळं जबाबदारीनंच शब्द वापरला आहे. त्याचंही मी समर्थन करीत नाही. मी उगाच व्यवस्थेचा बळी वगैरे म्हणणार नाही स्वतःला. मी त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच.”
ओह. हा माणूस ‘ना-ना करते’ शैलीत एखाद्या गोष्टीचं समर्थन देऊ शकतो, तत्त्वज्ञानही करू शकतो, हे या वाक्यांतून सहजी लक्षात येत होतं. तो बारकावा माझ्या ध्यानी आला. तोच धागा पुढं त्याला पेटतं ठेवायला उपयुक्त आहे असं मानून मी म्हणालो, “धिस इटसेल्फ इज अ ह्यूज जस्टिफिकेशन…”
“हाहाहाहाहा…. सरकार, शब्दांत पकडू पाहता, पण मी सापडणार नाही. तुमचे हे उद्योग त्या तिथं वरच्या मजल्यांवर बसतात त्यांच्याकडं,” मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांकडं बोट करत, माझंच माप काढत राजे म्हणाले, “कारण, मी करतोय ते चुकीचं आहे, न-नैतीक आहे आणि म्हणूनच मी त्या व्यवस्थेचा एक भाग आहे हे स्पष्टपणे सांगून टाकतोय. त्याबद्दल मला कोणी काही सजा दिली तर माझी त्याला खुश्शाल तयारी आहे. आणि एरवीही मी ती भोगतोच आहे. हे “विथ पीपल लाईक यू…” हा त्या सजेचाच एक भाग असतो सरकार. रूढ अर्थानं जिला सजा म्हणता येईल ती केवळ व्यवस्थाच देऊ शकते आणि मी त्या व्यवस्थेचाच भाग असल्याने ती सजा मला मिळत नाही इतकं सरळ आहे हे. त्या व्यवस्थेच्या बाहेर राहून संघर्ष करण्यात मला अर्थ वाटला नाही आणि म्हणून मी तिच्यात शिरकाव केला.”
हे जरा उफराटं होतं. टिपिकल राजकारण्यांसारखं. गुन्हा सिद्ध करा, मी सजा घेतो हाच पवित्रा. स्टेज सुटलं म्हणण्याइतकं काही करू पाहणारा हा माणूस असा का विचार करतोय हा प्रश्न टोचून गेला.
“म्हणजे?” संभाषणाची सूत्रं माझ्याकडं आली होती.
“म्हणजे काही नाही. मी फिक्सर आहे. मी इथं कामं करून देतो. भरती, परवाने, मंजुरी, अडलेले कागद सोडवणं, काही कागद अडवणं, काही कामांसाठी सल्लामसलत आणि मार्गदर्शन.” सल्लामसलत आणि मार्गदर्शन या शब्दांना दोन्ही हातांच्या अंगुलीनंच अवतरणांची खूण करत राजे म्हणाले.
“किंमत किती?”
“कामाच्या मूल्यावर अवलंबून. रेट मी ठरवत नाही. तो ठरलेला असतो. मी त्यात तडजोड घडवून देतो. कधी हजारांत, कधी लाखात. माझे मला पैसे मिळतात. संबंधितांचे त्यांचे त्यांना पोचतात.”
“संबंधित म्हणजे कोणकोण?” माझा प्रश्न.
“सरकार, कायमच आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहाता असं दिसतं,” मला पुन्हा एक फटका मारत राजे पुढं म्हणाले, “तिथं त्या मजल्यांवर बसणाऱे, काही अपवाद सोडता सारेच.” इशारा मंत्रालयाकडं.
या उत्तरातून माझ्या ज्ञानात फारशी भर पडली नव्हतीच. कारण ते तर जगाला ठाऊक होतं. पण आता या संवादात मला अधिक रस निर्माण झाला होता. कदाचित तिसर्या पिचरचा परिणाम असावा तो.
“इंग्रजी संवादकला वगैरे…”
“सरकार, मी अभिनेता आहे. त्यासाठी बरीच कौशल्यं आवश्यक असतात. त्यातलं ते एक.”
“मधल्या सगळ्या वाटचालीत ते कुठं जमवलं?”
“विशेष काही नाही. गोव्यात पोचलो होतो. भटक्यांमध्ये होतो काही काळ. तिथं त्यांच्याशी बोलत-बोलत भीड चेपून गेली आपल्या गावरानपणाची. मग त्यांच्याच जोडीने वाचनही सुरू झालं. झपाटल्यासारखं. वेगवेगळे विषय…” यावरून कोणालाही थोडक्यात कल्पना यावी.
“रावसाहेब कोण?”
“ओळखत नाही?” राजेंचा थोडा चकीत भाव, “रावसाहेब इज रावसाहेब. राज्यात त्यांचे किमान हजारेक तरी पीएसआय असतील. पीआयही तितकेच. शेकड्यांत मोजता येतील असे एसीपी किंवा डीवायएसपी. कित्येक डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार…” यादी लांबत होती. माझ्यासाठी ही नवी माहिती होती. पण नेमकं कळत नव्हतं.
“इंटरेस्टिंग…” मी.
“अँड फ्रस्ट्रेटिंग टू.” राजे.
मला त्या फ्रस्ट्रेशनमध्ये रस नव्हता. लोकांनी स्वतःच्या पायावर धोंडे मारून घ्यायचे आणि मग दुखतंय म्हणून रडत बसायचं, आणि त्यासाठी माझा खांदा देण्याची माझी तयारी नव्हती.
“दुपारचं काम काय होतं शिक्षणमंत्र्यांकडं? साधारण स्वरूप?”
“काही नाही. बीडच्या एका कोपर्यात भटक्या-विमुक्तांसाठी एक संघटना काम करते. ती शाळा चालवते. शाळेला अर्थातच मान्यता नाही. दरवर्षी परीक्षा आल्या की, त्यांच्याकडं अॅफिडेव्हिट मागतं शिक्षण खातं. आम्ही अनधिकृत शाळा चालवून चूक केली आहे, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, असं अॅफिडेव्हिट. म्हणजे गुन्ह्याची कबुली. गेली पाच वर्षे संस्था ते देत आली आहे. यंदा पुन्हा तोच प्रश्न समोर आहे.”
“पाच वर्षे अॅफिडेव्हिट घेतलं आहे, यंदा कशी काय सूट मिळेल?”
“मिळणार नाही हे मलाही ठाऊक आहे. मला दार किलकिलं करायचं आहे. त्यामुळे सावंतांना थोडं मनूव्हर केलं. त्यांची दोन कामं आहेत माझ्याकडं. त्याबदल्यात त्यांच्याकडं ही मागणी देऊन ठेवली…”
“त्यातून काय होईल?”
“काही नाही. माझी किंमत मी वसूल करेन त्यांच्याकडून. पुढच्या वर्षासाठी त्या संस्थेच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून देईन मी. शाळा अधिकृत होईल. सावंतांच्या आत्ता लक्षात आलंय की, असं अॅफिडेव्हिट मागून दरवर्षी एखाद्या संस्थेकडून गुन्ह्याची कबुली घेणं म्हणजे काय असतं ते. मी नीट समजावून दिलं.” समजावून या शब्दावर पुन्हा अवतरणाची खूण दोन्ही हाताच्या अंगुलीनं.
