तो भीषण दुष्काळ पडला नसता तर खान्देशातल्या बोरविहिरच्या रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्याचं दान वेगळंच पडत गेलं असतं. म्हणजे तो दुष्काळ पडला नसता तर बोरविहिरमध्ये शेती नीट चालली असती. मग पोटाचा प्रश्र्न निर्माण झाला नसता आणि रामचंद्र साहेबराव बोरसे गावातल्या इतर शेतकर्यांमध्ये मिसळून गेले असते. वयात येताच त्यांचं लग्न झालं असतं. संसार फुलला असता, पुढं-मागं गावातल्या राजकारणात ते शिरले असते, कदाचित सरपंच किंवा तत्सम पदापर्यंत पोचले असते. मुलं झाली असती, त्यांची लग्नं झाली असती, रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या अंगा-खांद्यावर नातवंडं खेळली असती, विठ्ठलाचं नाव घेत रामचंद्र साहेबराव बोरसे यांनी आयुष्याची नाव पैलतीरी नेली असती.
पण जगणं इतकं सरळ नसतं. ते एक आडमुठं साल रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्यात येणार होतं आणि ते आलं. त्या सालानं दुष्काळही आणला.
हा दुष्काळ पडला नसता तर साहेबराव बोरसे यांच्यापुढं कसलाही प्रश्न निर्माण झाला नसता. त्यांच्यापुढं प्रश्न नाही याचाच अर्थ त्याआधीच काही वर्षं मॅट्रिक झालेल्या रामचंद्र बोरसे यांच्यापुढंही प्रश्न निर्माण झाला नसता. अर्थातच, प्रश्न नसल्यानं उत्तराच्या शोधात बोरविहिरहून धुळे आणि तिथून पुढं मुंबई हा त्यांचा प्रवास झाला नसता. हा प्रवास झाला नसता, तर पुढं मुंबईत बाळासाहेब जाधवांशी त्यांची गाठ पडली नसती. ही गाठ नाही म्हणजे मंत्रालय आणि सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू यथास्थित मॅनेज करण्याची हिकमत रामचंद्र बोरसे यांना दाखवावी लागली नसती. त्याचाच अर्थ पुढं आर. एस. बोरसे उर्फ आरेस किंवा रावसाहेब अशा नावानं प्रसिद्ध पावण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. ही प्रसिद्धी मिळाली नसती, तर पुढं त्यातूनच आलेलं संकट त्यांच्यावर आलं नसतं. ते आलं नसतं तर आजची ही वेळ रावसाहेबांवर कधीही आली नसती…
***
“मॅट्रिक झाला आहेस, आता शेतावर निभावणं मुश्कील. तू बघ कायतरी…” साहेबराव बोरसे यांचे हे शब्द अनपेक्षित नव्हते. आधीच्या तीन वर्षांतील परिस्थिती स्वतः रामचंद्र बोरसे यांनी अनुभवलेलीच होती. बापानं काढलेले कष्ट, वर्षानुवर्षे त्यानंच पेरून ठेवलेल्या पैशाचा आत्ता होत असलेला उपयोग हे सारं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे, आता पाऊस पडणार नाही आणि पेरा वाया गेला आहे हे त्या वर्षी जेव्हा पक्कं झालं तेव्हा ‘पुढं काय’ हा भारतीय शेतकर्यासाठी चिरंतन असलेला प्रश्न उराशी घेऊन बाप-लेक बसले होते.
“मी धुळ्याला जातो. तिथं पाहू. कदाचित नानासाहेबांकडं काही मार्ग निघेल,” रामचंद्र बोरसे यांनी वडिलांना सांगितलं होतं. त्यानुसारच पुढं फारसं काही नाट्य न घडता ते धुळ्याला गेले. तेथे त्यांनी नानासाहेबांची गाठ घ्यायचं ठरवलं होतं. नानासाहेबांच्याच संस्थेच्या शाळेतून रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक केली होती. तिथं त्यांनी आपल्या वक्तृत्त्वाच्या जोरावर नानासाहेबांचं लक्ष एकदा वेधून घेतलं होतं आणि त्यातून ते त्यांचे आवडते विद्यार्थीही झाले होते. त्या जोरावर आता नानासाहेब काही पर्याय आपल्यासमोर ठेवतील असं वाटून रामचंद्र बोरसे यांनी नानासाहेबांना भेटण्यासाठी धुळे गाठलं खरं, पण तिथं त्याच्या पदरी पहिली निराशा येणार होती.
रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक होणं ते आता धुळ्यात येणं या मधल्या काळात झालेल्या उलथापालथीत नानासाहेबांचा संस्थेवरील ताबा सुटला होता. सुटला होता म्हणजे तो हिसकावून घेण्यात आला होता. नानासाहेब शेतकरी कामगार पक्षाशी बांधिलकी मानणारे, आता संस्था ज्यांच्या ताब्यात होती ती मंडळी कॉंग्रेसची. म्हणजे ७० च्या दशकाची कल्पना असलेल्यांसाठी राजकीय पक्षांची ही दोन नावंच नेमकं काय घडलं होतं याची कल्पना येण्यास पुरेशी ठरावीत, रामचंद्र बोरसे यांनाही त्यातून सारं काही समजून गेलं. नानासाहेब सत्तेत नाहीत म्हणजे ते काही करू शकणार नाहीत, हे पक्कं ध्यानी आल्यानं रामचंद्र बोरसे यांनी सरळ मुंबईची वाट धरली. आधी चाळीसगाव आणि तिथून मुंबई. अर्थात, त्याआधी त्यांनी एक केलं. धुळ्यातच ते कॉम्रेड बाबा भदाणेंना यांना भेटले. मिल कामगार संघटनेच्या ऑफिसात. बाबा भदाणे हे रामचंद्र बोरसे यांच्या वडिलांचे मित्र. “मुंबईत आमदार निवासात जा, तिथं कारमपुरींच्या खोलीत तुझी राहण्याची सोय करतो. पण जेवणा-खाण्याचं तुझा तुला पहावं लागेल,” हे बाबा भदाणेंचे शब्द रामचंद्र बोरसे यांना आशीर्वादच वाटले. कारमपुरी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार. भदाणेंचे समकालीक. त्यामुळं त्यांच्या शब्दाचं तिथं वजन होतं.
त्या ऑक्टोबर महिन्यात रामचंद्र बोरसे मुंबईत व्ही.टी.वर उतरले तेव्हा त्यांचं वय होतं २० वर्षे आणि वर चार महिने. हो, त्यांची जन्मतारीख १ जून हीच होती. गावा-गावांतल्या मास्तरांच्या सोयीची. मास्तरांबरोबरच या अशा मुलांचं हितही साधणारी… तर रामचंद्र बोरसे यांनी त्या दिवशी व्ही.टी.च्या बाहेर पाऊल टाकलं आणि रस्त्यांची भव्यता पाहूनच ते चक्रावून गेले. येताना दिसून आलेली या महानगरीची भयंकर लांबी त्यांना घेरून टाकणारी ठरली होतीच. आता हे असं दर्शन. आमदार निवास गाठायचं कसं हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता. एखाद्याला विचारावं हे उमजण्याइतकंही धैर्य त्यांच्यात त्या वेळी राहिलं नव्हतं.