माझ्यातला पत्रकार शांत बसत नव्हता. “तुमचा फायदा काय? की ती संस्थाही काही देणार आहे?”
“छे. ती संस्था मला काय देणार? आणि ती देऊ शकत असली तरी मी घेणार नाही. कारण मला त्याची गरज नाही. पैसे मिळवण्याचे मार्ग इथं खूप आहेत. एक परमीट – परमीट रुमचंच – काढण्यासाठी मदत केली तर मला पन्नास सुटतात.”
“अच्छा, रॉबिन हूड.”
“नॉट एक्झॅक्टली. आय डोण्ट किल एनीबडी. आय डोण्ट लूट. मी कोणालाही धाकदपटशा दाखवत नाही. मी नियम वाकवतो. कारण एरवीही ते वाकवले जाणार असतातच. ते वाकवण्याचं काम परमीट रुमसाठी होतं. शाळेसाठी होत नसतं. तिथं मी ते आणखी सरळ करतो. मग त्या शाळेला मान्यता मिळते.”
“अच्छा, संस्थेची साधनशुचिता…”
“सरकार, त्या संस्थेनं तसंच रहायचं ठरवलं ना, तर वर्षानुवर्षे ही व्यवस्था त्यांच्याकडून फक्त “गुन्हा कबूल”चे अॅफिडेव्हिट घेत राहील. पुढे कधी तरी संस्थेच्या पदाधिकार्यांवर आरोप होतील. पोरांच्या शिक्षणाची मधल्या मध्ये वाट लागलेली असेल. ही व्यवस्था वाकवावी लागते तसं होऊ द्यायचं नसेल तर, आणि वाकवण्याचं काम करायचं झालं तर साधनशुचितेला काही वेळेस बगल द्यावी लागते… कारण तिथं बोटं तिरकीच करावी लागतात…”
हे तत्त्वज्ञान भयंकर होतं, माझं मन ते स्वीकारण्यास तयार होत नव्हतं. पण राजेंनी समोर ठेवलेलं व्यवस्थेचं चित्र त्यापेक्षा भयंकर होतं. ही व्यवस्था अशा संघटनेला शाळेची मान्यता देणार नाही, त्या भागांत शाळाही नीट चालवणार नाही. लोकांनी भोग भोगतच मरायचं अशी ही व्यवस्था.
“सावंतांचं तुमच्याकडचं काम परमीट रूमशी संबंधित?”
“हाहाहाहाहा. मी आधीच सांगितलंय, मी न-नैतीक आहे. कारण व्यवस्था न-नैतीकच असते. हे तुम्ही एकदा स्वीकारलंत ना सरकार, तर बरेच प्रश्न आपोआप मार्गी लागतात.” नाही म्हणत हा माणूस पुन्हा तत्त्वज्ञान करीतच होता. ते स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती.
बोलता-बोलता बहुदा बीअरच्या प्रभावाखाली आम्ही एकेरीवर आलो होतो. पण एकमेकांना संबोधताना राजे किंवा सरकार हे शब्द आले की मग मात्र अहो-जाहो. गप्पा सुरू राहिल्या पुढं. सहावा पिचर येईपर्यंत.
रावसाहेबांचा काळ आता संपला होता. आता एजंटगिरी सुरू झाली होती वगैरे गोष्टी तटस्थपणे हा गृहस्थ सांगत होता. कुठंही खंत नाही, कसलंही दुःख नाही. आपण करतो ते बरोबर असा दावा नाही, आपलं सारंच कसं चुकतंय याची रडकथाही नाही. आहे हे असं आहे, मी या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच पालूपद.
जेवण करून निघालो.
“किती नंबरला आहात?” आमदार निवासाच्या गेटवर राजेंचा प्रश्न.
दादानं सांगितलं.
“वर या मग माझ्याचकडे. तिथं कोणीही नाही. आपण एकटेच असतो.”
“कोणाची आहे रूम?” दादा.
“आपलीच. तुला काहीही राजकीय अडचण होणार नाही. काळजी करू नकोस.” त्याचा ठाम सूर.
माझ्या भुवया उंचावल्या.
“काही विशेष नाही. आपण एका संघटनेचे राज्य प्रमुख आहोत. त्या नावावर ती खोली सरकारकडून भाड्यानं अलॉट करून घेतली आहे. त्यामुळं तिथं कोणीही नसतं. माझ्याकडं सहसा गेस्ट नसतात. आले तरी मी त्यांना त्यांच्या-त्यांच्या आमदारांकडं पाठवतो. रुमवर मी एकटाच आणि कधी आले तर तुमच्यासारखे दोस्त.”
कसं कुणास ठाऊक, पण दादानं त्यांच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला होता.
—
आम्ही आमचं सामान घेऊन राजेंची खोली गाठली. आणि पुन्हा एकदा उडण्याची वेळ आली. भारंभार पसरलेली पुस्तकं आणि कॅसेट्स. पुस्तकांचे विषयदेखील अफाटच. ‘द ताओ ऑफ फिजिक्स’पासून ते ‘मी माझा’पर्यंत. काही पुस्तके चक्क झेरॉक्सच्या स्वरूपात होती. पण नीट बांधलेली. कॅसेट्स शास्त्रीय संगीत आणि गझलांच्या. एका कोपर्यात हारीने बाटल्या लावून ठेवलेल्या होत्या. सगळ्या रिकाम्या. ही बाहेरची खोली. आतल्या खोलीत सारं ठीकठाक. तिथं माणसाची हालचालही कदाचित नसावी.
तिथल्या कपाटातून रॉयल चॅलेंजची एक बाटली राजेंनी बाहेर काढली. कपाटातूनच तीन ग्लास काढले. स्वतः बाहेर जाऊन जगमध्ये पाणी घेऊन आले. टेपमध्ये कॅसेट टाकली. मैफिलीचा दुसरा डाव सुरू झाला होता.
टेपवरून गझलांचे सूर सुरू होते. बाहेर प्रश्न आणि उत्तरं. कसलाही सूर नसणारी.
“स्टेज का सोडलंस?” दादाचा प्रश्न.
“फर्स्ट आय लॉस्ट द इंटरेस्ट आणि मग मला समजलं की, माझा इंटरेस्ट, स्टेजमधला, जेन्युईन नव्हता.” पुन्हा एकदा कोडंच. दादा हसला.
“हाहाहाहाहा. कुठं ‘फसला’ होतास?”
“हाहाहाहा…” राजेंनी तो प्रश्न हसण्यावारी नेलं. “तसं काही नाही. आपण एकपात्री करायचो, नाटकंही करायचो. पथनाट्यंही केली. त्या सगळ्यात इश्यूबेस्ड काही तरी करतोय हा नशा होता नशा. नशा उतरला. बीए झाल्यावर. मास्तरकीची नोकरी हेच तेव्हाचं ध्येय ना! इश्यूबेस्ड काम करायचं तर नोकरी हवी म्हणून मास्तरकी बरी वाटत होती. तिथंच पहिल्यांदा जेव्हा पंचवीस हजाराची मागणी माझ्याकडं झाली तेव्हा डोळ्यांपुढं काजवे चमकले. नशा उतरला. कुणी मागावेत पैसे? भैय्यासाहेब पुरोहितांनी. ज्यांच्या संस्थेसाठी झालेल्या आंदोलनात आपण मार खाल्ला होता पोलिसांचा. औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठकीवेळी. भरतीच्या यादीत पहिल्या नंबरावर होतो. तरीही पंचवीस हजारांची मागणी. पैसे होते. तो प्रश्न नव्हता. पण अंगात भिनलेली सामाजिक कामाची नशा आणि समोर भैय्यासाहेब. काही टोटलच लागेना मला, आपण काय करतोय याची. पैसे द्यायला आणि पर्यायाने त्या नोकरीलाच नकार दिला. शेती होती मजबूत, शेवटी आम्ही देशमुखच. नोकरी करण्याची गरजही नव्हती. पण… कटी रात सारी मेरी मैकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे, अशी अवस्था झाली…”
शेर कोणाचा होता कोणास ठाऊक, पण त्यांना तो आठवला. हा सारा परिणाम मघाची बिअर आणि आत्ताची आरसी यांचा? की हा माझ्यावरचाच परिणाम? म्हणजे हा माणूस जेन्युइनली असा असेलदेखील. त्याला या किकची गरजही नसावी. असो…
“या शेराचा मूळ अर्थ खूप गंभीर आणि वेगळा आहे, पण मी तो उपरोधानं वापरतोय…” हा खुलासादेखील झाला.
“…मग प्रश्न उरला नाही. स्टेज भलतंच दिसू लागलं. आणि ‘ते’ स्टेज सुटलं. मग लक्षात आलं की, त्यातला इंटरेस्ट जेन्युईन नव्हता. त्यातून स्टेजच्या बाहेरचं काही साध्य करायचं होतं. ते इश्यूबेस्ड वगैरे. काय साध्य करायचं होतं ते नेमकं सांगता येत नव्हतं आणि सापडतही नव्हतं. म्हणजे इंटरेस्टविषयी माझाच मला प्रश्न. स्टेज सुटलं एकदाचं.”
मध्ये केव्हा तरी दादानं घरच्यांविषयी विचारलं होतं. तेव्हाही कुठंही भावनिक वगैरे न होता या गृहस्थानं आपण मालमत्तेबाबत डिस्क्लेमर दिला आहे हे सांगून टाकलं. धाकटा भाऊ अभिनेता म्हणूनच रंगभूमीवर धडपडत होता, त्याहून धाकटा वकील झाला होता, कारकीर्दीची सुरवात होती दोघांच्याही. शेती अद्याप टिकून आहे वगैरे माहिती शुष्कपणे देऊन राजेंनी घरगुती स्टोरी संपवली होती. एकूण माणूस घरापासून तुटला होता हे निश्चित. त्यामागचं कारण बहुदा त्याच्या महाविद्यालयीन आयुष्यातील इश्यूबेस्ड, थिएटर, भ्रमनिरास यातच दडलेलं असावं आणि पुढं त्याला गर्द वगैरेची जोड मिळाली असावी असा निष्कर्ष काढून मीही गप्प बसलो.
त्यापुढचं मला दुसर्या दिवशी सकाळी फारसं आठवत नव्हतं. सकाळी खोली आवरताना काही कागद मिळाले, माझ्याच हस्ताक्षरातले. त्यावर, रात्री राजेंनी बोलण्याच्या ओघात टाकलेले काही शेर टिपलेले होते. आज हे लिहिताना त्यातले दोनच आठवतात,
जाने किसकिसकी मौत आई है,
आज रुखपे कोई नकाब नही
आणि
वो करम उंगलीयोंपे गिनते है,
जिनके गुनाहोंका हिसाब नही
शायर ठाऊक नाहीत. संदर्भ आठवत नाहीत, कारण ते त्या कागदांवरही नव्हते.
राजेंची ती ‘ओव्हरनाईट’ पहिली भेट त्या दिवशी सकाळी नाश्ता होताच संपली. आम्ही आमच्या मार्गावर, राजे त्यांच्या कामात. निघण्याआधी दादाचं काम करून देण्याचं आश्वासन पुन्हा देण्यास ते विसरले नाहीत.
—
दुपारी दीडनंतरचा वेळ ऑफिसात तसा निवांतच असायचा. त्या दिवशी जेवण झालं होतं. सिगरेट झाली होती. मुंबईची वृत्तपत्रं येण्याची वाट पहात होतो, तेवढ्यात फोन वाजला. माझ्यासाठीच मुंबईहून आलेल्या पीपी कॉलचे सोपस्कार झाले आणि आवाज आला,
“सरकार, कसे आहात?” राजेच. दुसरं कोण असणार?
“बोला राजे, निवांत आहे. तुम्ही सुनवा.”
“काही नाही. सहज आठवण आली, फोन केला. काय म्हणतोय जिल्हा?”
“काय म्हणणार? नेहमीसारखाच. पाण्याची किती बोंब होणार आहे याचा अंदाज घेत बसलोय आम्ही मंडळी.”
“भरती घोटाळ्याचं काय झालं?”
“काय व्हायचं? देसाई गुंतला आहे हे सार्यांना ठाऊक आहे. त्यामुळं कधी तरी दाबला जाणारच आहे. आज ना उद्या.” जिल्ह्यात शिक्षकांच्या भरतीत झालेल्या घोटाळ्यानं राज्यात वादळ उठवलं होतं. त्याविषयी ही विचारपूस होती. देसाई म्हणजे पालकमंत्री.
“तुमच्यासाठी टिप देतोय. तीनेक दिवसांत प्रकरण जातंय सीआयडीकडं…”
“म्हणजेच सारवासारव…” मी.
“अर्थातच. त्यासाठीच. निर्णय झाला आहे. ऑर्डरवर सीएमची सही बाकी आहे.”
“बातमी आहे.”
“म्हणूनच तुम्हाला सांगितली.” एव्हाना राजेंसमवेत माझा संपर्क बर्यापैकी झाला होता, तरीही या बातमीची टिप त्यांच्याकडून यावी याचं आश्चर्य वाटून मी क्षणभराचा पॉझ घेतला.
“काळजी करू नका सरकार, तुम्हालाच टिप दिली आहे. दुसर्या कोणालाही नाही. आणि बातमी पेरण्याचा हेतू आहे, हेही उघड आहे. बातमी आधी फुटली तर बरं होईल. तो निर्णय हाणून पाडता येऊ शकतो. कारण पोलीस आत्ता ठीक काम करताहेत ना? म्हणूनच…”
मी पुन्हा काही न बोलण्याच्या मनस्थितीतच.
“सरकार, अजून आमच्यावर भरवसा नाही वाटतं. राहू द्या. एवढं लक्षात ठेवा की आम्ही तुमचा वापर कुठंही करणार नाही. हे प्रकरण असं आहे की, इथं काही करण्यासाठी तुमची मदत होईल असं वाटलं इतकंच…”
“तसं नाही राजे. पण ही बातमी एकाच ठिकाणी देऊ नका. चार ठिकाणी येईल असं पहा, म्हणजे तुमच्या हेतूला अधिक पुष्टी मिळेल, असं मला सुचवायचं होतं.” मी मधला मार्ग काढत होतो.