गर्दी थोडी कमी होईल अशा आशेनं रामचंद्र बोरसे काही वेळ एक कोपरा धरून थांबले. पण अर्धा तास गेला तशी गर्दी तेवढीच आहे किंवा वाढते आहे हे त्यांच्या ध्यानी आलं. त्या एका क्षणानं त्यांच्या जगण्यात एक मोठा बदल घडवून टाकला.
“इथं ही गर्दी अशीच वाढत जाणार असेल तर थांबूनही उपयोग नाही. दोनच रस्ते आहेत – पुढं सरकून आमदार निवास गाठणं किंवा माघारी बोरविहिर. आत्ताच्या घडीला तर दोन्हीकडं उपासच दिसतोय. तिथं इतरही काही नाही. इथं किमान इतक्या गर्दीत काही करता तरी येईल…”
रामचंद्र बोरसे यांचा निर्णय झाला आणि त्यांनी पाऊल पुढं टाकलं. रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसालाच त्यांनी गाठलं आणि आमदार निवासाचा पत्ता विचारला. गबाळ्या अवतारातील अशी काही मंडळी आमदार निवासात येत असतातच, त्यामुळं त्या पोलीसानं हातानं खूण करून रस्ता दाखवला. पहिलं वळण, दुसरं वळण सांगितलं आणि त्यानं लक्ष फिरवलं.
पोलीसानं हात केलेल्या दिशेनं रामचंद्र बोरसे यांनी लक्ष वळवलं आणि पहिलं पाऊल टाकलं, ते प्रथमच एका विश्वासानं. आमदार निवासाच्या दिशेनं. ती वळणं समजून घेत त्यांनी टाकलेलं पाऊल हे त्यांच्या आयुष्यातील पहिलं वळण.
***
दुष्काळाच्या गावी बसलेल्या झळा आणि मुंबईतील वास्तव्यात तुलनेनं आणलेलं सुख यातील नेमका फरक रामचंद्र बोरसे यांच्या ध्यानी यायला वेळ लागला नाही. एकाच राज्यातील ही दोन चित्रं त्यांच्या पटकन ध्यानी आली. गावाकडं दुष्काळामुळं डोक्याला हात लावून बसलेले, पोटात कधी काय जातंय याची प्रतीक्षा करणारे शेतकरी (रामचंद्र बोरसे यांच्या शब्दांत कष्टकरी) आणि त्याचे कुटुंबीय हे चित्र त्यांच्या मनात कोरलं गेलं होतं. मुंबईत त्या चित्राच्या शेजारीच आणखी एक चित्र तयार झालं. नोकरदार मंडळींचं. तुलनेनं समाधानी असणारं. अर्थात, ही सारी या मायापुरीतील पहिलीच प्रतिबिंबं होती. पुढं इतरांच्या मनात अशी अनेक प्रतिबिंबं खुद्द रामचंद्र बोरसे यांना मध्यवर्ती ठेवून उमटणार होती हे त्यावेळी कुणालाही सांगता आलं नसतं इतकं खरं.
आमदार निवासातील पहिला महिना गेला आणि रामचंद्र बोरसे यांच्या एक ध्यानी आलं की, या काळात आपल्याला रोजगार म्हणून काहीही मिळालेला नाही. गावाकडून येताना जे पैसे आणले होते तेही आता संपत आले आहेत आणि पुढं जगायचं असेल तर हात-पाय जोरातच मारावे लागणार आहेत.
“आपल्याकडं आहे ते कौशल्य केवळ लेखन-वाचन इतकंच. डोकं चालतंय, पण ते चालतंय हे दाखवण्याची संधी नाहीये…” स्वतःविषयीच विचार करीत बसलेल्या रामचंद्र बोरसे यांची त्याच मनस्थितीत तेव्हा आमदार असणार्या बाळासाहेब जाधवांशी गाठ पडली ती अपघातानंच. ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं दुसरं वळण.
“हे निवेदन आपल्याला काहीही करून इंग्रजीत करून घ्यायचं आहे…” साडेसहाफुटी धिप्पाड असं ते व्यक्तिमत्त्व बरोबरच्या कोणाला तरी सांगत होतं. स्वच्छ पांढरं शुभ्र धोतर, झब्बा, डोक्यावर सरळ रेषेत असणारी गांधी टोपी. कपाळावर उभं गंध.
आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये एका टेबलापाशी सुरू असलेला हा संवाद रामचंद्र बोरसे यांच्या कानी पडला, कारण त्यावेळी ते तेथे सकाळचा चहा घेण्यासाठी आले होते. गेल्या महिन्यात रीतसर नोकरीचे अर्ज वगैरे प्रयत्न करूनही पदरी काहीही येत नसल्याने थोडा वैताग आलेलाच होता. माणसं बर्याचदा अथक प्रयत्नांती यश न आल्यानं वैतागतात आणि अशा वैतागात काही तरी धाडस करतात. कधी ते अंगाशी येतं तर कधी फायद्यात पडलं. धाडस अंगाशी आलेली माणसं पुढं किरकिरी होत जातात, तर यशस्वी ठरलेली माणसं बहुतेकदा एखाद्या कळसावर जाऊन पोचतात. रामचंद्र बोरसे यांच्या संदर्भात दुसरा प्रकार झाला.
“मी इंग्रजी लिहू शकतो. तुमचं निवेदन तयार करून देऊ शकतो…” काहीही ओळख-देख न करता रामचंद्र बोरसे यांनी त्या माणसाकडं जाऊन थेट सांगितलं. त्या साडेसहाफुटी धिप्पाड व्यक्तीमत्त्वानं त्यांच्याकडं नजर वळवली तेव्हा यांनीही ताकदीनं त्या नजरेला नजर भिडवली. दहा-पंधरा सेकंदांची ती नजरानजर.
“काय नाव?” साडेसहाफुटी आवाज.
“रामचंद्र बोरसे. धुळ्याकडून आलोय. दुष्काळामुळं घरातून बाहेर पडलो. मॅट्रिक झालो आहे. नोकरीचा शोध सुरू आहे. पण काम होत नाहीये. तोवर आधार हवा आहे.” एका दमात त्या व्यक्तीकडून येणार्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनच रामचंद्र बोरसे थांबले. ते निश्चितपण त्यावेळी दमले असावेत. एक सुस्कारा हळूच सुटलादेखील.
“इंग्रजी येतं?”
“म्हणूनच म्हटलं की, निवेदन लिहून देईन. येतं मला.” हे खरं होतं की रामचंद्र बोरसे यांना इंग्रजी वाक्यं नीट लिहिता यायची. व्याकरणाची चूक होत नसे. पण इंग्रजी येतं असा दावा करण्याइतपत काही ते कौशल्य मानलं जात नसतं हेही खरंच. पण इथं त्यांनी रेटून दिलं.
“कुठं राहतोस?”