“हाहाहाहाहा. वा सरकार!!! म्हटलं तर तुम्ही हुशार, पण म्हटलं तर बिनकामाचे. कारण हा सल्ला तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देताय हे कळतं मला. पण समजू शकतो मी. तुम्ही म्हणता तसं करूया. बाळ भोसलेला करतो फोन, आणि वालकरलाही कळवतो…” हे दोघं इतर दोन वृत्तपत्रांचे बातमीदार. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे. पण त्यांच्याशी संपर्क साधतो म्हणतानादेखील राजेंनी माझ्या डोक्यातील मूळ व्यूहरचना फाडकन माझ्याच तोंडावर सांगून मला उघडं पाडलं होतं. ती बातमी माझ्याकडे एक्स्क्ल्यूझीव्ह ठरली असती हे खरं, पण त्याचे राजकीय संदर्भ ध्यानी घेता, मी काही भूमिका घेतोय असंही दिसलं असतं आणि ते मला नको होतं. म्हणूनच मी ती बातमी चार ठिकाणी यावी असं सुचवलं होतं.
हा माणूस कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे, माझा काय ठेवणार? माझ्या सूचनेत तो आरपार पाहू शकत होता.
दुसर्या दिवशी माझ्या वृत्तपत्रासह इतर चार ठिकाणी त्या बातम्या होत्या आणि पाहता-पाहता या प्रकरणाने भलताच पेट घेतला. प्रकरणाचा तपास करणार्या कडक आणि उजळ प्रतिमेच्या उप अधीक्षकाच्या मागं एकदम जनमत संघटित झालं. विरोधी पक्ष सरसावून उठले आणि असा काही निर्णय झालेलाच नाही, असा खुलासा सरकारला करावा लागला.
ठीक आठवड्यानं पुन्हा राजेंचा फोन.
“सरकार, आता फॅक्स पाठवतोय नीट पाहून घ्या… नंतर पुन्हा फोन करतो.”
पाचच मिनिटांत फॅक्स आला. गृह मंत्रालयानं हे प्रकरण सीआयडीकडं देण्यासाठी तयार केलेली टिप्पणी. सरकारचा खुलासा होता की असा काही निर्णय झालेला नाही आणि इथं तर सरळसरळ टिप्पणी होती.
“काय म्हणता आता?” राजेंचा पुन्हा फोन.
माझ्या हाती बॉम्बच होता. “वाजवू या, मस्तपैकी.” मी.
“सालं तुम्ही कागद पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही कधीही… असो. पण वाजवा जोरदार…”
“राजे, बातमी वाजवू. पण तुम्हाला विचारतो, तुम्ही इतके हात धुवून का मागं लागला आहात? तुमचा या जिल्ह्याशी काहीही संबंध नाही. देसाई तुम्हाला कुठं आडवं गेलेले नाहीत…”
“भरती कुणाची आहे हे पहा. तेवढं एक कारण मला पुरेसं आहे.”
आणि हे शब्दशः खरं होतं. आत्तापर्यंतच्या संपर्कात एक गोष्ट माझ्यासमोर हळुहळू स्पष्ट होत आली होती. शिक्षण खात्यातलं काहीही असलं तरी हा गृहस्थ तिथं असायचा. दादाच्याच एका समर्थकाच्या संस्थेकरीता त्यानं शाळेची मान्यता मिळवून दिली, एकही पैसा खर्च करावा न लागता. म्युच्युअल बदली हा तर त्याचा खास प्रांत. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या अशा बदल्यांसाठी दोन्ही जिल्हा परिषदांच्या मुख्य किंवा उप-मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या माध्यमातून तो सारं काही जमवायचा. अगदी सोस असल्यासारखा तो शिक्षण खात्याशी संबंधित मंत्रालयातील त्याच्याकडं आलेली कामं बिनबोभाट आणि पैसे द्यावे न लागता पार करून द्यायचा. ते खातं हा त्याचा वीकपॉईंट होता. त्यामुळं भरतीच्या या घोटाळ्यातही तो मुंबईतून हात धुवून लागलेला होता. कागद काढणं, ते संबंधितांपर्यंत पोचवून गदारोळ उठवणं आणि त्यातून सरकारवर दबाव आणणं असा एककलमी कार्यक्रम त्याच्या पातळीवर सुरू झाला होता. त्यातच ही टिप्पणी त्यानं फोडली होती. त्याची बातमी आल्यानंतर व्हायचं ते झालं. मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करीत दिलगिरी व्यक्त करावी लागली. टिप्पणी तयार कशी झाली आणि ती फुटली कशी याची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली. देसाईंना राजीनामा देतो, असं म्हणावं लागलं वगैरे. या सगळ्यात राजे कुठंही आनंदी, उत्साही वगैरे नव्हते. तटस्थपणे त्या घडामोडी मला कळवायच्या, चर्चा करायची, जिल्हा स्तरावरच्या घडामोडी समजून घ्यायच्या आणि पुढचे डावपेच आखायचे. एखाद्या मुद्यावर झपाटलेली व्यक्ती एरवी अशी तटस्थ राहू शकत नसते. तिच्या भाव-भावना त्यात गुंतत जातात. राजेंचं वेगळं होतं. एकदम कोरडेपणानं हा गृहस्थ सारं काही करत असायचा.
भैय्यासाहेब पुरोहितांनी दिलेल्या धक्क्याची ही अशी प्रतिक्रिया तर नसावी? मानसशास्त्रज्ञालाच विचारावं का?
—-
दोनेक वर्षांच्या संपर्कानंतर एकदा मी राजेंना म्हटलं, “मला हा व्यवहार प्रत्यक्ष कसा होतो हे पहायचं आहे.”
लाच द्यायचं कसं ठरवतात, पैसे कसे दिले जातात, घेतले जातात हे पहायचं होतं मला. राजेंनी शब्द दिला आणि एकदा मुंबईला बोलावलं. मी गेलो. संध्याकाळी बैठक ठरली होती. दिवसभर इतर काही कार्यक्रम नव्हता. प्रकरण साधंच होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात एकाला दारूचं दुकान काढायचं होतं. त्यासाठी आवश्यक एनओसीपैकी काही त्याच्या हाती नव्हत्या. तरीही नियमाला बगल देऊन परवाना देण्याचं मंत्र्यांनी मान्य केलं. सौदा ठरला होता साडेतीन लाखांचा. ठरवणारा होता मंत्र्यांचा पीए. परवान्यासाठी फाईल तयार करण्याचं कामही तोच करून घेणार होता. बोलणं सरळसोट होतं.
“दुकान सुरू करायचं आहे. पोलीस एनओसी आहे. जागामालकाची मिळणं मुश्कील आहे. पण त्याचं ऑब्जेक्शन असणार नाही अशी व्यवस्था आपण केली आहे.”
मला वाटलं होतं इतकं झाल्यानंतर काही संकेत वगैरे केले जातील. पण नाही. मंत्र्यांच्या पीएनं उघडपणे सांगितलं,
“साडेतीन लागतील.”
दुकानदारानं होकार भरला आणि व्यवहार ठरला. दुपारपर्यंत फाईल पुढं सरकवली जाणार होती.
संध्याकाळी पीए पैसे कलेक्ट करणार होता. मुंलुंडच्या एका प्रसिद्ध बारमध्ये ही बैठक ठरली. दुकानदार, राजे आणि मी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच्या कारनेच निघालो. बारपाशी पोचलो तेव्हा पीए हजर होता.