रामचंद्र बोरसे यांनी तपशील पुरवला. मग पुढचं सगळं रीतसर झालं. त्या गृहस्थाचं नाव बाळासाहेब जाधव. आमदार. पक्ष अर्थातच कॉंग्रेसच. मातब्बर आसामी. तीन साखर कारखान्यापर्यंत पसरलेली सत्ता. इतर व्यापही मोठा. त्यांनी रामचंद्र बोरसे यांना आपल्या खोलीवर नेलं, निवेदनाचा मसुदा त्यांच्या हाती दिला. रामचंद्र बोरसे यांनी ते इंग्रजीत केलं. अगदी साधंच होतं. मतदार संघात एक मध्यम प्रकल्प होता. त्याच्या कालव्याच्या आखणीबाबतचं पत्र. ते करताना रामचंद्र बोरसे यांच्या तल्लख डोक्यातून किडा चमकून गेला होताच, हे निवेदन इंग्रजीत देण्याचं काहीही कारण नाही, मराठीतच हवं. पण त्यांनी आत्ताच डोकं चालवायचं नाही असं मनाशी ठरवून टाकलं होतं आणि तेच शहाणपणाचं ठरलं हे दुसर्या दिवशी त्यांच्या ध्यानी आलं.
“साहेबांनी बोलावलंय…” आदले दिवशी बाळासाहेबांसमवेत असलेला गृहस्थ रामचंद्र बोरसे यांना शोधत होता.
आदल्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला असावा असं समजून रामचंद्र बोरसे गेले.
“कालच्या कामावर आपण खुश आहोत. आपलं असंच काम असतं बरंच. करणार का?” बाळासाहेबांचा प्रश्न. या प्रश्नाचं एकच उत्तर सध्या तरी रामचंद्र बोरसे यांच्याकडं होतं. हो!
“पगार मिळेलच. पण चोवीस तास आपल्याशी बांधिलकी हवी.” बाळासाहेबांनी कामाऐवजी व्यवस्थेची चौकट स्पष्ट केली. रामचंद्र बोरसे यांनी पुन्हा मान डोलावली.
दीडशे रुपये दरमहा. आमदार निवासात बाळासाहेबांच्या खोलीतच राहण्याची सोय, फिरती वगैरे करावी लागलीच तर त्यांच्याच गाडीतून. इतकं पुरेसं होतं रामचंद्र बोरसे यांना.
आणि त्यांच्या हातून खर्या अर्थानं पहिलं निवेदन गेलं ते कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना. राज्यातील परिस्थिती बिकट कशी आहे आणि ती हाताळण्याची क्षमता नेतृत्त्वात कशी नाही याचे पाढे वाचणारं निवेदन. आदले दिवशी बाळासाहेबांनी करून घेतलेलं कालव्यासंबंधीचं निवेदन एक चाचणी होती. एका सचिवाला ते निवेदन दाखवून त्यातल्या इंग्रजीची बाळासाहेबांनी खातरजमा करून घेतली होती हे पुढं काळाच्या ओघात उघड झालं खरं, पण रामचंद्र बोरसे यांना या दुसर्या निवेदनावेळीच ते समजून चुकलं होतं.
बाळासाहेबांनी अचानक उसळी घेण्याचं कारण पुढं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पक्षांतर्गत लॉबी सक्रिय झाली होती. गाऱ्हाणी नेहमीचीच. दुष्काळामुळं त्यात भर पडली होती इतकंच. त्यामुळे नेतृत्त्वबदल होणार हे स्पष्ट झालं होतं. हीच वेळ होती, मंत्रीपद पदरात पाडून घेण्याची. भूमिका घेण्याची. बाळासाहेबांनी ती घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात त्यांनी पद नाकारलं होतं, कारण त्यांच्या दुसर्या कारखान्याची उभारणी त्यावेळी जोरात सुरू होती आणि तिसर्या कारखान्याचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर होता. आतापर्यंत ही दोन्ही कामं मार्गी लागली होती आणि आता वेळ आली होती काही ठोस करण्याची. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील त्यांचं एक निवेदन तसं पुरेसं होतं हे ठोस काम दाखवण्यासाठी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकच उमेदवार आणि त्यामुळं तेवढं पत्रच हवं होतं. पाठबळाचा आकडा ठरवणारं पत्र. बाळासाहेबांसोबत सहा आमदार होते.
पक्षाध्यक्षांना निवेदन गेलं. पुढं इतर हालचाली झाल्या, मुख्यमंत्री बदलले, बाळासाहेब नव्या मंत्रिमंडळात महसूल राज्यमंत्री झाले आणि अवघ्या महिन्यापूर्वी एक धाडस करून आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये त्यांच्यासमोर गरजू म्हणून उभ्या राहिलेल्या रामचंद्र बोरसे यांच्या आयुष्यानं तिसरं वळण घेतलं. त्यांना रावसाहेब करणारं वळण ते हेच.
या तीन वळणांपर्यंतचा आपल्या आयुष्याचा रस्ता रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवतो. अगदी अर्ध्या रात्रीत त्यांना झोपेतून उठवलं तरी, या वर्णनात फरक पडलेला नाही. या सगळ्या घटना तब्बल बावीस-तेवीस वर्षांपूर्वीच्या. तरीही त्यांना त्या आठवतात. रावसाहेबांच्या संदर्भात केव्हाही कुणालाही ओळख करून दिली जाते ती फक्त त्यांचं बोरविहिरहून धुळेमार्गे मुंबई गाठणं एवढीच. त्यापुढं काही सांगण्याची गरज नसते. कारण तसा हा माणूस म्हणजे ‘ऋषी’च. त्याचं हे कूळच एरवी नवख्यांना ठाऊक नसतं. रावसाहेब किंवा आरएस्स हे पुरेसं असतंच ‘मुंबई – ३२’ या इलाख्यात. मग अशा ओळखीतूनच जेव्हा पुढच्या वाटचालीचा प्रश्न येतो तेव्हा रावसाहेब ही वळणं सांगत जातात. वळणं, प्रत्येक वळणामागं असलेली एक निराशा आणि प्रत्येक वळणापर्यंत आपण कसा तग धरला होता या गोष्टी त्या वर्णनात येतातच. समोरच्यावर आवश्यक ती छाप पडते. ती छाप पाडणं हा काही रावसाहेबांचा हेतू कधीच नसतो. मागं वळून पहाताना रावसाहेब जेव्हा या गोष्टी सांगतात तेव्हा त्यात बराचसा तटस्थपणा असतो यामुळं अनेकांवर प्रभाव पडतो. काहींवर केवळ रावसाहेबांच्या संयमाचा पडतो. थोड्यांवर प्रभाव पडतो तो रावसाहेबांनी हे सगळं करताना दाखवलेल्या कौशल्याचा. फारच थोडे असे असतात की ज्यांना रावसाहेबांची ही वाटचाल नेहमीच रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं झाली आहे हे कळतं. तसे रावसाहेब उमदे. कोणी ते दाखवून दिलं की मग ते त्यातील पोटवळणं सांगू लागत. मग या कहाणीला रंग लाभत…
***
महसूल राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब मंत्र्यांसाठीच्या निवासात गेले, जाताना त्यांनी एक केलं. आमदार निवासातील खोली सरकारकडून भाड्यानं घेतली आणि तिथं रावसाहेबांची व इतर काहींची सोय झाली. परिवर्तन एकच. आधी बाळासाहेब आतल्या खोलीत रहायचे, आता ती खोली रावसाहेबांना एक्स्क्ल्यूझिव्हली मिळाली.