बारमध्ये ढणढणाटी संगीत सुरू होतं. कन्यकांचं नृत्य सुरू होतं. बीअरची ऑर्डर गेली. दुपारीच त्या पीएनं मंत्र्यांची सही घेऊन फाईल पुढं पाठवली होती. त्यामुळं दुकान मंजूर झाल्याबद्दल चिअर्स म्हणत बैठक सुरू झाली. दुपारीच माझी ओळख करून देताना राजेंनी नुसतंच “आमचे दोस्त आहेत, तुम्हाला धोका नाही,” इतकंच सांगितलं होतं आणि ते पुरेसं ठरलंही होतं. मी त्याच भूमिकेतून तेथे बिअर न पिता बसून होतो.
पहिला राऊंड संपल्यानंतर पीएनं राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं. राजेंनी दुकानदाराला खूण केली आणि एक मोठी सूटकेस पुढं आली. पीएनं ती हळूच मांडीवर घेऊन किलकिली केली आणि मान डोलावली.
काही कळण्याच्या आतच कोपर्यातून एक जण पुढं आला आणि ती सुटकेस घेऊन बाहेर पडला. राजे निवांत होते, पण तो दुकानदार किंचित हादरला होता. मला त्यातलं काहीही कळत नसल्यानं मी शांत होतो.
“घाबरू नका. आपलाच माणूस आहे. पैसे सुरक्षित नेण्यासाठी.” पीए.
दुकानदार थोडा स्थिरावला.
पीएनं परत राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं.
“च्यायला, साल्या तू सुधारणार नाहीस… इथं भेटलास ते पुरं, तिथं भेटू नकोस.” राजेंचा फटका.
मला काहीही कळत नव्हतं. पण राजेंनी दुकानदाराला खूण केली. त्यानं सफारीच्या खिशातून दहा रुपयांच्या नोटांची दोन बंडलं काढून समोर ठेवली. ती घेऊन तो पीए उठला. नाचणार्या मुलींकडं जाऊन त्याचं नोटा उडवणं सुरू झालं.
बास्स. बाकी काही नाही. थोड्या वेळानं आम्ही बाहेर पडलो. तो पीए एका अंबॅसॅडरमधून आला होता. मघा सूटकेस नेणारा त्या गाडीच्या सुकाणूवर बसला होता.
त्या दुकानदारानं आम्हाला आमदार निवासापाशी सोडलं आणि तो निघून गेलादेखील.
“भिक्कारचोट आहे साला. साडेतीन लाखात त्याचा वाटा आहेच पन्नास हजाराचा. तरी वर उडवण्याचे दोन हजार त्यानं मागून घेतले.” खोलीवर आल्या-आल्या बाटली काढून राजे बसले होते. शिव्या त्या पीएला. मला धक्का बसला. मुळात बेकायदा व्यवहार, त्यात या माणसाला प्रोफेशनलिझ्म अपेक्षित होता. बेईमानीका धंदा इमानीसे करना वगैरे. मी बोलून दाखवलं तसं. तर त्यांचं उत्तर होतं, “छ्या. इमानदारी वगैरे नाही. एका मंत्र्याच्या पीएनं असं फुटकळ वागावं याचं वाईट वाटतं. त्यानं साडेतीन लाखाऐवजी तीन लाख ५२ हजार मागून घ्यायचे. हे वर दोन हजार टिप मागितल्यासारखे मागतो तो. मुळात त्यानं पन्नासात ते भागवायला पाहिजे.” आता हद्द होती.
“राजे, कुठं जिरवेल तो हा पैसा आणि हा दुकानदार कुठून कमवेल?”
“कुठं जिरवणार साला. असेच उडवेल, थोडी फार प्रॉपर्टी करेल आणि मग काही रोग लावून घेऊन मरेल. हा दुकानदार उद्या काय करणार आहे हे उघड आहे. त्याच्या गावी कधी जाण्याची वेळ आलीच तर त्याच्या दुकानात माल खरेदी करायचा नाही हे ठरवून टाक आत्ताच.”
“अच्छा. अशी तर तुम्हाला राज्यातील सगळ्या दुकानांची यादी ठाऊक असेल…” माझा खवचटपणा.
“हाहाहाहाहा. सरकार, प्या तुम्ही. ही ओरिजिनल आहे.”
“त्या मंत्र्याची कमाई किती असेल महिन्याकाठी?”
“खरं सांगू का, हे असे हिशेब चुकतात. तुम्ही मंडळी या व्यवहारांचा नीट अभ्यास करत नाही. हा जो व्यवहार आहे तो नेहमीच कॅशमध्ये होत नसतो. अनेक राजकारणी आपला रिसोर्स बेस वाढवतात अशा व्यवहारांतून. हे पैसे शब्दाच्या स्वरूपातच अनेकदा असतात. आणि त्यांचा वापर गरजेनुसार वेळोवेळी होत जातो. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्र्याच्या हाती सगळे पैसे असतात असं नसतं. त्याची गरज कधी असते, तर निवडणुकीत. त्यावेळी तो मंत्री अशा मंडळींना निरोप पाठवतो आणि ठरलेले पैसे निवडणुकीत जिथं गरज आहे तिथं पाठवून देण्याची व्यवस्था करतो. पैशांचा व्यवहार असा होतो. राजकारण्यांच्या स्तरावर बहुदा हे असंच असतं. ते थेट पैसे घेत नाहीत. थेट पैसे घेणारी जमात म्हणजे ही मधली मंडळी. कारण त्यांचा इंटरेस्ट तेवढाच असतो फक्त. संपत्ती. बास्स. अर्थात, राजकारणी पैसा घेतात याचं मी समर्थन करत नाहीये. मी फक्त त्यांची कार्यपद्धती सांगतोय…”
“व्हॉट डू यू गेट फ्रॉम ऑल धिस?”
“कोण म्हणतं मला काही मिळतं? मला काहीही मिळत नसतं. माझ्या जगण्याचा एक स्रोत आहे तो, बास्स. त्यापलीकडे त्यातून समाधान वगैरे मी शोधत बसत नाही. काम झालं, विषय संपला.”
त्यानंतर पुढच्या दोन दिवसात अशा आणखी दोन सेटिंग्ज त्यांनी मला अनुभवून दिल्या. एकात खुद्द एका आमदारांना पैशांची बॅग घेताना पाहण्याची शिक्षा मी भोगली. शिक्षा अधिक गंभीर अशासाठी की, ती बॅग देणारा होता एक पोलीस निरिक्षक. त्याच्या बदलीसाठी. दुसरी बैठक होती ती कक्ष अधिकार्याच्या स्तरावर आणि त्याला लाच देणारे होते एक साखर कारखानदार. कारखान्याच्या चौकशीचा विषय ‘हाताळण्यासाठी’. कक्ष अधिकारी स्तरावरच फक्त. मंत्री वगैरे नाही. दोन्ही रकमा लाखांमध्ये.
याही दोन्ही बैठका बारमध्येच. पैकी एक दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध डान्सबारमध्येच. पण गंमत म्हणजे, त्यादिवशी पैशांची बॅग तिथं दिली गेली नाही. तिथं नुसतंच पिणं. तिथून बाहेर पडल्यावर दादरला कुठल्याशा एका प्रसिद्ध मांसाहारी हॉटेलात आम्ही गेलो. तिथं जेवण झालं आणि मग बाहेर आल्यावर बॅग दिली गेली.
हे असं का, हे काही मला कळलं नव्हतं. राजेंनी ज्ञानात भर टाकली.
“त्या आमदाराकडून बदलीसाठी पत्र हवं होतं. बदली खास ‘कमावत्या’ पोलीस स्टेशनला होती. तो पीआयही तेवढाच खमका होता. आपण जेवण करेपर्यंत तसं पत्र आल्याचं त्याला गृह मंत्रालयातील त्याच्या सोर्सकडून समजलेलं नव्हतं. ते कन्फर्म झाल्यानंतरच पैसे दिले जातील अशी बोली होती. दुसरा एखादा आमदार असता तर त्यानं नाही म्हटलं असतं, पण हा आमदार पैसा म्हटलं की कसाही स्वीकारायला तयार असतो.”
प्रश्न विचारण्यासाठीची लाचखोरी वगैरे अलीकडची. हे असलं सेटिंग मी त्यावेळी पाहिलं होतं. हा आमदार म्हणे विशिष्ट किंमतीला काहीही पत्र द्यायला तयार असायचा.
सगळे व्यवहार राजे म्हणतात तसेच होत असतील का? नाही. राजेंनी दाखवलेले व्यवहार हा एक भाग झाला. पण राजेंची एक खासीयत होती. त्यांनी नंतरच्या काळात इतरही अनुभवांची गाठोडी माझ्यासमोर उघडली. आणि त्यातून हा माणूस केवळ फिक्सर नाही हे उलगडत गेलं. अधिकार्यांमध्ये त्यांची उठबस असण्याचं कारण या माणसाची बुद्धिमत्ता असावी हा अंदाज आला आणि पुढं एका प्रसंगात तो खराही ठरला.
—
राजे आणि मी अशी ही एक भेट. मुंबईतच.
मी काही कामासाठी गेलो होतो. मुक्काम आमदार निवासातच होता, पण राजेंकडे नाही. जाणीवपूर्वकच मी ते टाळलं होतं. पण कसं कोण जाणे मी आल्याचं त्यांना समजलं आणि दुपारच्या सुमारास त्यांनी बरोबर मला ‘चर्चगेट स्टोअर’मध्ये गाठलं.
“क्यूं सरकार, आम्हाला टाळत होता की काय?”
मला खोटं बोलणं जमलंच नाही. हा माणूस आपलं काहीही नुकसान करीत नाही. पैसा कमावतो, पण म्हणून सक्तीनं बिल देण्याचा आग्रहही धरून आपल्याला कानकोंडं करत नाही हे सगळं मनात असल्यानं मी एकदम म्हणालो, “म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही.”
“मग एक शिक्षा आज. आज आमच्याकडून रात्रीभोजन.” हा एक खास शब्द हा गृहस्थ नेहमी वापरायचा.
रात्री मी, माझे दोन स्नेही आणि राजे असे आम्ही जेवण घेतलं त्या हॉटेलवर नेमकी त्याचदिवशी उशीरापर्यंत ते चालू ठेवल्याबद्दल धाड पडायची होती. पण राजे होते आणि तेच परमीट असल्यासारखं होतं आमच्यालेखी. हॉटेलातून आम्ही बाहेर पडलो, तर राजे सरळ पोलीस जीपकडे गेले. नेहमीप्रमाणे अधिकारी बसला होता पुढे.
“ओळखलं?” इति राजे.
“?” अधिकार्याच्या चेहर्यावर मग्रुरी होतीच.
“देशमुख. विपिनचा दोस्त.” विपिन हे दक्षिण मुंबईच्या त्या झोनच्या डीसीपीचं नाव.
“मी काय करू?” तो इन्स्पेक्टर.
“काही नाही. आम्हाला उगाच लटकवू नका. जेवण करत होतो. उशीर झाला असेल तर तो दोष हॉटेलवाल्याचा आहे. आमचा नाही. त्यानं बसू दिलं, आम्ही बसलो.”
हे बोलणं होतं न होतं तोच डीसीपींचा ताफा तेथे आला. राजेंनी थाप मारली असावी असं वाटून आम्ही थोडे हबकलो होतो, पण तसं नव्हतं. त्यांना पाहताच तो डीसीपी पुढं आला. काही वेळात आम्ही इतरांपासून वेगळे झालो आणि परतीचा मार्ग मोकळा झालादेखील.
“साला, क्यूं रे एकही हॉटेलको पकडता है?” इकडे राजे आणि तो डीसीपी यांच्यात जुंपण्याची चिन्हे होती.
“तुझे छोडा ना. भाग ना फिर.”
“बात वैसी नही है. एकही हॉटेलके पिछे क्यूं लगता है? मै बताऊ?”
डीसीपीच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव.
“तुझे जॉईंटने बोला होगा. पक्का.” जॉईंट म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस,
“तू जा ना बाप…” तो डीसीपी एकदम गयावया करण्याच्या परिस्थितीत आला.
“छोड यार. बोल उसको के हॉटेल बंद किया है. छोड दे सब लोगोंको. जाने दे. इतना तू कर सकता है.”
आम्ही वैतागलो होतो. ही समाजसेवा करण्याची अवदसा राजेंना आत्ता कुठून आठवली म्हणून. पण त्या डीसीपीनं खरोखरच सर्वांना सोडून दिलं आणि हॉटेल बंद झाल्याचं पाहून तोही निघाला. जाता-जाता त्याला राजेंनी रोखलं.
“विपिन, एक बोलू तुझे? यू आर टोटली मिसफिट इन द जॉब. यू वुईल सफर…”
ते शब्द मात्र खरे ठरले. पुढे हा अधिकारी सचोटीचा म्हणूनच नावाजला आणि पाहता-पाहता साईड ब्रँच, सेंट्रल डेप्युटेशन असं करत कुठं अडगळीत गेला ते कोणालाही कळलं नाही.
आम्ही रुमवर परतलो. मी अद्यापही कोड्यात होतोच. हॉटेलवरील छाप्यामागील राजकारण राजेंना ठाऊक होतं. माझ्या मध्यमवर्गीय मानसिकतेत तिथल्या जेवणाचं बिल त्यांनी दिलं की नाही हीच टोचणी होती.
“दिया है बिल. धाडीमागचं मला ठाऊक आहे कारण त्या हॉटेलनं त्याच परिसरातील दोन बड्या हॉटेलचा धंदा बसवलाय. त्यांनी गृह राज्यमंत्र्यांना सांगून या हॉटेलला अडचणीत आणायचा प्रयत्न चालवला. जॉईंट सीपी त्याला सामील. चोर साले सगळे.”
“तो नियम तोडतोच ना?” मी.
“तोडतो. करा कारवाई. पण मग सगळ्यांवर करा. डान्सबार चालतात, लेडीज सर्विस बार चालतात, हे फक्त चालत नाही. म्हणूनच मी आडवा गेलो.”
“तुझा विपिनशी काय संबंध?”
“अरे, यू मस्ट बी फ्रेण्ड्स विथ हिम. फिलॉसॉफीवाला आहे. मतलब, एम.ए. फिलॉसॉफी. मग एम.फिल. आणि पीएच.डी. आय वंडर व्हाय ही बिकेम आयपीएस! टोटली अनफिट. काण्ट नेगोशिएट, बार्गेनिंग नाही करत. तत्त्वांना चिकटून. त्याला ही पोस्टिंग मिळाली कशी ठाऊक आहे?”
“?”
“दिल्ली कनेक्शन. कनेक्शन म्हणजे, थेट कॅबिनेट सेक्रेटरी.”