सव्वा वर्षांनी मंत्रिमंडळात खातेपालट झाला. बाळासाहेबांचं प्रमोशन झालं ते कॅबिनेट स्तरावर. रावसाहेबांचंही ‘प्रमोशन’ झालं. ते आता बाळासाहेबांचे सरकारी वेतन घेणारे स्वीय सहाय्यक झाले. रीतसर. म्हणजे झालं असं की बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या एका कारखान्यात लावून घेतलं आणि तिथून त्यांची आपल्या सरकारी स्टाफवर आयात केली. ती करायची कशी हेही त्यांना रावसाहेबांनीच दाखवून दिलं होतं. बाळासाहेबांनीच त्यांना विचारलं होतं, “आरेस्स, तुम्ही आतमध्ये हवे. बाहेरचं काही खरं नाही. काय आहे, किती नाही म्हटलं तरी मी थोडा जुन्या वळणाचाच. त्यामुळं तुम्हाला सारं काही सांगून कामं मार्गी लावणं अवघड जातं. बांधकाम खात्यातून जाधवला घेतला आपण, पण त्याच्याकडं ते नाही…”
“साहेब, काही नाही. आपल्या एका कारखान्यात माझी नियुक्ती दाखवता येईल. तिथून इकडं डेप्युटेशनवर आणता येतं. तेवढा अधिकार तुम्हाला मंत्री म्हणून आहे.”
बाळासाहेबांना शंका होती. त्यांच्या चेहर्यावरच ती वाचून रावसाहेब म्हणाले, “साहेब, तसं केलं की तुमचं काम होईल. फक्त त्या बदल्यात तुम्हाला सरकारी खात्यातून कोणी स्वीय सहायक मिळणार नाही. एवढी तडजोड करावी लागेल.”
खात्याचा सचिव आडवा येणार हे रावसाहेबांना ठाऊक होतं. किती झाले तरी ते बाहेरचेच. त्यावरचा तोडगाही त्यांच्याकडे तयार होता. सीएम. बाळासाहेबांकडून प्रस्ताव येताच सीएमची मोहोर उठली. त्यांना आपल्यासोबत ठेवण्याची ती एक किरकोळ किंमत असते, इतर अनेक किंमतींबरोबरच. ती मोजायला सीएम तयार असतातच.
आणि अशा रीतीनं आर. एस. बोरसे यांच्या नावाचा एक आदेश निघाला, आणि त्यांची सोय बाळासाहेबांच्या मुंबईतील ताफ्यात रीतसर झाली. एक पोटवळण त्या प्रवासात असं झालं होतं. आणि या पोटवळणानं आपण स्थिरावतो आहोत, ही भावना रावसाहेबांच्या मनात निर्माण झाली.
***
राजकारण नेहमी बदलत असतं. सत्ता क्षणभंगूर असते, सत्तेबाहेर राहणं हेही क्षणभंगूरच असू शकतं. राजकारणातले हे ‘क्षण’ काही वेळा दिवसांचे असतात, काही वेळेस महिन्यांचे, काही वेळेस वर्षांचे. पण कायम काहीही नसतं. सारं काही बदलतं.
या नोकरीतील पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस रावसाहेबांनी बाळासाहेबांच्या मतदार संघात पहिल्यांदा खर्या अर्थाने प्रवास केला. याआधी ते त्यांचे सहायक या नात्यानेच होते, मतदार संघाशी संबंध तसा नव्हता. तो आला पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्याचवेळी रावसाहेबांसमोर काही प्रश्न उभे राहिले.
बाळासाहेबांनी त्यांना एकदा सांगितलं होतं, की ते जुन्या वळणाचे आहेत. माणूस महत्त्वाकांक्षी, पण राजकारण मात्र जुनाट असा त्याचा अर्थ आहे हे मतदार संघात गेल्यानंतर त्यांना कळलं. कदाचित त्याच क्षणी त्यांनी मनाशी काही निर्णय केला असावा.
बदलत्या काळात सहकारी संस्था या राजकीय सत्ताकेंद्रं बनत होत्या, पण त्याकडे सत्ताकेंद्र म्हणून पाहण्याऐवजी कुरण म्हणून पाहण्याची एक प्रथा रुजू लागली होती. बाळासाहेब, खरं तर त्यांची पिल्लावळ त्याला अपवाद नव्हती. आणि एकूणच तीनापैकी पहिल्या कारखान्याचा हिशेब रावसाहेबांसमोर अचानक आला तेव्हा त्यांच्या ते पक्कं ध्यानी आलं.
ऐन निवडणुकीची या धामधूमीतच एके दिवशी कारखान्यावर असताना रावसाहेबांना शोधत तिथल्या पोलीस ठाण्याचे फौजदार आले.
“कंट्रोल रूमवरून मेसेज आहे. सीएमसाहेबांनी औरंगाबादला आज रात्री संपर्क साधायला सांगितले आहे.”
रावसाहेब उडालेच. दस्तुरखुद्द सीएम आपल्याशी बोलू इच्छितात? त्यांच्या मनात वादळं सुरू झाली. एक तर सीएमना काय बोलायचे आहे हे कळलेलेच नव्हते. धामधूम निवडणुकीची आहे. त्यात हे कशासाठी? निवडणुकीशी संबंधित काही? आपल्या हातून काही चूक तर झालेली नाही? खात्याशी संबंधित काही काम? पण त्यासाठी तर बाळासाहेबांशी बोलणं झालं पाहिजे. आपण साधे पीए…
रावसाहेंबानी एक केलं, हा विषय त्यांनी ठरवून बाळासाहेबांकडं काढला नाही. ज्याअर्थी सीएमनी त्यांच्याकरता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून निरोप पाठवला त्याअर्थी आपण ते बोलू नये हेच उत्तम असा कौल त्यांच्या मनानं दिला होता.
मुख्यमंत्र्यांशी बोलायचं तर कोल्हापूर गाठावं लागणार होतं. जवळचं फोन नीट उपलब्ध असणारं ठिकाण तेच. संध्याकाळपर्यंत कोल्हापूर गाठायचं इतकंच त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. कारखान्यावरून कोल्हापूर दोन तासांचा रस्ता. मोटरसायकलवरून तो प्रवास करतानाही त्यांच्या डोक्यात कल्लोळ सुरू होताच.
मुख्य अभियंत्याचं ऑफिस उघडून घेण्यास रावसाहेबांना उशीर लागला नाही. औरंगाबादला कॉलही झटपट लागला. पहिल्यांदा बंगल्यावर सीएम अद्याप आलेले नसल्यानं तो दुसर्यांदा करायला लागला.
“नमस्कार सर. आर. एस. बोरसे बोलतोय…”
“कुठं आहात आत्ता?”
“कोल्हापूर सर.”
“बाळासाहेबांशी बोललात याविषयी?”