हे थोडं खरं असावं. कारण तेव्हाच्या कॅबिनेट सेक्रेटरींचं अनेक राज्यातील अशा अधिकार्यांकडं लक्ष असायचं आणि असे अधिकारी अडगळीत जाऊ नयेत यासाठी ते प्रयत्न करायचे असं बोललं जायचं. त्यात त्यांना किती यश यायचं वगैरे संशोधनाचा विषय.
“पण तुझा काय संबंध त्याच्याशी?”
“फिलॉसॉफी. एका कॉन्फरन्समध्ये तो होता. मी श्रोता होतो. त्यानं काही तरी मुद्दे मांडले. समथिंग अबाऊट बुद्ध अँड गांधी. दोघांना एकत्र आणू पाहणारं काही तरी. मी त्यावर प्रश्न विचारले. बुद्धानं त्या काळी एका व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं, मूलभूत विचार मांडले. गांधींनी ते थोडंच केलं आहे, गांधींनी व्यवस्थेला नैतीक आयाम देण्याचा प्रयत्न जरूर केला, पण मूळ विचारधारा थोडीच बदलली त्यांनी, असा काहीसा माझा मुद्दा होता. एक छोटी चकमक झाली आमची. आत्ता तपशील आठवत नाहीत…” हे सांगताना ग्लासकडं अंगुलीनिर्देश. बुद्ध आणि गांधी यांच्यासंदर्भात असा तौलनीक विचार मांडतानाच तपशील आठवत नाहीत असं हा माणूस म्हणतो म्हणजे हे तपशील काय असावेत इतकाच माझ्यापुढचा प्रश्न.
“…पण त्या कॉन्फरन्समधून बाहेर पडताना हा आला माझ्याकडं, ओळख करून घेतली आणि भेटायला बोलावलं. ही थॉट आयम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी. मी त्याचा गैरसमज दूर केला. अर्थात, माझ्याविषयी खरी माहिती सांगितली नव्हतीच. ती पुढं आमच्या भेटी वाढल्या तशी त्याला समजत गेली.”
“तुझ्या ‘करियर’विषयी त्याचं मत काय?”
“ते काय असणार? तो म्हणतो दे सोडून, खासगी क्षेत्रात तुझ्या गुणवत्तेला वाव आहे वगैरे…”
“आणि ते तुला नको आहे…”
“कोण म्हणतं? खासगी क्षेत्रासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या माझ्याकडं नाहीत, त्या रेसमध्ये मी पडू शकत नाही. कारण तिथं माझ्या गुणवत्तेवर इतर गोष्टींच्या जोरावर मात होऊ शकते आरामात. मग तिथं सडणं नशिबी येईल.”
“हा विरोधाभास आहे राजे. इथंही तुम्ही रिलेशनशिपच्याच जोरावर काही करता. तिथंही तेच करावं लागेल…”
“नाही. मी इथं रिलेशनशिपच्या जोरावर काहीही करत नाही. इथं सरळसोट व्यवहार असतो. दिले-घेतले. बास्स. नातं-बितं, संबंध, मैत्री सारं झूट. ठरलेल्या नोटा मिळाल्या नाहीत तर इथं काम होत नाही. कारण इथलं प्रत्येक काम नियमांत बसवावं लागतं. आणि ते तसं खासगी क्षेत्रात नसतं. तिथं नातं-बितं महत्त्वाचं. ते गोट्या चोळणं आपल्याला जमणार नाही. इथं आपण काम झालं की कुणालाही “वर भेटू नका” असं सुनावतो. फाट्यावर मारतो. तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आपण आपली न्यूझन्स व्हॅल्यूही इथं निर्माण करतो. ती तिथं नसते…”
माझं बोलणंच खुंटलं. त्यामुळं त्या ‘ओरिजिनल’वर लक्ष केंद्रित करत मी गप्प झालो.
हा माणूस पचवणं अवघड आहे इतकंच काय ते डोक्यात शिरलं त्या रात्री. पुढं आमचा संपर्क राहिला नाही. पण हा माणूस असा आयुष्यातून जाणार नव्हता. त्यानं आधी अनेक धक्के दिले होते. एक राहिला होता. अनेक कल्पनांची मांडणीच विस्कटून टाकणारा.
—
वर्षापूर्वी काही कामानिमित्त नाशीकला निघालो होतो. रात्री अकराला स्टॅंडवर पोचलो. बाराची गाडी होती. बाथरूमला गेलो, तिथं दारातून बाहेर येणारा एक चेहरा थोडा ओळखीचा वाटला. केस मानेपर्यंत वाढले होते. दाढी चेहरा भरून. चेहरा राकट वाटावा अशी. अंगात विटलेली जीन पँट, निळ्या रंगाची. पांढरा शर्ट. डोळे खोल गेलेले. तो गृहस्थ माझ्या अंगावरून नाशीकच्या फलाटाकडे गेला. मी विचारातच आत शिरलो.
बाहेर आलो तेव्हा डोक्यात प्रकाश पडला होता, हे तर राजे. खोल गेलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणारा बोलका भाव मला त्यांची ओळख सांगून गेला. मी धावतच नाशीक फलाटाच्या दिशेने गेलो. बसच्या आजूबाजूला पाहू लागलो. कुठंही काही चाहूल नव्हती. भिरभिरणारी नजर डाव्या हाताला फलाटाच्या कोपर्याकडं गेली. तिथं एका बाकड्यावर राजे बसले होते. सिगरेट शिलगावलेली होती. बस सुटण्यास वेळ असल्यानं मी त्यांच्याकडं मोर्चा वळवला.
“राजे?”
चेहर्यावर कसलेही भाव नाहीत. तो गृहस्थ एकटक माझ्याकडं पहात होता. आपण चुकलो की काय असं मला उगाच वाटून गेलं. पण धीर करून मी पुन्हा “राजे?” असं विचारलं.
“सरकार?”
हुश्श. दरवाजा किलकिला झाला होता. “इथं कुठं?”
“असंच. फिरत-फिरत…”
“कुठं निघाला आहात?”
“कुठंच नाही ठरवलेलं अजून.” मी उडालो. कोड्यात बोलण्याची सवय म्हणावं की नेहमीप्रमाणं ठाम, ठोस विधान हे कळेना.
पण बोलणं तरी सुरू झालं होतं. विचारपूस करता-करता ध्यानी आलं की राजेंनी मुंबई केव्हाच सोडली होती. मंत्रालयातील भरभराट देणारं ‘करियर’ही बंद होतं. उपजीविकेसाठी हल्ली काय करता या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.
गप्पा सुरू झाल्यानं मी बाराची गाडी सोडून द्यायचं ठरवलं.
दोन दिवसांआधीच राजे आले होते. बंगळूरहून. गोवामार्गे. हा संकेत पुरेसा होता. गृहस्थ पुन्हा एकदा भटक्या झाला होता हे निश्चित. घरच्यांनी नाद सोडून कित्येक वर्षं झाली होती. नियमित जगण्याची काही इर्षा, उमेदच राहिली नव्हती. पण भरकटताना जे जगणं झालं होतं ते मात्र भयंकर होतं. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापासून ते मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीणं, भटक्यांच्या नशाबाजीपासून ते स्टेजच्या सोसापर्यंत, रसीकतेचा कळस गाठणारं जगणं ते अगदी कोठा… सगळी टोकंच. बोलता-बोलता राजे सांगत गेले होते मधल्या काळातली कहाणी.