“नाही सर, तशी त्यांची गाठ झाली नाही. ते फेरीवर होते. मी त्यावेळी कारखान्यावर…”
“ठीक आहे…” रावसाहेबांना क्षणभर कळेनासे झाले. सीएमचा सूर एकदम न्यूट्रल होता. आपण केलं त्याचं सीएमनी स्वागत केलं की त्यांचा त्याला विरोध आहे की आणखी काही? ते विचारात पडले तेवढ्यात सीएमनी आपला पॉज सोडून प्रश्न टाकला.
“काय आहे तिथं परिस्थिती?”
“साहेबांना उत्तम. अडचण नाही. एकूण जिल्ह्यात दोन मतदार संघ सोडले तर आपलाच वरचष्मा असेल…”
“माझ्याकडं रिपोर्ट वेगळे आहेत. बाळासाहेबांचा विरोधक… कोण तो…”
“गोविंदराव शिंदे…”
“हां, गोविंदराव. शेकापचा ना तो… मी ऐकलं की जड जातोय. कारखान्यातील लफडी बाळासाहेबांना महाग जाणार…”
रावसाहेब पुन्हा विचारांत. आपण काय बोलावे? छ्या… आपण उगाच या निवडणुकीच्या झमेल्यात पडलो, एक क्षणभर त्यांना वाटून गेलं. सीएमच पुढं बोलले, “आरेस, मोकळेपणानं सांगा. तुम्ही बाळासाहेबांच्या व्यक्तिगत ताफ्यात असलात तरी आता सरकारमध्येही आहात…” सीएमनी वाक्य अर्ध्यावर सोडून दिलं.
झटक्यात रावसाहेबांमधली कोणत्याही परिस्थितीत स्वतःला तगवण्याची इच्छाशक्ती जागी झाली. बोरविहीर ते धुळे, धुळे ते मुंबईत आमदार निवास आणि तिथून आज कोल्हापूर. प्रवास नुसताच झालेला नव्हता. सीएमनी दिलेला संदेश पुरेसा होता.
“सर, अडचण आहे थोडी हे नक्की. गोविंदरावांचा रेटा पाहता ते विरोधी पक्षाचे आहेत की सत्ताधारी हेच कळत नाहीये…”
“तेच म्हणतोय मी…” सीएमनी पुन्हा एक पॉज घेतला. आपण काही बोलावे का या विचारात रावसाहेब काही क्षण होते. पण सीएमनीच त्यांची सुटका केली. “आरेस, असं करा, निकालानंतर येऊन भेटा. तुमच्या कौशल्याचा अधिक चांगला वापर करता येईल…”
“सर, आत्ता काही स्पेसिफिक करण्याजोगं…”
सीएम हसले, “काही नाही आरेस. बाळासाहेबांकडं लक्ष राहू द्या. चिरंजीव त्यांचे काय करतात याकडे लक्ष राहू द्या. ते आले निवडून तर आपल्याला हवेच आहेत.”
ते आले निवडून तर… रावसाहेब विचारांत आणि काही वेळातच सारं काही त्यांच्या लक्षात येऊ लागलं.
***
निवडणुकीचा निकाल ते रावसाहेबांची राज्य लोकसेवा आयोगावर झालेली नियुक्ती यातलं अंतर तसं मोठं, पण रावसाहेबांच्या स्तरावर फारशा घडामोडी नसणारं. राज्याच्या स्तरावर मात्र त्यावेळी घडामोडी झाल्या होत्या. जोरदारच.
सीएमचा पुन्हा शपथविधी झाला. त्यावेळी त्यांनी अवघ्या ८ मंत्र्यांचाच समावेश केला होता मंत्रिमंडळात आणि त्याता बाळासाहेबांचं नाव नव्हतं. बाळासाहेब निवडणुकीत विजयी झाली होते, पण फक्त आठशे मतांनी. निकालापाठोपाठ लगेचच गोविंदरावांनी त्यांच्या इतर काही साथींसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आणि ते पाहता बाळासाहेबांच्या भविष्याविषयीच प्रश्न निर्माण झाला होता. कारखान्यातील गैरप्रकारांनी निवडणुकीत फक्त त्यांची बोलीची किंमत घेतली होती, खरी वसुली यापुढे सुरू होणार हे स्पष्ट झालं.
सीएमच्या शपथविधीनंतरच रावसाहेब सीएमना भेटले, तेव्हा सीएमनी त्यांना फक्त इतकंच सांगितलं होतं, “राज्याची यंत्रणा उभी करण्यासाठी भरती आयोगाच्या कामात अधिक गतिमानता आणायची आहे आणि तिथे तुमचा उपयोग होऊ शकतो. विचार करा आणि सांगा.”
रावसाहेबांना विचार करण्याची गरजच नव्हती. कारखाना ते सरकार असा बेभरवशाचा प्रवास करण्यापेक्षा, बाळासाहेबांची हुकमत कमी होत असताना, थेट सरकार हा पर्याय चांगलाच होता.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात बाळासाहेबांचं मंत्रिपद गेलंय, हे नक्की झालं.
कॉंग्रेसमध्ये आलेल्या गोविंदरावांची लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती.
रावसाहेबांनी सीएमची पुन्हा भेट मागितली तेव्हा त्यांना तीन दिवस थांबावं लागलं. ठोका चुकलाच. पण तीन दिवसांनी बोलणं झालं आणि सारं स्थिर झालं.
“आरेस, या यंत्रणेला आकार द्यायचा असेल तर आपली मराठी माणसं मोठ्या संख्येनं सरकारमध्ये शिरली पाहिजेत… त्यांना हेरायचं, त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची आणि पुढं आणायचं हे काम झालं पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्यांची गरज आहे. तुमचा प्रवास मी पाहिलाय. बोरविहीर ते मुंबई. तुम्ही इथं जनसंपर्क अधिकारी म्हणून या. बरंच काही करता येईल…”
सीएमच्या या शब्दांनी रावसाहेबांसमोर मुंबईतील पहिला दिवस उभा राहिला. स्टेशनवरून बाहेर आल्यानंतरचे ते क्षण. त्या पोलिसाला विचारेपर्यंतची धास्तावलेली स्थिती, त्यानंतर टाकलेली पावलं, तिथून बाळासाहेब, मग कारखान्यामार्गे सरकार… आपलं जीवनकार्यच गवसल्यासारखं रावसाहेबांना वाटू लागलं आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं…
“सर…”
“आय अंडरस्टँड. इतक्या संघर्षानंतर इथं पोचताना असं वाटणं स्वाभाविक आहे. पण महत्त्वाचं काम पुढं आहे – जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही तिथं बरंच काही करू शकाल, पण त्याहीपलीकडं तुमच्याकडून अपेक्षा आहेत. सत्ता राबवणं हे महत्त्वाचं असतं सरकारमध्ये. त्यात तुम्ही इतरत्रही उपयुक्त आहात. तुम्ही कारखाना ते सरकार हा मार्ग जो काढला स्वतःसाठी, असे पर्याय इथं आवश्यक असतात. नवी मंडळी आता मंत्री आहेत. त्यांच्यासाठीही तुमचा उपयोग होईलच…”
हे तर रावसाहेबांच्याच भाषेत ‘ओसरी-पसरी’ होतं. आपल्याकडं असं आहे तरी काय की ही संधी यावी? रावसाहेबांच्या मनात उमटलेल्या या प्रश्नाचं उत्तर सीएमनी दिलं,
“आरेस, तशी ही गोष्ट खूप छोटी आहे, पण मी तुमच्याशी थेट बोलतोय त्यातच समजून घ्या. तुमच्याकडं क्षमता आहेत. त्या योग्यवेळी योग्य पद्धतीनं आपण उपयोगात आणू. सध्या तुमची गरज आहे ती सुधाकररावांना…”
सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सुधाकर मुळक. रत्नागिरी – कोकण. सीएमचा माणूस. त्यांनी स्वतःच पुढे आणलेला. लोकसेवा आयोग ही केवळ सोय? रावसाहेबांनी प्रश्न मनात अगदी खोलवर गाडून दिला आणि ते उठले. टेबलाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सीएमचे पाय धरले…
आर. एस. बोरसे यांच्या आयुष्यातील हे चौथं वळण!