ठीक एक वर्ष मंत्रालयातील करियर गुंडाळण्यात गेलं. गुंडाळलं म्हणजे त्यांनी एकही पैसे न घेता काही कामं करून दिली. बहुतेक कामं शिक्षण खात्यातली, काही कामं अपंग-बालकल्याण अनुदानाशी संबंधित. मी म्हटलं हे म्हणजे आधीच्या पापातून उतराई होण्याचा प्रकार तर नाही? त्यावर थेट उत्तर, “मी काहीही पाप केलं नाही. त्या व्यवस्थेत मी तेच केलं जे तिथं होणार होतं. त्या व्यवस्थेला मोडून काढत मी काही गोष्टी केल्या. अखेरच्या वर्षांत फक्त तशाच गोष्टी केल्या. ते माझं कर्तव्य होतं. त्यामुळं त्यात माझी काहीही कर्तबगारी नाही.”
मंत्रालयातील करियर सोडल्यानंतर आमदार निवासातून थेट धारावी झोपडपट्टी. का तर, तिथलं जगणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी. कशासाठी हा अनुभव घ्यायचा, तर केवळ घ्यायचा म्हणून. राजे जे सांगत ते विश्वासार्ह असे म्हणून लिहितो इथं, त्यांनी त्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम केलं होतं. शंभरावर एकर शेतजमीन असलेल्या घरातला हा गृहस्थ. धारावीच्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम करून जगत होता. त्यानंतर थेट बंगळूर. कशासाठी? काही नाही. रेल्वेत बसलो आणि तिथं पोचलो. तिथं एकदम पांढरपेशी काम. एका बांधकाम कंपनीत साईट ऑफिसवर सुपरव्हायजरी काम. मी म्हटलं, सर्टिफिकेट्स वगैरे नसताना नोकरी कशी मिळाली? उत्तर एकच. “आपली कनेक्टिव्हिटी सर्टिफिकेट्सपेक्षाही डीप आहे.” बंगळूरला काही काळ काढल्यानंतर गोवा. किनार्यावरच्या एका हॉटेलात वेटर. त्या जोडीनं पुन्हा हिप्पी (राजेंच्या भाषेत भटक्या) समुहांशी संपर्क, त्यातून अंमली पदार्थांच्या जाळ्यात पुन्हा एकदा. त्याच तारेत बहुदा आता इथं.
“आता ठरवलंय, एखादं खेडं गाठून दिवस काढायचे. पैसे आहेत अजून बँकेत. किमान साडेतीन लाख तरी. ते टिकले कारण बँकींग व्यवहारांपासूनही लांबच फेकले गेलो होतो. आता सही तरी नीट करता येईल की नाही ठाऊक नाही. पण एकदा मुंबईत जाऊन तो क्लेम करायचा आहे… मला वाटतं की राक्या मदत करेल त्यासाठी…” या राक्याला झोपडीतून उचलून आणून पुढं शिकवत बँकेत चिकटवून दिला होता राजेंनी. त्याची कहाणी हा तर स्वतंत्र विषय.
माझ्या अंगावर काटा आला. एक क्षणभर वाटलं की या गृहस्थाला घरी न्यावं. काही दिवस राहू द्यावं. पण माझ्या मध्यमवर्गीय मानसीकतेनं त्या इच्छेवर मात केली. त्याचं ते विलक्षण जगणं माझ्या चौकटी उध्वस्त करून जाणारं होतं. त्या चौकटीतीलं माझं जगणं असुरक्षीत होत गेलं असतं…
मी ते टाळलं. म्हणालो, “राजे, पुण्यात राहता आहात कुठं?”
बहुदा हाच प्रश्न त्यांना नकोसा असावा. मी त्याचं जगणं पाहिलं होतं ते शानदार. आत्ताचं तसं नव्हतं.
“वेल, सरकार, यू नो, बर्ड्स लाईक मी नेव्हर नीड अ नेस्ट. दे आर सोलली डिपेण्डण्ट ऑन देअर इन्स्टिंक्ट्स. आयम वेल प्लेस्ड व्हेअर आयम…”
इंग्रजीवरची मूळ मांड कायम होती तर. मी उगाच मनाशी चाळा केला, शेर आणि हिंदीही पूर्वीसारखं असेल का?
“पुढं काय करणार आहात?”
“सांगितलं ना, की एखादं खेडं गाठायचं आहे. खूप पूर्वी नर्मदेच्या किनार्यावर मध्य प्रदेशात एकदा भटकत गेलो होतो. एका खेड्यातील एका देवळात एक पुजारी भेटला. मी तिथं आठवडाभर मुक्काम केला होता. त्याच्याशी बोलताना कळलं की तो जुना इंजिनिअर आहे. अस्खलीत भाषा, संस्कृतवर जबर कमांड. टाटांच्या कुठल्याशा कंपनीत होता, तिथल्या स्पर्धेत टिकला नाही. गुणवत्ता असून काही हाती येत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलं, एकदा हार्ट अटॅक. पुढं थेट अध्यात्मात शिरला, सारं काही सोडून त्या देवळात जाऊन बसला होता. चीज थी, सहनेलायक. क्यूंकी, वो सिस्टमका व्हिक्टिम था. वोही सिस्टम, जिसका मै एक पार्ट हुवा करता था…”
“तो अब क्या उसका व्हिक्टिम हो?”
“नो. नॉट अॅट ऑल. आयम स्टील द पार्ट ऑफ द सिस्टम. दॅट्स व्हाय आयम व्हेरी अनलाईक यू. आय कॅन स्टिल थिंक ऑफ बीईंग सिस्टमीक अगेन. व्हिच आयम नॉट डुईंग. कारण, यू नो वन थिंग अबाऊट द सिस्टम? जे सिस्टमचा पार्ट असतात ना, ते त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन जातात ते कळत नसतं. त्यामुळं सिस्टमच्या बाहेर असणं किंवा तिचा व्हिक्टिम असणं हे अनेकदा फायद्याचं असतं. आय कान्ट मेक अ चॉईस बीटवीन द थ्री. अँड धिस इज द सिंपल ट्रुथ.”
—
विषय न वाढवता मी निरोप घेतला. नाशीक गाठलं. काम उरकून तीन दिवसांनी परतलो. आल्यावर आधीच्या तीन दिवसातले पेपर समोर घेऊन बसलो होतो. एका पेपरमध्ये आतल्या पानात बातमी होती, “बसस्थानकात बेवारस मृतदेह”. सोबत अर्धा कॉलम फोटो. फक्त चेहर्याचा.
चेहर्यावर दाढी. खोल गेलेले डोळे. वेशभूषेचं वर्णन. सारं काही राजेंशी जुळणारं.
दुपारपर्यंत कन्फर्म झालंदेखील. जागीच हृदयविकाराचा झटका. आमची भेट झाली त्याच रात्रीची घटना. एकदा वाटलं आपण पुढं होऊन काही करावं, पण पुन्हा त्यांनी त्यांच्याच शब्दांत सांगितलेल्या सत्याची आठवण झाली आणि मी शांत बसणं पसंत केलं.
“सिस्टमचा पार्ट त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन होऊन जातो ते कळत नसतं…”
(पूर्ण)