***
मुळकांसोबत रावसाहेब टिकले ते आठ महिने. त्यानंतर लोकसेवा आयोगातही ते राहिले नाहीत. पण या दोन्ही घडामोडींआधी त्यांनी आपल्या पुढच्या रस्त्याची जणू आखणीच केली होती.
घटनांचा अन्वयार्थ रावासाहेबांना लावता येईलच असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांच्या कथनातून तरी तसा तो जाणवत नसायचा. मुळकांना त्यांच्या मतदार संघातील एकाची फौजदारपदी निवड करून हवी होती. ही अगदी त्यांच्याही कारकीर्दीची सुरवात. या निवडीसाठी समितीच्या सदस्यांकडं रावसाहेबांनी शब्द टाकला.
“गरजू आहे. हुशारही आहे. लेखी परीक्षेत थोडा मार खाल्ला आहे… थोडं डावं-उजवं करून त्याचं काम झालं तर बरं होईल…” रावसाहेबांनी केलेला युक्तिवाद असा साधा-सरळ होता. थोडं डावं-उजवं म्हणजे काय हा त्यांच्यासमोर आलेला प्रश्न होता. तेव्हा रावसाहेबांनी स्पष्ट सांगून टाकलं, “तुमच्यासमोर पार्श्वभूमी असते उमेदवारांची… गरज अधिक कोणाची हे ठरवता येतं, गुणवत्ता म्हणाल तर हा मुलगा त्यात बसेलच असं नाही, कारण लेखीत खाल्लेला मार. पण गुणवत्ता इतरही असते. एका परीक्षेवर ती ठरवू नका इतकंच माझं म्हणणं आहे. तोंडी परीक्षा थोडी चोख घ्या.”
रावसाहेबांचा हा युक्तिवाद मान्य झाला किंवा कसे हे त्यांनाही सांगता येणार नाही. इतकं खरं की, हा उमेदवार – प्रकाश सावंत – निवड झाल्यानंतर रावसाहेबांकडं आला. पाया पडला आणि म्हणाला, “साहेब, तुमच्यामुळं आयुष्याची रांग लागली.”
सुधाकर मुळकांना हे कळलं तेव्हा त्यांनी रावसाहेबांना विचारलं, की हे काम कसं झालं? रावसाहेबांच्या ध्यानी आलं, यातलं त्यांचं कौशल्य केवळ निवड समितीच्या सदस्यांना पटवण्याचं. इतर काही व्यवहार न करता हे झालं होतं हेही त्यांच्या लक्षात आलं.
रावसाहेबांना वाटलं होतं की मुळकांच्या या उमेदवाराची सोय झाली आणि प्रश्न सुटला. पण तसं नव्हतं. हा सावंत सहा महिन्यांनी नोकरीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर पुनश्च एकदा मुंबईत आला तेव्हा रावसाहेबांना भेटला. दोघांची रात्री एक छोटी बैठक झाली. त्या बैठकीत ‘बोलता-बोलता’च त्याच्या तोंडून निघून गेलं,
“युक्तिवाद तुमचा. पण त्यासाठी मी किंमत मोजली रावसाहेब. आठ हजार रुपये…”
रावसाहेबांना कळेना. त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि मग कळलं, मुळकांच्या निवडणूक लढवण्याच्या क्षमतेत त्या आठ हजारांनी भर पडली आहे. त्या एका क्षणी रावसाहेबांसमोर आणखी काही गोष्टी आल्या – आपल्या जगण्याची पद्धत या काळात बदलली आहे. आपण राहतो आमदार निवासातच, पण आता तिथं पक्के पाय रोवावे लागतील. गरजा बदलल्या आहेत. काही दिवसात आपलं घर असावं लागेल. गावाकडं शेतात पंप बसवायचा आहे. त्याशिवाय पाणी येणं शक्य नाही. जमल्यास बोअर करायची आहे. सरकारी योजनांत आपली जमीन बसत नाही म्हणजे हा खर्च आला.
आपलं काय? प्रश्नाच्या एकेका गुंत्यातून ते पुढं सरकले आणि स्वतःपाशीच येऊन थांबले. लग्न!!! करावं लागेल. बाप केव्हाचा मागं लागलाय. गावाकडं घर वाढवावं लागेलच. बायको तिकडचीच, इकडं येईल याची खात्री नाही…
आणि रावसाहेबांचे काही निर्णय झाले. त्यांच्यासमोरचे हे प्रश्न इतके मोठे की त्यापुढं बाकी सारं किरकोळ ठरलं… म्हणजे अशा भाषेत ते मागं वळून पाहताना बोलत इतकं नक्की. त्याक्षणी त्यांच्यालेखी ते प्रश्नही मोठे असतीलच का? तसंही सांगता येणार नाही. आठवणींचा प्रवास इथवर यायचा तोवर हे युक्तिवाद तयार होत जायचे.
आयोगाची यंत्रणा कधी त्यांच्या कब्जात आली हे त्यांनाही आता सांगता येत नाही. त्यांच्या ‘प्रभावा’मुळं नोकरी लागलेल्यांची संख्याही त्यांना मोजता येत नसावी. सेवाश्रेणी वाढत गेली, तसा त्यांचा कारभार वाढत गेला. निवडपरीक्षांच्या काळात आमदार निवासातील गडबड वाढत गेली. एकट्याच्या हातून रावसाहेबांना सारं काही झेपेनासं झालं. मग त्यांच्या जोडीला एक टीम उभी राहिली. न सांगताच. काही न ठरवताच.
आयोगामार्फत होणारी भरती एवढं एकच क्षेत्र त्यांचं होतं. या आयोगातूनच शासकीय यंत्रणेच्या सगळ्या खात्यांमध्ये भरती होत असे. वेगवेगळ्या स्तरांवर ती असायची कारकूनापासून ते अगदी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत. सगळीकडं रावसाहेबांचं अस्तित्त्व होतं. थेट सीएमपर्यंत ते पोचायचे अगदी लीलया. सीएमची आणि आणखी दोघा-तिघांची नोकर्या लावण्यासाठीची ख्याती झाली ती याच काळात. नोकरीचा हा प्रश्न सीएमकडं गेला की निकाली निघतो अशी त्यांची प्रतिमा होती. रावसाहेबांच्या या व्यवहारांची मांडणीच तशी होती. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी मग सीएमचा निरोप यायचा, त्यांनी सांगितलेला आकडा रावसाहेबांनी पूर्ण करायचा इथकं सारं सुरळीत होत गेलं. मुळकही त्या व्यवस्थेत आले. पण कधी काळी रावसाहेबांचे बॉस होते ते, ते आता मात्र त्यांच्या बरोबरीचे आणि काही काळाने दुय्यम झाले. सीएमचा सपोर्ट मग रावसाहेबांच्या दिशेनं वळला.
आधुनिक काळात उद्योगांनी उदारीकरणानंतर आपापले कोअर एरियाज डिफाईन करून घेतले, त्याची रावसाहेब नंतर-नंतर खिल्ली उडवत. ते म्हणायचे, “त्याच काळात मी माझा कोअर एरिया ठरवला होता. मी फक्त भरतीचंच काम करायचो. मंत्रालयातील इतर सेटिंग्ज माझ्यासमोर व्हायची, पण मी त्यात कधीही पडलो नाही. नंतर-नंतर तेच इथलं महत्त्वाचं काम झालं… भरती हे काम दुय्यम होत गेलं…” हे सांगताना त्यांचा सूर बदलायचा. मग त्यावर छेडलं की ते समर्थनं करू लागत,
“मी नोकर्या लावल्या शेकडो लोकांना. सगळ्यांकडून पैसे थोडेच घेतले. पैसे घेतले आणि वाटले. माझा एक फ्लॅटही मुंबईत होऊ शकला नाही… शेतासाठी थोडं केलं… अनेकांना मी नोकरीला लावलंय त्यांच्याकडून काहीही न घेता…”
“तुमचीही टेन पर्सेंट स्कीम का?” एखादा विचारी. खोचकपणेच. प्रश्नाचं स्वरूप वेगळं. पण अर्थ असाच. कारण त्याच अर्थानं रावसाहेब बोलायचे मग,
“त्या टेन पर्सेंटमध्ये खरे किती, खोटे किती हे विचारू नकोस…’
काही आकडे एका बैठकीत रावसाहेबांच्या ग्रूपमधील एकानं सांगितले. किमान पन्नासावर उपजिल्हाधिकारी श्रेणीचे अधिकारी, शेकड्यांनी इन्स्पेक्टर, तहसीलदार, फौजदार… आकडे मोठे होते. पण समोरच्याला खरा रस असायचा तो त्या आकड्यात नव्हे. ‘रेट’ काय, हा त्यांचा कळीचा प्रश्न. या ‘रेट’मधील स्थित्यंतरं रावसाहेब सांगायचे. आधी त्यांच्या आणि निवड समिती सदस्यांपुरती ही वाटणी असायची, मग लोकप्रतिनिधींचा रीतसर रेट ठरत गेला. वाटे पोचवण्याची एक व्यवस्था आली. पाहता-पाहता सातआकडी खेळ एकेका स्टेक होल्डरचा होत गेला. स्टेक होल्डर हा रावसाहेबांचाच शब्द.
एक ठरलेलं लग्न मोडल्यानंतर रावसाहेब पुन्हा त्या वाटेला गेले नाहीत. लग्न मोडण्याचं कारण त्यांचं आजवरचं जगणं हेच होतं हे मात्र त्यांना कधीही मान्य व्हायचं नाही.
“मी त्यांच्या उमेदवाराची वर्णी लावली नाही हा त्यांचा राग… त्यांनीच तिच्या घरी जाऊन सगळं काही उलटं-सुलटं सांगितलं.”
ते सांगायचे. एका पुढार्याचं नाव घेत. त्यानं मुलीच्या घरी जाऊन रावसाहेब काय उद्योग करतात हे सांगून टाकलं आणि त्यातून लग्न मोडलं असं त्यांचं म्हणणं असायचं.
“मीच वाल्या… म्हणा.” रावसाहेब म्हणायचे, या भरतीचा आणि त्यातील व्यवहारांचा विषय आला की, त्यामागंही तेच कारण असावं. फक्त वेगळ्या संदर्भांच्या चौकटीत.
तेवढंच. त्यापलीकडे काही भावना नाहीत. कारण अशा जगण्याचा माज मात्र कायम होता. टॅक्सी, संध्याकाळी अंधारे, पण खूप काही असणारे बार, उंची सिगरेट, उंची कपडे, उंची अत्तरे. एक विषय न बोलण्याजोगा. मुंबईचं रात्रीचं जगणं आणि त्यातले रावसाहेब. हा एक प्रांत मात्र त्यांनी कटाक्षानं वैयक्तिक ठेवला होता. कळायचं. संध्याकाळी हा गृहस्थ अनेकदा टॅक्सीनं जायचं, मध्यरात्री यायचा. अनेकदा याला पोचवण्यासाठी नंतरच्या कालखंडात उंची गाड्या येत असत. एकूण हा सारा विरोधाभास आपल्यात आहे वगैरेची पर्वाही नसायची.
आमदार निवासातील ती खोली त्यांच्या कब्जात राहिली प्रदीर्घ काळ. तिचं भाडं ते भरायचे म्हणे. पण एकूणच त्यांचा वट असा की, ती शक्यता नसावीच. मग एकदा त्यांच्या तोंडून त्यांचंच एक वर्णन आलं,
“मी एक बांडगूळ आहे…”
हा गृहस्थ खरं बोलला असावा त्यावेळी.
***
मंत्रालय बीट कव्हर करताना निशांत भोसलेला कधी हे वाटलंही नव्हतं की एक काम करायला जाऊन आपल्या हातून काही वेगळंच घडणार आहे. तहसीलदार भरतीचं एक प्रकरण त्याच्याकडं चालत आलं. मराठवाड्यातील. त्या अपंग मुलाची भरती होत नव्हती. सदस्यांच्या काही मागण्या त्याला पूर्ण करता येत नव्हत्या. रखडलेल्या निवडीचं गाऱ्हाणं घेऊन मंत्रालयात पोचलेल्या या तरुणानं निशांतचं लक्ष वेधून घेतलं तेच मुळी आपल्या चेहर्यावरील वेदनेनं. सलग चार दिवस मंत्रालयात हा मुलगा दोन्ही खाकांमध्ये कुबड्या घेऊन त्या आधारे हळू गतीनं इकडं-तिकडं फिरत होता. पाचव्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, त्याच्या चेहर्यावरच्या वेदना तीव्र झाल्या होत्या आणि ते पाहूनच निशांतनं ठरवलं, पहायचं काय आहे ते.
“साहेब, तहसीलदाराची परीक्षा पास झालोय, तोंडी परीक्षाही चांगली झाली आहे याची खात्री आहे. पण…”
निशांतनं त्याला पुढं बोलू न देताच विचारलं, “किती मागताहेत?”
“पाच.”
“कुणाला भेटलास?”
“सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांकडं जायचा प्रयत्न करतोय, वेळच मिळत नाहीये…”
“तुझ्याकडं सगळ्या पात्रता आहेत?” निशांतनं विचारलं, संदर्भ अर्थातच त्याच्या अपंगत्वाचा.
तो कॉन्फिडण्ट होता. त्याच्या मते या श्रेणीत इतर पदं आहेत जिथं, दंडाधिकारी म्हणून काम करताना जसं त्याचं अपंगत्त्व अडचणीचं ठरेल तसं ठरणार नाही. त्याचा तो आत्मविश्वास चेहर्यावरच्या वेदनेच्या अगदी विरोधी होता. त्या संध्याकाळी निशांतच्या त्या स्कूपची बीजं रोवली गेली. या मुलाला घेऊन निशांत थेट राज्यमंत्र्यांकडं गेला. मंत्र्यांनी सांगितलं,
“रावसाहेबांना भेटा. माझं नाव सांगायचं. स्वच्छ सांगायचं. बाकी काही मिळणार नाही हेही स्पष्ट सांगायचं. काम होईल…”
आणि तिसर्याच दिवशी निशांतच्या बायलाईनची बातमी मंत्रालयात खळबळ उडवून गेली – “मंत्रालयाच्या बाहेरची सत्ता! – तहसीलदार भरतीत राज्यंमंत्र्यांना लागते एजंटांची मदत”
तपशीलवार वर्णनासह. आमदार निवासातील खोलीचा क्रमांक किंवा रावसाहेबांचं नाव नव्हतं बातमीत. पण संकेत पुरेसे. पुढच्या दोन दिवसातच गुन्हा नोंदला गेला, त्याची पुढची कार्यवाही सुरू झाली…
आणि त्या अपंग तरुणाची नियुक्ती झाली…
***
आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना इन्स्पेक्टर मिराशींच्या चेहर्यावर प्रचंड ताण होता. एक पेच त्यांच्यासमोर होता: ज्यानं आपल्याला अन्नाला लावलं, त्याला बेड्या टाकायच्या. बेड्या टाकणं हे कर्तव्य आणि अन्नाला लावल्याबद्दलची कृतज्ञता हेही कर्तव्यच. बिन पैशात झालेली आपली भरती हे तिचं मूळ. गुन्ह्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांनी दीड तास काढला होता तो याच पेचाचे उत्तर शोधत. जित-हार हा प्रकार नव्हताच. दोन्हीकडं म्हटलं तर हारच होती, म्हटलं तर जित होती.
शेवटी निर्णय झाला त्यावेळी तो मात्र या दोन्ही मुद्यांवर नव्हताच. आपल्या उपजीविकेचं काय असा प्रश्न समोर येताच मिराशींनी निर्णय करून टाकला. जाऊन अटक करायची. त्या निर्णयाच्या पोटात आणखी एक निर्णय झाला होता. यापुढं या नोकरीत कुठंही जाण्याची तयारी ठेवायची. अगदी प्रसंगी चंद्रपूर-गडचिरोली किंवा धुळे-नंदुरबारदेखील!
आमदार निवासातील खोलीत रावसाहेब आरामात बसले होते. त्यांच्या चेहर्यावर कसलाही ताण नव्हता. अगदी अपेक्षित आपणच ठरवलेल्या घडामोडी घडत असाव्यात असा त्यांचा चेहरा होता. आणि एका अर्थी ते खरंही होतं. रावसाहेबांसोबत दुसरं कोणीही नव्हतं. कोणी असणं शक्य नव्हतं. त्यांच्यासोबतच्या दोघांनाच आधी पोलिसांनी उचललं होतं आणि त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसारच गुन्हा नोंदवला होता. तक्रारदार म्हणून कोणी पुढं आलं नव्हतं. येणं शक्यही नव्हतं. कारण या गटानं कुणाला फसवलं नव्हतं. राजीखुशीचा मामला आणि त्यातही समाधान, असला प्रकार. तरीही गुन्हा नोंदवला होता तो अटक केलेल्यापैकी एकाकडे सापडलेल्या आयोगाच्या काही कागदपत्रांच्या आधारे. त्यामुळं त्यात किती दम होता हा प्रश्नच होता. तरीही गुन्हा नोंदवला गेला हे खरं.
“या मिराशी…” रावसाहेबांनी नेहमीच्या शैलीत त्यांचं स्वागत केलं. अर्थातच, पाण्याचा ग्लासही पुढं केला. मिराशींनी तो बाजूला केला.
“दुसरा काही पर्याय नाहीये रावसाहेब…”
“समजू शकतो. चला. बेड्यांची गरज नाही.”
नाट्य नाही, काही नाही. ही कारवाई अशी उरकेल याचीही कल्पना कुणी केली नव्हतीच. मिराशींनी गाडीत घालून रावसाहेबांना आणलं आणि जिथं अशांची व्यवस्था केली जाते, तिथंच त्यांना बसायला सांगितलं.
‘हाईंडसाईट इज परफेक्ट’ असं कुणी म्हटलंय. रावसाहेबांना त्या खुर्चीत बसल्या-बसल्या पहिल्यांदा आठवलं ते हे. आणि त्यांचा हा प्रवास, त्यातील वळणांसकट त्यांच्यासमोर उभा रहात गेला. कोणत्याही विषादाशिवाय ते तो पहात राहिले…
***
उपसंहार
रावसाहेबांच्या अटकेनंतर साधारण दीडेक महिना वृत्तपत्रांमध्ये याच प्रकरणाचे मथळे होते. ‘मुख्यमंत्र्यांकडे संशयाची सुई’ इथंपर्यंत सारं काही झालं. प्रकरण हळुहळू आधी पान ३ वर गेलं, मग कधी तरी ते पान ६ वर आलं, त्यावेळी या केसचं चार्जशीट झालं होतं. पुढं रावसाहेब सुटले. आरोपी म्हणून ते आणि त्यांचे दोन साथीदारच होते. केस उभी राहणं मुश्कील होतंच. मिराशींनी तेवढं केलं होतं आणि ते नंतर थेट गडचिरोलीला पाठवले गेले.
रावसाहेब सुटले, पण मधल्या काळात व्हायचं ते होऊन गेलं होतं. नंतर आलेल्या दैन्याचं वर्णन करताना ते एकदा म्हणाले, “बांडगुळाचं नशीब हेच असतं. मी ज्यांच्या भरोशावर जगलो, ते इतरांच्या भरोशावर होते. त्यामुळं इतक्या वर्षांच्या या उद्योगातील एकही मंत्री, सीएम यात गुंतला नाही. इतरांनीही त्यांना भरोसा दिला, इतकंच. मुळकांच्या कँडिडेटच्या केसमध्ये चुकलो. चुकलो. संपलं.”
आर. एस. बोरसे यांचा मृतदेह मिळाला त्यादिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रात्रीच्या ड्यूटीवर विजयसिंह असलेल्या देशमुखांनी त्याची जबाबदारी घेतली. रावसाहेबांच्या जोरावरच भरती झालेल्या आपल्याच काही मित्रांसह मृतदेह गावी नेला. या बाहेरच्या सहा माणसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा साहेबराव बोरसे, सत्तरीच्या उत्तरार्धात, निःशब्द होते.